पंतप्रधान कार्यालय

78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले

Posted On: 15 AUG 2024 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024

त्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे:

  1. सर्वसाधारण
    • आमचा केवळ एकच निर्धार- राष्ट्र सर्वप्रथम. आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च स्थानी.
    • जागतिक स्तरावर भारताचा नावलौकिक  वाढला आहे आणि भारताबद्दलची जगाची धारणा बदलली आहे.
    • माझ्या देशातल्या 140 कोटी नागरिकांनी,माझ्या 140 कोटी कुटुंबियांनी निर्धार केला, दिशा निश्चित केली आणि खांद्याला खांदा भिडवून  ते आगेकूच करत राहिले तर कितीही मोठी आव्हाने असली,संसाधनांची कितीही तीव्र टंचाई किंवा संघर्ष असला तरी आपण प्रत्येक आव्हानावर मात करू शकतो आणि समृद्ध भारत साकारु शकतो आणि 2047 पर्यंत विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करू शकतो.
    • देशासाठी जगण्याच्या कटिबद्धतेतून विकसित भारत साकारू शकतो.
    • विकसित भारत 2047 साठीच्या कटिबद्धतेत  प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि संकल्प स्पष्ट दिसत आहे.
    • आजच्या भारतात माय-बाप सरकार या संस्कृतीला थारा नाही.
    • जेव्हा देशातल्या लोकांचे विचार इतके विशाल आणि स्वप्ने भव्य असतात, त्यांचा निर्धार शब्दातून प्रतीत होतो तेव्हा आमच्यामध्ये नवा संकल्प दृढ होतो.
    • राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी अतिशय निष्ठेने आणि वचनबद्धतेने आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या महान लोकांप्रति मी आदरभावना व्यक्त करतो.
    • आपली जाज्वल्य देशभक्ती आणि लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास संपूर्ण जगासाठी प्रेरणा ठरली आहे.
    • जैसे-थे या मानसिकतेतून बाहेर पडून आपण विकास आणि सुधारणा याकडे वळलो आहोत.
    • आमचा सुधारणांचा मार्ग हा विकासाचा पथदर्शी आराखडा ठरला आहे.
    • जागतिक स्थिती झाकोळलेली असली तरी संधीच्या दृष्टीकोनातून  भारतासाठी हा सुवर्ण काळ आहे.
    • आपण ही संधी गमावता कामा नये.आपण या क्षणाचा लाभ घेत, आपली स्वप्ने आणि संकल्पासह आगेकूच केली तर स्वर्णिम भारत (सुवर्णमय भारत) या राष्ट्राच्या आकांक्षेची आपण पूर्तता करू शकू आणि 2047 पर्यंत विकसित भारत हे आपले उद्दिष्ट साध्य करू शकू.
    • प्रत्येक क्षेत्रात नवी आणि आधुनिक व्यवस्था उभारण्यात येत आहे मग ते पर्यटन क्षेत्र असो,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र असो, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, शेती किंवा कृषी क्षेत्र असो.  
    • जगातल्या सर्वोत्तम प्रथांचा अवलंब करतानाच आपल्या देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीला अनुसरून प्रगती साधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
    • प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची सांगड घालण्यावर भर देतानाच आधुनिकता आणि नावीन्यतेची आवश्यकता आहे.
    • सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सरकारची दखल किमान राखणे हा आमच्या विकसित भारत 2047 च्या उद्दिष्टाचा महत्वाचा भाग आहे.
    • देशभरात कार्यरत असलेल्या 3 लाख संस्थांमध्ये किमान दोन वार्षिक सुधारणा अनिवार्य, तरच वर्षाला सुमारे 25-30 लाख सुधारणांकडे वाटचाल होऊन सामान्य जनतेचा विश्वास वाढेल.
    • तीन महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतानाच प्रत्येक क्षेत्रात विकासाला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सर्वप्रथम आपण सर्व क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण केल्या पाहिजेत.दुसरे म्हणजे विकसित होणाऱ्या प्रणालींसाठी आवश्यक सहाय्यकारक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आपण काम केले पाहिजे आणि तिसरे म्हणजे आपल्या नागरिकांसाठीच्या मुलभूत सुविधांना प्राधान्य देत  त्या वृद्धिंगत केल्या पाहिजेत.
    • नैसर्गिक आपत्ती या आपल्यासाठी चिंतेची मोठी बाब ठरत आहे.
    • नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्यांप्रति मी संवेदना व्यक्त करतो आणि संकटाच्या या क्षणाला संपूर्ण देश तुमच्या समवेत आहे असे आश्वस्त करू इच्छितो.  
    • आमच्या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी करूणा आहे.समानता आणि करुणा या दोन्हीनाही आमच्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवत आम्ही वाटचाल करत आहोत.
    • तुम्हा प्रत्येकाच्या,प्रत्येक कुटुंबाच्या आणि प्रत्येक क्षेत्राच्या सेवेसाठी आम्ही इथे आहोत.
    • विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आम्हाला दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि राष्ट्र सेवेसाठी आमची निवड केल्याबद्दल, आज लाल किल्याच्या या तटावरून मी कृतज्ञतेने नतमस्तक होऊन कोट्यवधी देशवासीयांचे आभार मानतो.
    • आपल्याला नव्या उमेदीने नव्या शिखराकडे आगेकूच करायची आहे हा विश्वास मी आपणा सर्वाना देतो.
    • किनाऱ्यावर राहून बघत राहणाऱ्या आणि छोट्या यशाने हुरळून जाणाऱ्यांपैकी आम्ही नव्हे.
    • नवे ज्ञान आणि लवचिकता प्राप्त करणाऱ्या संस्कृतीचे आम्ही पाईक आहोत,जे अथकपणे उच्च आकांक्षांसाठी मार्गक्रमण करत राहतात.
    • आम्ही विकासाची नवी शिखरे साध्य करू इच्छितो आणि आमच्या नागरिकांमध्येही ही सवय बिंबावी  अशी आमची इच्छा आहे.
    • काही लोकांचा विशिष्ट गट आहे जो स्वतःच्या कल्याणापलीकडे विचार करू शकत नाही आणि इतरांच्या कल्याणाची त्यांना पर्वा नाही.अशा व्यक्ती, त्यांच्या विकृत विचारसरणीमुळे  चिंतेचा विषय आहेत. देशाने अशा लोकांना टाळायला हवे जे निराशेने घेरलेले आहेत.
    • हे नैराश्यवादी घटक हताश तर आहेतच त्याचबरोबर ते विध्वसंक स्वप्नांची नकारात्मक मानसिकता जोपासत आहेत जी आपल्या सामूहिक प्रगतीला खीळ घालत आहे. हा धोका देशाने ओळखायला हवा.
    • आमच्या सदहेतूने, प्रामाणिकपणाने आणि राष्ट्राप्रति निष्ठेने, आम्हाला विरोध  करणाऱ्यांनाही आम्ही जिंकून घेऊ असा विश्वास मी माझ्या नागरिकांना देऊ इच्छितो.
    • आमच्या कटिबद्धतांची पूर्तता करण्यासाठी, 140 कोटी नागरिकांचे भवितव्य बदलण्यासाठी, त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याकरिता  आणि देशाचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही.
    • सर्व स्तरावरच्या भ्रष्टाचाराने, सामान्य जनतेचा यंत्रणेवरील विश्वास ध्वस्त झाला आहे.
    • भ्रष्टाचाऱ्यांवर जरब राहील असे वातावरण मी निर्माण करू इच्छितो जेणेकरून सामान्य जनतेची लुट करण्याची प्रथा संपुष्टात येईल.
    • समाजात ही बीजे रोवण्याचा प्रयत्न आणि भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्वीकारण्याचे सातत्याने वाढते प्रयत्न हे निकोप समाजासाठी महत्वाचे आव्हान ठरत असून त्याचबरोबर चिंतेचा विषयही आहे.
    • संविधान गेली 75 वर्षे भारताची लोकशाही बळकट करत करत आहे. संविधानाने आपल्या दलित, पीडित, शोषित आणि समाजाच्या वंचित घटकांचे अधिकार सुनिश्चित केले आहेत.
    • आपल्या संविधानाची 75 वर्षे आपण साजरी करत असताना संविधानातल्या निहित कर्तव्यांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे नागरिकांसाठी महत्वाचे आहे.
    • कर्तव्याने बांधील राहण्याची जबाबदारी नागरिकांच्या पलीकडे जात देशातल्या विविध संस्थानांही  लागू होते.
    • आपण जेव्हा आपली जबाबदारी सामूहिकरित्या पार पडतो तेव्हा आपण नैसर्गिकरीत्या परस्परांच्या अधिकारांचे रक्षक होतो.
    • आपल्या कर्तव्यांचे पालन करून आपण कोणतेही जास्तीचे प्रयत्न न करता स्वाभाविकपणे या अधिकारांचे रक्षण करतो.
    • घराणेशाहीचे राजकारण आणि जातीयवाद भारताच्या लोकशाहीला मोठे नुकसान पोहोचवत आहेत.
    • 21 वे शतक हे भारताचे शतक राहील, या शतकात ‘स्वर्णिम भारत’ (सुवर्णमय भारत) बनेल आणि विकसित भारत घडेल याची सुनिश्चिती करण्यासाठी आपण आपल्या आकांक्षांशी आणि प्रयत्नांशी दृढ राहिले पाहिजे आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या दिशेने आगेकूच करत राहिले पाहिजे.
    • मी आपणा सर्वांसाठी जगतो,आपल्या भविष्यासाठी जगतो, मी भारत मातेच्या उज्वल भविष्यासाठी जगतो.   
  2. संरक्षण मंत्रालय
    • संरक्षण क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण होत आहोत.
    • भारत सावकाशपणे उदयाला येत  आहे आणि विविध संरक्षण उपकरणांचा निर्यातदार आणि उत्पादक  म्हणून स्वतःला सिद्ध  करत आहे.
    • जेव्हा आपले सशस्त्र दल लक्ष्यभेदी हल्ला करते तेव्हा आपले हृदय अभिमानाने भरून येते आणि आपली मान गौरवाने उंचावते.
    • 140 कोटी भारतीयांना आज आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याप्रति अभिमान आणि आत्मविश्वास वाटतो.
  3. वित्त मंत्रालय
    • 'फिनटेक'  म्हणजेच आर्थिक व्यवहारासाठी तंत्रज्ञान वापर या क्षेत्रातील यशाचा भारताला अभिमान आहे.
    • आपण  व्यक्तींचे दरडोई उत्पन्न यशस्वीरित्या दुपटीने वाढवले आहे.
    • रोजगार आणि स्वयंरोजगारात नवीन विक्रम प्रस्थापित करण्यामध्ये आपण लक्षणीय प्रगती केली आहे
    • बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी विविध  सुधारणा लागू करण्यात आल्या. आणि आज त्याचा परिणाम म्हणून आपल्या बँकांनी जगातील निवडक बलाढ्य बँकांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
    • सामान्य गरीब, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मजबूत बँकिंग प्रणाली ही सर्वात मोठी ताकद ठरते.
    • आपल्या एमएसएमई साठी बँका सर्वात मोठा आधार आहेत.
    • समाजातील विविध वंचित घटक उदा.  गुराखी, मच्छीमार, रस्त्यावरील विक्रेते आता बँकांशी जोडले जात आहेत आणि यशाची नवीन शिखरे  गाठत आहेत आणि विकासाच्या मार्गात भागीदार बनत आहेत.
    • देशाच्या प्रगतीसाठी अनेक आर्थिक धोरणे सातत्याने विकसित केली जात आहेत आणि या नवीन प्रणालींवरील देशाचा विश्वास निरंतर  वाढत आहे.
    • जागतिक कोविड महामारीच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेत वेगाने  सुधारणा करणारा कोणता देश असेल तर तो भारत आहे.
    • आपल्या आर्थिक वाढीला आणि विकासाला गती देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि जीवन सुखकर बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे
    • गेल्या दशकात, सरकारी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि रस्त्यांचे जाळे मजबूत करून  पायाभूत सुविधांचा प्रचंड विकास झालेला आपण पाहिला आहे.
    • मी  निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना, पक्ष किंवा राज्य कोणतेही असो , जीवन सुखकर व्हावे यासाठी युद्धस्तरावर पावले उचलण्याचे आवाहन करतो.
    • माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था तर बनेलच पण मी तीन पट काम करेन, तीन पट वेगाने काम करेन, तिप्पट प्रमाणात काम करणार आहे जेणेकरून देशासाठी आपण पाहिलेली स्वप्ने लवकर साकार होतील.
  4. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
    • कृषी क्षेत्रातील परिवर्तन ही काळाची महत्त्वाची गरज आहे.   
    • मी त्या सर्व शेतकऱ्यांचा आभारी आहे ज्यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडला आहे आणि आपल्या धरणी  मातेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे .
    • या वर्षीच्या अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि पाठिंबा  देण्यासाठी भरीव  तरतुदींसह महत्त्वपूर्ण योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
    • आपण जगाचे पोषण अधिक मजबूत  केले पाहिजे आणि भारतातील लहान शेतकऱ्यांचीही मदत केली  पाहिजे.
    • भारत आणि तेथील  शेतकऱ्यांकडे सेंद्रिय खाद्यान्नाचा पेटारा तयार करण्याची क्षमता आहे.
    • साठ हजार ‘अमृत सरोवर’ (तलाव) पुनरुज्जीवित आणि पुन्हा भरण्यात आले आहेत.
  5. परराष्ट्र मंत्रालय
    • इतक्या भव्य पद्धतीने जी -20 चे आयोजन यापूर्वी कधीही झाले नव्हते.
    • भारताकडे प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्याची क्षमता आहे तसेच अतुलनीय आदरातिथ्य आहे.
    • विशेषतः बाह्य आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.
    • मला अशा शक्तींना सांगायचे आहे की भारताच्या विकासामुळे कोणालाही  धोका पोहचणार नाही.
    • आम्ही बुद्धाची भूमी आहोत आणि युद्ध हा आमचा मार्ग नाही. त्यामुळे जगाने काळजी करण्याची गरज नाही.
    • विशेषतः शेजारी देश म्हणून आपली जवळीक पाहता मला आशा आहे की बांगलादेशातील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल.
    • आमच्या 140 कोटी नागरिकांची प्राथमिक चिंता म्हणजे बांगलादेशातील  हिंदू, तेथील अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित व्हावी
    • आपल्या शेजारी देशांनी सुख-समाधान आणि शांततेचा मार्ग अवलंबवावा अशी भारताची नेहमीच इच्छा असते.
    • शांततेप्रति आमची बांधिलकी आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे.
  6. दळणवळण मंत्रालय
    • दोन लाख पंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क स्थापित करण्यात आले आहे.
    • भारत 6G साठी मिशन मोडमध्ये काम करत असून आपण आपल्या प्रगतीने जगाला अचंबित करू.
  7. अंतराळ विभाग
    • अंतराळ क्षेत्र आपल्यासाठी एक नवीन भविष्य खुले करत आहे.
    • भारत अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये वाढ होताना पाहत आहे.
    • आज आपल्या देशात खाजगी उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपित होत आहेत.
    • चांद्रयान मोहिमेच्या यशामुळे आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रति रुची वाढलेली दिसत असून नवीन वातावरण निर्माण झाले आहे.
  8. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
    • गरीब, मध्यमवर्ग, वंचितांचे जीवन, आपली वाढती शहरी लोकसंख्या, युवकांची स्वप्ने आणि संकल्प आणि त्यांच्या आकांक्षा याबाबतीत बदल घडवून आणण्यासाठी आपण सुधारणांचा मार्ग निवडला आहे.
    • जेव्हा राजकीय नेतृत्व सक्षमीकरण आणि विकासाचा दृढनिश्चय करते, तेव्हा सरकारी यंत्रणा देखील सक्षम आणि मजबूत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सुरवात करते.
    • जेव्हा प्रत्येक नागरिक सक्षमीकरण आणि विकास सुनिश्चित करण्यात सक्रियपणे सहभागी  होईल ,तेव्हा त्याचे परिणाम राष्ट्रासाठी बहुमोल ठरतील.
    • देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रत्येक गावात आणि वन क्षेत्रात दूरवरच्या भौगोलिक भागात आधुनिक रुग्णालये आणि आरोग्य मंदिरे बांधली जात आहेत
    • जेव्हा परिपूर्णतेचा मंत्र स्वीकारला जातो तेव्हा "सबका साथ, सबका विकास" चे खरे सार प्रत्यक्षात  येते.    
    • जेव्हा आपण 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढतो, तेव्हा आपला विश्वास दृढ होतो की आपण आपली गती कायम राखली आहे आणि आपली स्वप्ने लवकरच पूर्ण होतील.
    • जेव्हा माझे विशेष दिव्यांग बंधू आणि भगिनी भारतीय सांकेतिक भाषेत संवाद साधू लागतात किंवा सुगम्य भारतच्या माध्यमातून सर्वसमावेशक आणि सुगम्य राष्ट्राच्या मोहिमेचा लाभ घेतात, तेव्हा त्यांना देशाचा नागरिक म्हणून आदर आणि सन्मान वाटतो
    • पॅरालिम्पिकमध्ये आपले  खेळाडू उत्तम कामगिरी करताना पाहणे आनंददायी आहे.
    • आपल्या बहिष्कृत तृतीयपंथी समाजासाठी आम्ही संवेदनशीलतेने निर्णय घेत आहोत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सर्वांसाठी सन्मान, आदर आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या तसेच नवीन कायदे करण्यात आले.
    • आम्ही ‘त्रिविध मार्ग’ (त्रिमार्गी पथ) वर निघालो आहोत आणि सर्वांची सेवा या भावनेचा थेट लाभ  पाहत आहोत.
    • उपेक्षित प्रदेश, उपेक्षित समुदाय, आपले छोटे शेतकरी, जंगलातील आदिवासी बंधू - भगिनी, माता-भगिनी, आपले मजूर आणि आपले कामगार यांना सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि त्यांची उन्नती आणि सक्षमीकरण होईल हे पाहणे हे आपले कर्तव्य आहे.
  9. केंद्रीय शिक्षण मंत्रालय
    • येत्या 5 वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात 75,000 नव्या जागा निर्माण करण्यात येणार आहेत.
    • नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून, आम्हाला 21व्या शतकातील गरजांच्या अनुषंगाने सध्याच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणायचे आहे.
    • आम्ही प्राचीन नालंदा विद्यापीठाचा आत्मा पुनरुज्जीवित करून उच्च शिक्षण आणि संशोधनाला चालना देत भारताला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून स्थापित करू.
    • वेगवान विकास प्रक्रियेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला भारतामध्ये भविष्याच्या दृष्टीने सज्ज कुशल साधनसंपत्तीची तयारी केली पाहिजे.
    • आपल्या देशातील तरुण उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार नाहीत, अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली आम्हाला विकसित करायची आहे. आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना लाखो आणि कोट्यवधी रुपये खर्चण्याची गरज नाही. एवढेच नव्हे तर, त्याऐवजी, आम्हाला अशा शिक्षण संस्था देखील उभारायच्या आहेत ज्या परदेशातील लोकांना भारताकडे आकृष्ट करतील,
    • भाषेमुळे भारतातील प्रतिभेला अडथळा निर्माण व्हायला नको. मातृभाषेची ताकद आपल्या देशातील अगदी गरीब विद्यार्थ्याला देखील त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम करते.
    • संशोधन कार्याला सतत बळ देणारी कायमस्वरूपी व्यवस्था विकसित करण्यासाठी, ‘राष्ट्रीय संशोधन संस्था’ स्थापन करण्यात आली असून तिला कायद्याची चौकट पुरवण्यात आली आहे.
    • अर्थसंकल्पामध्ये आपण संशोधन तसेच नवोन्मेष कार्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला असून ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे आणि त्यातून आपल्या देशातील युवकांच्या संकल्पना प्रत्यक्षात साकार करता येतील.
  10. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय
    • किशोरवयीन मुले-मुली, शेतकरी, महिला आणि आदिवासी यांच्यापैकी प्रत्येकाने सातत्याने गुलामगिरीविरोधात लढा दिला आहे.
    • गावे, डोंगर आणि जंगलात अगदी दूरवरच्या विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक आदिवासी भाऊबंदापर्यंत पंतप्रधान जन मन योजनेचे लाभ पोहोचणे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाही.
    • लवकरच भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती येत आहे, अशावेळी आपण त्यांच्या वारशापासून प्रेरणा घ्यायला हवी.
  11. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय
    • विकसित भारतातील पहिल्या पिढीवर विशेष लक्ष केंद्रित करून आम्ही राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात केली आहे.
    • गेल्या दशकात 10 कोटी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत.
    • महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या की त्या सामाजिक परिवर्तनाच्या हमीदार आणि संरक्षक होतात.
    • 1 कोटी माता-भगिनी स्वयंसहाय्यता बचत गटांशी जोडल्या गेल्या असून या  महिला आता ‘लखपती दीदी’ होत आहेत.
    • महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली असून आता त्यांना 10 लाख रुपयांऐवजी 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
    • या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत 9 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
    • आमच्या सरकारने कामकरी महिलांच्या भरपगारी बाळंतपणाचा कालावधी 12 आठवड्यांवरुन वाढवून 26 आठवडे केला.
    • महिला आता नेतृत्वाच्या भूमिका स्वीकारत आहेत. आज अनेक क्षेत्रांत- मग ते आपले संरक्षण क्षेत्र असो, हवाई दल, लष्कर, नौदल अथवा आपले अंतराळ क्षेत्र असो- सर्वत्र आपल्याला आपल्या महिलांचे सामर्थ्य आणि क्षमता यांचे दर्शन घडत आहे.
    • एक समाज म्हणून आपण आपल्या माता, भगिनी आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचारांबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे.
    • महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास कोणत्याही विलंबाविना झाला पाहिजे. आपले सरकार, न्यायव्यवस्था आणि नागरी समाज यांच्यावरील विश्वास पुनर्स्थापित व्हावा म्हणून अशी राक्षसी कृत्ये करणाऱ्यांवर प्रथमदर्शनी गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
    • शिक्षा झालेल्या गुन्हेगारांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होणे ही काळाची गरज आहे जेणेकरुन अशी पापी कृत्ये करणाऱ्यांना फाशीसह इतर परिणामांची भीती वाटली पाहिजे. मला असे वाटते की ही भीती निर्माण होणे महत्त्वाचे आहे.
  12. आरोग्य आणि कुटुंब कल्‍याण मंत्रालय
    • भारताला ‘स्वस्थ भारत’ बनविण्‍याच्या मार्गावर वाटचाल करणे आवश्यक आहे.
    • भारताने कोविड प्रति‍बंधक  लस  तयार करून, कोट्यवधी लोकांसाठी सर्वात जलद लसीकरण मोहीम पार पाडली.
  13. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
    • भारताने आता हरित वाढ आणि हरित क्षेत्रातील नोकऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
    • हवामान बदलाच्या आव्‍हानाला सामोरे जाण्यासाठी  भारताच्या प्रयत्नांमध्ये हरित नोकऱ्या अत्यावश्यक आहेत.
    • भारत हरित हायड्रोजन मोहिमेद्वारे जागतिक केंद्र बनण्यासाठी वचनबद्ध आहे.
    • एकल  वापराच्या  प्लास्टिकवर बंदी घालण्यात भारत आघाडीवर  आणि आमच्या अक्षय ऊर्जा प्रयत्नांना लक्षणीयरीत्या पुढे नेण्यात भारत अग्रगण्य होता.
    • जी 20 राष्ट्रांमध्ये भारत हा एकमेव देश आहे,  ज्याने आपल्या पॅरिस कराराची उद्दिष्टे वेळेपूर्वी पूर्ण केली आहेत.
    • आम्ही आमचे अक्षय उर्जेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आणि आता  2030 पर्यंत 500 गीगा वॅट  नवीकरणीय ऊर्जेचे लक्ष्य गाठण्याची  आमची  महत्त्वाकांक्षा आहे. ती पूर्ण करण्‍यासाठी आम्ही काम करत आहोत.
  14. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
    • "वोकल फॉर लोकल" हा आर्थिक विकासाचा नवा मंत्र बनला आहे.
    • “एक जिल्हा एक उत्पादन” या संकल्‍पनेची आता नवीन लाट आली आहे.
    • भारत एक औद्योगिक उत्पादन केंद्र बनेल आणि संपूर्ण जगाचे  त्याकडे लक्ष वेधले जाईल.
    • आपण "डिझाइन इन इंडिया" चे आवाहन स्वीकारले पाहिजे आणि आपल्याला "डिझाइन इन इंडिया आणि डिझाईन फॉर द वर्ल्ड" चे स्वप्न घेऊन पुढे जायचे आहे.
    • राज्य सरकारांनी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आपल्या धोरणांमध्‍ये स्पष्‍टता आणली पाहिजे. तसेच राज्यांनी सुशासनाची हमी देण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर विश्वास सुनिश्चित झाला पाहिजे.  
    • सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक नेता बनण्यासाठी भारताची वचनबद्धता
    • ‘मेड इन इंडिया गेमिंग’ म्हणजे भारतामध्‍ये बनविण्‍यात आलेल्या विविध खेळांची उत्पादने बाजारपेठेत आणण्यासाठी भारताने आपल्या समृद्ध प्राचीन वारशाचा आणि साहित्याचा लाभ घेतला पाहिजे.
    • भारतीय व्यावसायिकांनी जागतिक बाजारपेठेत ‘गेमिंग मार्केट’चे नेतृत्व केले पाहिजे, केवळ खेळण्यातच नव्हे तर विविध खेळ तयार करण्यातही आघाडी मिळवली पाहिजे.
    • भारतीय मानकांनी आंतरराष्ट्रीय ‘बेंचमार्क’ गाठताना, आपणच वैशिष्‍ट्यपूर्ण मापदंड बनण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे.
    • जागतिक विकासात भारताचे योगदान मोठे आहे, आमची निर्यात सातत्याने वाढत आहे, आमच्या परकीय चलनाचा साठा दुप्पट झाला आहे आणि जागतिक संस्थांचा  भारतावर दिवसेंदिवस अधिक  विश्वास बसत आहे.
    • आम्हाला अभिमान आहे की, आमचा खेळणी उद्योग जागतिक बाजारपेठेतही नावारूपाला आला आहे. आम्ही खेळण्यांची निर्यात सुरू केली आहे.
    • एक काळ असा होता जेव्हा मोबाईल फोन आयात केले जात होते, परंतु आज भारतामध्ये मोबाईल फोनच्या उत्पादनाचे मोठे केंद्र आहे आणि आम्ही त्यांची जगभरात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. हा एक  भारताचा पराक्रम आहे.
  15. रेल्वे मंत्रालय
    • वर्ष 2030 पर्यंत आपली रेल्वे निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
  16. जलशक्ती मंत्रालय
    • आज प्रत्येक कुटुंब स्वच्छ वातावरण स्वीकारत आहे आणि स्वच्छता विषयावरील संवादाला प्रोत्साहन देत आहे.
    • स्वच्छतेच्या सवयी आणि पर्यावरणाबाबत सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक नागरिक जबाबदारीने वागतो आणि एकमेकांची तशाच पद्धतीने  तपासणीही केली जाते.
    • आज 12 कोटी कुटुंबांना जलजीवन मोहिमेद्वारे अल्प कालावधीत स्वच्छ नळपाणी पुरवठा केला गेला आहे.
  17. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
    • चार कोटी पक्की घरकुले बांधल्यामुळे गरीबांना नवजीवन मिळाले आहे.
    • हा राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेण्याच्या प्रयत्नानुसार  तीन कोटी नवीन घरांचे आश्वासन दिले आहे.
  18. पशुसंवर्धन मंत्रालय
    • सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करण्याबरोबरच, आमच्या मच्छीमार आणि पशुपालकांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणे हा आमच्या धोरणांचा भाग आहे.  आमचे हेतू, आमच्या सुधारणा, आमचे कार्यक्रम आणि आमच्या कार्यशैलीचा तो एक भाग आहे.
  19. सांस्कृतिक मंत्रालय
    • आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करतो. आपला देश त्यांच्या बलिदानाचा आणि सेवेचा सदैव ऋणी राहील.
    • स्वातंत्र्यदिन हा त्यांचे धैर्य, संकल्प आणि देशभक्ती या सद्गुणांचे स्मरण करण्याचा सण आहे.  या शूरवीरांमुळेच स्वातंत्र्याच्या या सणात मोकळे श्वास घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे.  हा देश त्यांचा सदैव ऋणी राहील.
    • आज, संपूर्ण राष्ट्र तिरंग्याखाली एकवटले आहे — जात, पंथ, उच्च-वर्ग किंवा निम्न-वर्ग असा कोणताही भेद न करता प्रत्येक घर तिरंग्याने सजले आहे;  आपण सर्व भारतीय आहोत.  ही एकता आपल्या योग्य दिशा दर्शनाच्या ताकदीचा दाखला आहे.
  20. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
    • भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात जी 20 राष्ट्रांच्या एकत्रित क्षमतेपेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य केले आहे. 
    • भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
    • पीएम सूर्य घर मोफत वीज योजना नवीन शक्ती प्रदान करण्यासाठी सज्ज आहे आणि त्याचा फायदा आपल्या देशातील सर्वसाधारण कुटुंबांना, विशेषत: मध्यमवर्गीयांना, जेव्हा त्यांचे वीज बिल मोफत होईल तेव्हा त्यांना जाणवेल. पीएम सूर्य घर योजनेंतर्गत जे सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करतात, त्यांचा इंधनाचा खर्चही कमी होऊ शकतो.
    • इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे.
  21. उर्जा मंत्रालय
    • जेव्हा एका सामान्य माणसाला लाल किल्ल्यावरून हे कळते की भारतातील 18,000 गावांना विशिष्ट कालमर्यादेत वीज पुरवली जाईल आणि ते वचन पूर्ण होईल, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणखी बळकट होतो.
    • अजूनही 2.5 कोटी भारतीय कुटुंबे विजेशिवाय अंधारात जगत आहेत.
  22. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
    • दुर्गम गावे आणि सीमावर्ती भाग या प्रदेशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही या भागांना जोडणारे रस्ते बांधले आहेत.
    • या मजबूत पायाभूत सुविधांच्या जाळ्यांद्वारे, आम्ही दलित, पीडित, शोषित, वंचित, मागास, आदिवासी, तसेच जंगले, डोंगर आणि दूरच्या सीमावर्ती भागातील रहिवासी यांच्या गरजा पूर्ण करू शकलो आहोत.
  23. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
    • भारतातील तरुणांना प्रशिक्षित करणे आणि जगाचे कौशल्य भांडवल बनणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
    • 1 लाख तरुणांना, विशेषत: ज्यांच्या कुटुंबाला राजकारणाचा इतिहास नाही अशा तरुणांना राजकीय व्यवस्थेत सामील करून घ्यावे.
    • जमिनीच्या छोट्या भूखंडावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची आव्हाने लक्षात घेता, नवीन नोकऱ्या सुरक्षित करण्यासाठी आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करुन तरुणांना सुसज्ज करण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक प्रयत्न करत आहोत.
    • 140 कोटी देशबांधवांच्या वतीने, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या देशाच्या सर्व खेळाडू आणि खेळाडूंचे मी अभिनंदन करतो.
    • मी आपल्या सर्व पॅरालिम्पिक खेळाडूंना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
    • आपले ध्येय स्पष्ट आहे: 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धांचे भारतीय भूमीवर आयोजन करणे.  आम्ही यासाठी तयारी करत आहोत आणि त्या दिशेने लक्षणीय प्रगती करत आहोत.
  24. ईशान्य क्षेत्र विकास विभाग (डोनर) मंत्रालय
    • ईशान्य भारत आता वैद्यकीय पायाभूत सुविधांचे केंद्र बनले आहे आणि या परिवर्तनामुळे आम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत सुलभ आरोग्यसेवा पुरवून सर्वांच्या जीवनाला स्पर्श करण्यास मदत झाली आहे.
  25. कौशल्य विकास मंत्रालय
    • आमच्या युवकांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सक्रियपणे पावले उचलत आहे.
    • कौशल्य भारत कार्यक्रमासाठी या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
    • या अंदाजपत्रकामध्ये युवकांसाठी  आंतरवासितेवर (इंटर्नशिप) भर देण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना अनुभव पण मिळवता येतो, त्यांची क्षमता सुद्धा वाढवता येते आणि त्यांच्या कौशल्यांना बाजारात सादर करता येते.
    • भारतातील कुशल मनुष्यबळ जागतिक रोजगार बाजारपेठेत आपला ठसा उमटवेल. आम्ही या स्वप्नाकडे पुढे चाललो आहोत.
  26. कायदा आणि न्याय मंत्रालय
    • सध्याची नागरी संहिता एक सांप्रदायिक नागरी संहिता आहे, जी भेदभावपूर्ण आहे.
    • धर्माच्या आधारे आपले राष्ट्र विभाजित करणारे आणि भेदभावाला प्रोत्साहन देणारे कायदे आधुनिक समाजात मान्य नाहीत.
    • 75 वर्षांच्या सांप्रदायिक नागरी संहितेनंतर, धर्मनिरपेक्ष नागरी संहिकेकडे जाणे आवश्यक आहे.
    • आपल्या संविधानाच्या रचना करणाऱ्यांची दृष्टी साकार करण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे.
    • धर्मनिरपेक्ष नागरी संहितेबाबत विविध मते आणि दृष्टिकोनांचे स्वागत करायला हवे.
    • “एक देश, एक निवडणूक” या संकल्पनेला भारताने स्वीकारले पाहिजे.
    • 1500 पेक्षा जास्त कायदे रद्द करण्यात आले आहेत जेणेकरून नागरिक कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नयेत.
    • आम्ही शतकानुशतके जुने असलेले फौजदारी कायदे नव्या फौजदारी कायद्यांनी बदलले आहेत, ज्यांना “भारतीय न्याय संहिता” असे नाव दिले आहे, ज्याचा मुख्य उद्देश नागरिकांसाठी न्याय सुनिश्चित करणे आहे, जो ब्रिटिशांच्या शिक्षा आणि दंड या विचारसरणीच्या विरोधात आहे.

**काही मुद्द्यांमध्ये एकापेक्षा जास्त मंत्रालयांचा सहभाग असू शकतो, त्यामुळे त्यांची पुनरावृत्ती होऊ शकते.

 

* * *

Patil/JPS/Shilpa/Akude/Nilima/Sushma/Sanjana/Suvarna/Shraddha/Gajendra/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2045722) Visitor Counter : 41