पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मजकूर

Posted On: 01 DEC 2025 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025

नमस्कार मित्रहो,

तुम्ही सुद्धा छान हवामानाचा आनंद घ्या.

मित्रहो,

हे हिवाळी अधिवेशन केवळ एक नित्यनेमाने होणारी घटना नाही. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ऊर्जा देईल, असा विश्वास मला वाटतो. भारत हा लोकशाही जगणारा देश आहे आणि आपण लोकशाहीवरील विश्वास दृढ करणाऱ्या मार्गांनी लोकशाहीबद्दल वाटणारा उत्साह वारंवार दाखवला आहे. बिहारमध्ये अलिकडेच झालेल्या निवडणुकीत जे विक्रमी मतदान झाले, ती लोकशाहीची खरी ताकद आहे. माता आणि भगिनींचा वाढता सहभाग ही नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण करणारी महत्वाची बाब आहे. एकीकडे लोकशाहीची ताकद आणि या लोकशाही व्यवस्थेतील अर्थव्यवस्थेची ताकद यावर जग बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताने सिद्ध केले आहे, की लोकशाही चांगले परिणाम करू शकते. आज भारताची आर्थिक परिस्थिती ज्या वेगाने नवीन उंची गाठत आहे. हे केवळ आपल्यामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण करत नाही तर विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला नवीन बळ देखील देते आहे.

मित्रहो,

या अधिवेशनात संसद देशासाठी काय विचार करते, देशासाठी काय करण्याचा त्यांचा मानस आहे आणि देशासाठी काय करणार आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधी पक्षानेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, चर्चेत असे मुद्दे उपस्थित केले पाहिजेत, मजबूत मुद्दे उपस्थित केले पाहिजेत. पराभवाच्या निराशेतून बाहेर पडले पाहिजे, आणि दुर्दैवाने, काही पक्ष असे आहेत जे पराभव पचवूही शकत नाहीत. मी विचार करत होतो की बिहारच्या निकालानंतर बराच वेळ निघून गेला असल्याने ते थोडे शांत झाले असतील, परंतु काल मी ऐकलेल्या विधानांवरून असे दिसते की त्यांचा पराभव त्यांना अजूनही त्रास देत आहे. मात्र, माझी सर्व पक्षांना विनंती आहे की हे हिवाळी अधिवेशन पराभवाच्या निराशेचे रणांगण बनू नये. त्याचप्रमाणे हे हिवाळी अधिवेशन विजयाच्या अहंकाराचेही असू नये. आपण देशातील लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचे व्यवस्थापन करताना अतिशय संतुलित पद्धतीने, जबाबदारीने पुढचा विचार केला पाहिजे. जे आधीपासून आहे ते आपण कसे सुधारू शकतो? जर काही वाईट घडले तर आपण त्यावर अचूकपणे कसे भाष्य करू शकतो, जेणेकरून देशातील नागरिकांनाही ज्ञान मिळेल? हे निश्चितच कठीण काम आहे, परंतु ते देशासाठी केले पाहिजे. आणि मला आशा आहे की बऱ्याच काळापासून माझ्या सर्वात मोठ्या चिंतांपैकी एक म्हणजे सर्व पक्षांचे सर्व खासदार, जे सभागृहात नव्याने निवडून आले आहेत किंवा जे तरुण आहेत, ते खूप अस्वस्थ आहेत, आणि दुःखी आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रातील समस्यांबद्दल बोलण्याची, त्यांची ताकद दाखवण्याची संधी मिळत नाही. ते देशाच्या विकासाच्या प्रवासात भागीदार होण्यासाठी त्यांचे विचार सामायिक करू इच्छितात, परंतु त्यांना देखील रोखले जात आहे. पक्ष कोणताही असो, आपण या युवा खासदारांना, पहिल्यांदाच खासदार झालेल्यांना, संधी दिली पाहिजे. आपण, सभागृहाने, त्यांच्या अनुभवांचा फायदा घेतला पाहिजे. या नवीन पिढीच्या अनुभवांचा सभागृहाद्वारे देशालाही फायदा होईल. आणि म्हणूनच, मी आपल्याला या गोष्टी गांभीर्याने घेण्याचे आवाहन करतो. नाटकासाठी भरपूर जागा आहे; ज्याला ते करायचे आहे त्याने ते करावे. इथे नाटक नको तर योगदान हवे आहे. घोषणा देणाऱ्यांसाठी संपूर्ण देश उपलब्ध आहे, तुम्हाला कितीही बोलावे लागले तरी. जिथून पराभूत झाले आहात, तिथेही तुम्ही बोलून आले आहात. पण इथे, घोषणांवर नाही तर धोरणावर भर दिला पाहिजे. आणि तोच तुमचा हेतू असला पाहिजे.

मित्रहो,

राजकारणात नकारात्मकता काही अंशी उपयुक्त ठरू शकते, परंतु राष्ट्र उभारणीसाठी सकारात्मक विचारसरणीची आवश्यकता असते. माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही नकारात्मकता मर्यादेत ठेवावी आणि राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित करावे.

मित्रहो,

या हिवाळी अधिवेशनाचे आणखी एक कारण महत्त्वाचे आहे. आपल्या नवीन माननीय सभापती आजपासून राज्यसभेला मार्गदर्शन सुरू करत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो.

मित्रहो,

जीएसटी सुधारणांमुळे देशवासीयांमध्ये नव्या सुधारणांबद्दल आदराचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिवेशनातही त्या दिशेने बरेच काम केले जाईल. आपल्या प्रसार माध्यमातील मित्रांनी याचे विश्लेषण केले तर त्यांच्या लक्षात येईल की गेल्या काही काळापासून आपल्या सभागृहाचा वापर निवडणुकीच्या तयारीसाठी किंवा पराभवाबद्दलची निराशा व्यक्त करण्यासाठी केला जात आहे. अलीकडे मी पाहिले आहे की काही राज्यांमध्ये काही पक्ष सत्तेत असूनही, सत्ताविरोधी भावना इतकी आहे की ते जनतेपर्यंत जाऊ शकत नाहीत. जनतेमध्ये जाऊन ते त्यांचे विचार व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून, ते आपला सर्व राग येथे सभागृहात काढतात. आणि काही पक्षांनी त्यांच्या राज्याच्या राजकारणासाठी सभागृहाचा वापर करण्याची एक नवीच परंपरा सुरू केली आहे. आता, त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून खेळत असलेल्या खेळावर चिंतन करावे आणि देश या पद्धती स्वीकारत नाही. हे लक्षात घेऊन आपल्या धोरणात थोडे बदल करावे. त्यांनी कशी कामगिरी करावी, याबद्दल सूचना द्यायला मी तयार आहे. पण खासदारांचे अधिकार धोक्यात आणू नका. त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची संधी द्या. तुमच्या निराशेमुळे आणि पराभवामुळे खासदारांचे बलिदान देऊ नका. आपण सर्वजण या जबाबदाऱ्या पार पाडू, अशी आशा मला वाटते. पण मी देशाला खात्री देतो की राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर आहे. राष्ट्र नवीन उंची गाठण्यासाठी पुढे जात आहे आणि हे सभागृह देखील देशाला नवीन ऊर्जा आणि ताकदीने भरण्याचे काम करेल. याच विश्वासासह अनेकानेक आभार.

 


नेहा कुलकर्णी/माधुरी पांगे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2200284) अभ्यागत कक्ष : 31