पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे संत मीराबाई जन्मोत्सवात झाले सहभागी


संत मीराबाई यांची 525 वी जयंती हा केवळ सोहळा नसून भारतीय संस्कृती आणि प्रेमाच्या परंपरेचा उत्सव असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

मीराबाईंनी भक्ती आणि अध्यात्मवादाने भारताचे चैतन्य जोपासले: पंतप्रधान

भारत युगानुयुगे नारी शक्तीला समर्पित आहे: पंतप्रधान

मथुरा आणि ब्रजभूमी विकासाच्या शर्यतीत मागे राहणार नाही: पंतप्रधानांचा विश्वास

ब्रजभूमीतील घडामोडी देशाच्या जाणिवांच्या पुनर्जागरणाच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

Posted On: 23 NOV 2023 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे संत मीराबाई यांच्या 525 व्या  जयंती निमित्त आयोजित संत मीराबाई जन्मोत्सव कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधानांनी यावेळी संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केले. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. संत मीराबाई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वर्षभर चालणार्‍या कार्यक्रमांची आज सुरुवात झाली.  

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी ब्रजभूमी आणि ब्रजवासियांना भेट देऊन  आपल्याला आनंद आणि कृतज्ञता वाटत असल्याचे सांगितले. ब्रज भूमीच्या दैवी महात्म्याला त्यांनी आदरांजली वाहिली. भगवान श्रीकृष्ण, राधा राणी, मीराबाई आणि ब्रज भूमीच्या सर्व संतांना त्यांनी नमन केले. मथुरेच्या खासदार म्हणून हेमा मालिनी यांनी घेतलेल्या परिश्रमांची  पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि म्हणाले की भगवान कृष्ण यांच्या भक्तीमध्ये त्या बुडून गेल्या आहेत.

भगवान श्रीकृष्ण आणि मीराबाई यांचा गुजरातशी असलेला संबंध अधोरेखित करत, आपली मथुरा भेट अधिक खास ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. "गुजरातला भेट दिल्यावर मथुरेच्या कन्हैय्याचे द्वारकाधीशामध्ये रूपांतर झाले", यावर भर देत, ते म्हणाले की, संत मीराबाई ज्या मुळच्या राजस्थानच्या होत्या, आणि ज्यांच्या वास्तव्याने मथुरेचा परिसर प्रेम आणि आपुलकीने समृद्ध झाला, त्या मीराबाई यांनी आपला अंतिम काळ गुजरातमध्ये द्वारका येथे व्यतीत केला. गुजरातमधील लोकांना उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पसरलेल्या ब्रज भूमीला भेट देण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांना ते द्वारकाधीशाचे वरदान वाटते, असे त्यांनी नमूद केले. 2014 मध्ये वाराणसीचे खासदार झाल्यापासून आपणही उत्तरप्रदेशचा एक भाग झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

संत मीराबाई यांची 525 वी जयंती हा केवळ सोहळा नसून भारतीय संस्कृती आणि प्रेमाच्या परंपरेचा उत्सव असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नर आणि नारायण, जीव आणि शिव, भक्त आणि देव यांना एक मानणाऱ्या विचाराचा हा उत्सव आहे. ते म्हणाले.

मीराबाई राजस्थानसारख्‍या  त्याग, बलिदान आणि पराक्रम यांचा वारसा असलेल्या  भूमीतून आल्या होत्या, याचे  स्मरण पंतप्रधानांनी केले. 84 ‘कोस’ ब्रज मंडल हा भाग उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांचा भाग असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद  केले. मीराबाईंनी भक्ती आणि अध्यात्मवादाचे  भारतामध्‍ये असलेले चैतन्य जोपासले. त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आपल्याला भारताच्या भक्ती परंपरेसह या देशाच्या  पराक्रमाची आणि त्यागाची आठवण करून देतो. कारण राजस्थानचे लोक भारताच्या संस्कृतीचे आणि चेतनेचे रक्षण करताना एखाद्या भिंतीसारखे मजबुतीनं उभे राहिले, असेही ते पुढे म्हणाले.

भारत युगानुयुगे नारी शक्तीला समर्पित आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.ब्रजवासींनीच तर ही गोष्‍ट इतर कोणाहीपेक्षा जास्त मान्य केली  आहे. पंतप्रधान म्हणाले, कन्हैयाच्या भूमीत तर प्रत्येकाचे  स्वागत,  आणि बोलण्‍याचा प्रारंभच  ‘राधे राधे’ अशा शब्दोच्चाराने  होतो."राधाकृष्‍ण म्हणजे राधाचा उपसर्ग लावल्यावरच कृष्णाचे नाव पूर्ण होते", हेही  मोदींनी अधोरेखित केले. इथे राधाकृष्‍णाचे नाव घेण्‍याचा  आदर्श वस्तुपाठ घातला गेला आहे, आणि त्याचे  श्रेय महिलांनी राष्ट्र उभारणीसाठी आणि समाजासाठी पुढे जाण्यासाठी केलेल्या योगदानाला जाते.असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी मीराबाई हे एक परिपूर्ण उदाहरण आहे हे अधोरेखित करून  मीराबाईंच्‍या भजनाच्या दोन पंक्तीचे पठण केले.आकाश आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे काही पडेल ते शेवटी संपेल असा अंतर्निहित संदेश या ओळींचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान म्हणाले की, मीराबाईंनी त्या कठीण काळात दाखवून दिले की, एखाद्या  महिलेची  आंतरिक शक्ती संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यास सक्षम आहे. संत रविदास हे मीराबांईचे  गुरू होते. संत मीराबाई या महान समाजसुधारकही होत्या. त्यांची भजने  आपल्याला आजही मार्ग दाखवतात. ही भजने  आपल्याला दैनंदिन कामासारखी कंटाळवाणी वाटत नाहीत तर आपण आपल्या मूल्यांशी जोडले कसे राहिले पाहिजे, हे शिकवतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  भारताच्या अखंडतेचे चैतन्‍य किती प्रभावी आहे,यावर  प्रकाश टाकताना सांगितले की,  ज्यावेळी  भारताच्या चेतनेवर हल्ला होतो किंवा राष्‍ट्र म्हणून चेतना कमकुवत व्हायला लागते, त्यावेळी  देशाच्या काही भागातून एक जागृत उर्जा स्त्रोत नेहमीच मार्ग दाखवतो. ते म्हणाले की, या राष्‍ट्रामध्‍ये  काही दिग्गज योद्धे झाले ,तर काहीवेळा संत अवतरले. अळवार आणि नयनार संत आणि दक्षिण भारतातील आचार्य रामानुजाचार्य, उत्तर भारतातील तुसलीदास, कबीरदास,रविदास आणि सूरदास, पंजाबमधील गुरु नानक देव, पूर्वेकडील बंगालमधील चैतन्य महाप्रभू, गुजरातमधील नरसिंह मेहता आणि आचार्य रामानंद ही भक्तिकालातील संतांची उदाहरणे त्यांनी दिली.पश्चिमेकडील महाराष्ट्रातील संत तुकाराम आणि नामदेव यांनी संन्यासाचा मार्ग पत्करला आणि भारतालाही घडवले, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. जरी त्यांच्या भाषा आणि संस्कृती एकमेकांपेक्षा भिन्न होत्या, तरीही त्यांचा संदेश एकच होता आणि त्यांनी त्यांच्या भक्ती आणि ज्ञानाचा मळा फुलवण्‍यासाठी  संपूर्ण देशाची  जणू नांगरणी केली, असे पंतप्रधान म्हणाले.

मथुरा हे ‘भक्ती आंदोलना’च्या विविध प्रवाहांच्या संगमाचे ठिकाण राहिले आहे असे सांगत पंतप्रधानांनी मलूक दास, चैतन्य महाप्रभू, महाप्रभू वल्लभाचार्य, स्वामी हरी दास आणि स्वामी हित हरिवंश महाप्रभू यांची उदाहरणे दिली, ज्यांनी राष्ट्रामध्ये चैतन्य जागवले. . भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आज हा भक्तियज्ञ पुढे नेण्यात येत  आहे असे ते म्हणाले.

भारताच्या गौरवशाली भूतकाळाची जाणीव नसलेले लोक गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वत:ची सुटका करू शकले नाहीत आणि ब्रजभूमीला विकासापासून वंचित ठेवले म्हणून मथुरेकडे दुर्लक्ष झाले याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की, अमृत  काळात देश पहिल्यांदाच गुलामगिरीच्या  मानसिकतेतून बाहेर आला आहे. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंचप्रणांची प्रतिज्ञा घेण्यात आली असे त्यांनी नमूद केले.  पुनर्रचित भव्य काशी विश्वनाथ धाम, केदारनाथ धाम, श्री राम मंदिराच्या आगामी तारखेचा उल्लेख करत  पंतप्रधान म्हणाले, "विकासाच्या या शर्यतीत मथुरा आणि ब्रज मागे राहणार नाहीत." ब्रजच्या विकासासाठी ‘उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषद’ स्थापन झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला."ही परिषद भाविकांच्या सोयीसाठी आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी खूप काम करत आहे" असे ते म्हणाले.

मोदी यांनी हा संपूर्ण प्रदेश कान्हाच्या 'लीलां'शी संबंधित  असल्याचा पुनरुच्चार केला आणि मथुरा, वृंदावन, भरतपूर, करौली, आग्रा, फिरोजाबाद, कासगंज, पलवल, बल्लभगढ यासारख्या भागांची उदाहरणे दिली जी वेगवेगळ्या राज्यात येतात. केंद्र सरकार विविध राज्य सरकारांच्या सहकार्याने या संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी ब्रज प्रदेशात आणि देशात होत असलेले बदल आणि घडामोडी हे केवळ व्यवस्थेतील बदल नाहीत तर राष्ट्राच्या पुनर्जागरण चेतनेच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक आहेत यावर भर दिला. महाभारत हे प्रमाण आहे की  जिथे जिथे भारताचे पुनरुत्थान होते त्यामागे श्रीकृष्णाचे आशीर्वाद नक्कीच आहेत, असे सांगून समारोप करताना त्यांनी देश आपले संकल्प पूर्ण करेल आणि विकसित भारताची निर्मिती करेल असे अधोरेखित केले.

यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक आणि मथुरा येथील खासदार  हेमा मालिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/Rajashree/Suvarna/Sushama/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979278) Visitor Counter : 96