कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘राष्ट्रीय कृषी-अक्षय ऊर्जा शिखर परिषद 2025’ मध्ये घेतला सहभाग


शेती आणि अक्षय ऊर्जा एकत्रित करून नवीन मॉडेल विकसित करण्याविषयी चर्चा

Posted On: 04 JUN 2025 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2025

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सौर ऊर्जा महासंघ (एनएसईएफआय) द्वारे आयोजित राष्ट्रीय कृषी-अक्षय ऊर्जा परिषदेत भाग घेतला. या प्रसंगी त्यांनी कृषी आणि अक्षय ऊर्जा यावरील महासंघाचा अहवाल आणि वार्षिक संदर्भ पुस्तिका प्रकाशित केली.कृषी क्षेत्रात अक्षय ऊर्जेच्या एकत्रीकरणाबाबत धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये संवाद आणि सहकार्याला चालना देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 

कृषी मंत्री  चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 -15  पासून कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे, एकूण उत्पादनात 40% वाढ नोंदवली गेली आहे. गहू, तांदूळ, मका आणि भूईमूग यांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी आता डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे.

देशातील 50 % लोकसंख्या अजूनही रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे त्‍यामुळे "भारत शेतीशिवाय कार्यरत राहू शकत नाही," ही गोष्‍ट त्यांनी अधोरेखित केली. बदलत्या काळाशी स्पर्धा करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे,असेही  ते म्हणाले. या प्रणालींद्वारे, सीमांत शेतकरी त्यांच्या जमिनीच्या प्रत्येक भागाचा कमाल  वापर करू शकतात आणि समृद्धीकडे वाटचाल करू शकतात.

याप्रसंगी कृषी मंत्री चौहान म्हणाले की, सौर पॅनेल शेतकऱ्यांना वीज पुरवण्याचा एक प्रमुख स्रोत असू शकतात आणि त्यांच्यासाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पीएम-कुसुम योजना या दिशेने काम करत आहे.

यावेळी कृषी मंत्री चौहान यांनी, ज्या शेतात पिके उंच  वाढतात,  त्या शेतात उन्नत सौर पॅनेल बसवण्यासाठी   मॉडेलचा प्रस्ताव मांडला. असे मॉडेल लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना अन्न आणि ऊर्जा पुरवठादारांमध्ये रूपांतरित करू शकतात. त्यांनी या मॉडेलचा अधिक गांभीर्याने विचार आणि विकास करण्याचे आवाहन केले आणि जर त्याचे प्रभावी आणि आधुनिक आवृत्त्या पुढे आणल्या गेल्या तर सरकार त्याच्या अंमलबजावणीला नक्कीच पाठिंबा देईल असे आश्वासन दिले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, शिवराज सिंह  चौहान यांनी 5 जून रोजी होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाला अर्थपूर्ण महत्त्व देण्याचे आवाहन केले; आणि सांगितले की, सौर ऊर्जा पर्यावरण संवर्धनात एक मैलाचा दगड ठरू शकते.


S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2133937)