कृषी मंत्रालय
विकसित कृषी संकल्प अभियानाच्या 8 व्या दिवशी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांशी साधला संवाद
Posted On:
05 JUN 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
‘विकसित कृषी संकल्प अभियान’ आता अर्ध्या टप्प्यावर पोहोचले आहे. आतापर्यन्त देशभरातील लाखो शेतकरी या अभियानात सहभागी झाले आहेत. मोहिमेच्या 8 व्या दिवशी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी बोलताना,चौहान यांनी मोहिमेचे उद्दिष्ट "प्रयोगशाळेपासून जमिनीपर्यंत" वैज्ञानिक ज्ञानाचे रूपांतर करून कृषी संशोधन आणि शेतकरी समुदायामधील दरी भरून काढणे आहे,यावर भर दिला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कृषी शास्त्रज्ञ स्थानिक परिस्थितीविषयी आधीच पूर्ण कल्पना घेवून गावांना भेट देतात आणि त्यानुसार शेतकऱ्यांशी संवाद साधतात, मातीतील पोषक तत्वे, हवामान आणि योग्य पिकांच्या जातींवर आधारित उत्पादकता सुधारण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन करतात. या संवादादरम्यान गोळा केलेली माहिती संशोधनासाठी शेताच्या वास्तविक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जात आहे.
पंजाबच्या शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत चौहान म्हणाले की, पंजाबने दीर्घकाळ भारताचे अन्नधान्याचे कोठार म्हणून काम केले आहे. ज्यावेळी भारताला पीएल-480 कराराअंतर्गत कमी दर्जाच्या गव्हाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागत होते त्या दिवसांची आठवण करून देत शिवराज सिंह यांनी असे अवलंबित्व संपवण्याचे श्रेय हरित क्रांतीला दिले. त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे आणि समर्पणाचे कौतुक केले. त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान दिल्याबद्दल प्रशंसा केली आणि देशाच्या कृषी प्रगतीत ते बजावत असलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
मंत्र्यांनी या वर्षी झालेल्या गव्हाच्या विक्रमी उत्पादनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि तांदूळ, मका, भूईमूग, सोयाबीन, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनातही अशीच वाढ झाली असल्याचे नमूद केले.
शेतकरी बांधवांनी कीटकनाशकांच्या वापर संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे, असे अधोरेखित करून मंत्री शिवराज सिंह म्हणाले की, कीटकनाशकांचा जास्त वापर केला गेला तर केवळ खर्चच वाढत नाही तर पिकांच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो.
मंत्री चौहान यांनी नमूद केले की, पंजाबची सुपीक जमीन फलोत्पादनासह विविध प्रकारच्या पिकांसाठी योग्य आहे आणि निर्यात-गुणवत्तेची फळे आणि भाज्यांचे उत्पादन करण्याची प्रचंड क्षमता आहे. या संधींचा फायदा घेण्यासाठी आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134276)