पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथे जी 20 शिखर परिषद यशस्वी करणाऱ्या कर्मचारी चमूशी साधला संवाद


"आजचा कार्यक्रम श्रमिकांच्या एकतेचा (मजदूर एकता) असून तुम्ही आणि मी - दोघेही श्रमिक आहोत"

"एकत्रितपणे काम केल्याने मनातले कप्पे नष्ट होऊन एकसंधतेची भावना निर्माण होते "

"सामूहिक भावनेत शक्ती असते "

“सुनियोजित कार्यक्रमाचे दूरगामी फायदे मिळतात. राष्‍ट्रकूल क्रीडास्पर्धेने प्रणालीमध्ये निराशेची भावना निर्माण केली, तर जी 20 मुळे देशाला मोठ्या आयोजनाबाबत आत्मविश्वास दिला”

"मानवतेच्या कल्याणासाठी भारत मजबूत पाया रोवून उभा आहे आणि गरजेच्या वेळी सर्वांच्या मदतीसाठी पोहोचतो आहे"

Posted On: 22 SEP 2023 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम येथे जी 20 शिखर परिषद यशस्‍वी करण्‍यासाठी कार्यरत असलेल्‍या तळागाळातील कर्मचारी वर्गाच्‍या चमूशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले.

जी 20 च्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पंतप्रधानांनी या प्रसंगी बोलताना अधोरेखित केले. पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय व्यवस्थापन चमूला दिले.

उत्कृष्ट नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी या चमूने आयोजनादरम्यानचे त्यांचे अनुभव आणि मिळालेले धडे यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे तयार केलेले दस्तऐवज भविष्यातील कार्यक्रमांसाठी उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या कामी येऊ शकतात असे त्यांनी सांगितले.

हाती घेतलेल्या उपक्रमाच्या महत्त्वाची जाणीव आणि प्रत्येकाच्या मनामध्‍ये  त्या उपक्रमाचा आपण मध्यवर्ती भाग आहोत, ही  भावना हेच अशा मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनाच्या यशाचे रहस्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना अनौपचारिकपणे गप्पा मारतआपापल्या विभागातील अनुभव सामाईक करण्यास सांगितले. यामुळे एखाद्याच्या कार्यक्षमतेला व्यापक दृष्टीकोनातून पाहता येतेअसेही ते म्हणाले. एकदा आपल्याला इतरांचे प्रयत्न दिसले कीत्यामुळे आपण अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त होतो, असे ते म्हणाले. ‘आजचा कार्यक्रम म्हणजे श्रमिकांची एकजूट असून तुम्ही आणि मी दोघेही श्रमिक आहोत’, असे पंतप्रधान म्हणाले.

कार्यालयीन कामकाजात आपल्याला आपल्या सहकाऱ्यांच्या क्षमता समजत नाहीत. मात्र  एकत्रितपणे काम करताना त्या व्यक्तीचा हुद्दा असे  मनातले कप्पे नष्ट होऊन एक संघ तयार होतो. सध्या सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाचे उदाहरण देऊन त्यांनी हा मुद्दा विशद केला आणि त्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यामुळे हा प्रकल्प  कामाऐवजी उत्सवाचा बनेल, असे ते म्हणाले. सामूहिक भावनेत ताकद असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

कार्यालयातील पदानुक्रमातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांची ताकद जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधानांनी मनुष्यबळ आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अशा यशस्वी संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की जेव्हा एखादा कार्यक्रम केवळ पार न पडता, योग्य रीतीने पार पडतो, तेव्हा त्याचा दूरगामी परिणाम होतो.

राष्ट्रकुल खेळांचे उदाहरण देऊन त्यांनी हे स्पष्ट केले की, देशाचे ब्रँडिंग करण्यासाठी ती एक उत्तम संधी ठरू शकली असती, पण यामुळे केवळ त्याच्याशी संबंधित लोकांची आणि देशाची बदनामीच झाली नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेत निराशेची भावना देखील पसरली. तर दुसरीकडे, जी - 20 चा एकत्रित परिणाम म्हणजे  देशाची ताकद जगासमोर दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. मला संपादकीयांमधील स्तुतीचे अप्रूप नाही, पण माझ्यासाठी खरा आनंद हा आहे कीमाझ्या देशाला आता विश्वास वाटतो, की आपण अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन करू शकतो, ते म्हणाले.

नेपाळमधील भूकंप, फिजी, श्रीलंका येथील चक्रीवादळ यासारख्या जागतिक पातळीवरील आपत्तींच्या वेळी बचावकार्यात आणि मोठ्या प्रमाणात साहित्य पाठवून भारताने दिलेल्या मोठ्या योगदानाचा, तसेच मालदीवमधील  वीज आणि पाण्याचे संकट, येमेनमधून नागरिकांची सुरक्षित सुटका, तुर्कीएचा  भूकंप याचा उल्लेख केला, आणि देशाच्या वाढत्या आत्मविश्‍वासाबद्द्दल अधिक  स्पष्टीकरण दिले. या सर्व प्रसंगी, मानवतेच्या कल्याणासाठी भारत खंबीरपणे उभा आहे आणि गरजेच्या वेळी सर्वत्र पोहोचतो हे सिद्ध झाले. जी - 20 परिषदे दरम्यान, जॉर्डन मधील आपत्तीसाठी बचाव कार्याची आपण तयारी केली, पण प्रत्यक्ष जाण्याची गरज निर्माण झाली नाही, या गोष्टीची त्यांनी माहिती दिली.

म्हणाले, या कार्यक्रमात मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी मागच्या आसनांवर बसले आहेत आणि कार्यक्रम स्थळावरील (ग्राउंड लेव्हल) कार्यकर्ते सर्वात पुढे आसनस्थ झाले आहेत. "मला ही व्यवस्था आवडली, कारण त्यामुळे आपल्याला  खात्री मिळते  कीमाझा पाया मजबूत आहे", असेही पंतप्रधान म्हणाले.

आणखी सुधारणा करण्यासाठी जागतिक पातळीवरील अनुभवांची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की आता जागतिक दृष्टीकोन आणि संदर्भाने आपले सर्व काम अधोरेखित केले पाहिजे. ते म्हणाले की जी- 20 दरम्यान जगातील एक लाख प्रमुख निर्णयकर्त्यांनी भारताला भेट दिली आणि ते भारताचे पर्यटन राजदूत बनून परतले.

कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामातून या राजदूतपदाची बीजे रोवली गेली, असे ते म्हणाले. पर्यटनाला नव्या उंचीवर नेण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले.

ज्यांनी जी 20 परिषदेच्या यशात योगदान दिले आहे, अशा सुमारे 3000 लोकांचा या संवादामध्ये सहभाग होता.यात विशेषत: ज्यांनी परिषद सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अगदी तळागाळातील  काम केले, यात  सफाई कर्मचारी, चालक,वेटर आणि विविध मंत्रालयातील इतर कर्मचारी यांचा समावेश होता. या संवादाला विविध विभागांचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते.

 

S.Bedekar/Shraddha/Rajashree/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1959782) Visitor Counter : 84