पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार


नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

Posted On: 06 NOV 2025 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्हेंबर 2025

 

भारतातील आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:15 वाजता वाराणसीला भेट देतील आणि चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

नागरिकांना जागतिक दर्जाच्या रेल्वे सेवांद्वारे सुलभ, जलद आणि अधिक आरामदायी प्रवास प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी हा आणखी एक मैलाचा दगड आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बेंगळुरू मार्गांवर धावतील. प्रमुख ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करून, या गाड्या प्रादेशिक गतिशीलता वाढवतील, पर्यटनाला चालना देतील आणि देशभरातील आर्थिक घडामोडींना चालना देतील.

बनारस-खजुराहो वंदे भारत या मार्गावर थेट कनेक्टिव्हिटी स्थापित करेल आणि सध्या कार्यरत असलेल्या विशेष गाड्यांच्या तुलनेत सुमारे 2 तास 40 मिनिटे वेळ वाचवेल. बनारस-खजुराहो वंदे भारत एक्सप्रेस भारतातील काही अत्यंत प्रसिद्ध  धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडेल, ज्यात वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट आणि खजुराहो यांचा समावेश आहे. यामुळे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनच बळकट होणार नाही तर यात्रेकरू आणि प्रवाशांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ खजुराहो येथे जलद, आधुनिक आणि आरामदायी प्रवासाची संधी मिळेल.

लखनौ-सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 7 तास 45 मिनिटांत प्रवास पूर्ण करेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ जवळजवळ 1 तास वाचेल. लखनौ-सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेसमुळे लखनौ, सीतापूर, शाहजहांपूर, बरेली, मुरादाबाद, बिजनौर आणि सहारनपूर येथील प्रवाशांना खूप फायदा होईल, तसेच रुरकीमार्गे पवित्र हरिद्वार शहरापर्यंत पोहोचण्यासही मदत होईल. मध्य आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सुरळीत आणि जलद आंतरशहर प्रवास सुनिश्चित करून, ही सेवा कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक विकास वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत ही या मार्गावरील सर्वात जलद गाडी  असेल, जी फक्त 6 तास 40 मिनिटांत प्रवास पूर्ण करेल. फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस राष्ट्रीय राजधानी आणि पंजाबमधील फिरोजपूर, भटिंडा आणि पटियाला यासारख्या प्रमुख शहरांमधील संपर्क मजबूत करेल. या गाडीमुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढतील, ज्यामुळे सीमावर्ती प्रदेशांच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान मिळेल आणि राष्ट्रीय बाजारपेठांशी अधिक एकात्मता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.

दक्षिण भारतात, एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत गाडी  प्रवासाचा 2 तासांपेक्षा जास्त वेळ कमी करत, प्रवास 8 तास 40 मिनिटांत पूर्ण करेल. एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस प्रमुख आयटी आणि व्यावसायिक केंद्रांना जोडेल, ज्यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवास पर्याय उपलब्ध होईल. या मार्गामुळे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील आर्थिक घडामोडी आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे प्रादेशिक विकास आणि सहकार्याला पाठिंबा मिळेल.

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187023) Visitor Counter : 9