युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

देशातील शिक्षण तसेच क्रीडा आणि कौशल्य विकास या क्षेत्रांसाठी नवे शैक्षणिक धोरण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरेल- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर


जालंधर येथील दोआबा महाविद्यालयाचा 65 वा दीक्षांत समारंभ संपन्न

Posted On: 21 SEP 2022 12:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

आपल्या देशातील युवा पिढीच्या प्रतिभेचा अनाठायी वापर होण्यापासून वाचविले पाहिजे आणि त्यांना अधिकाधिक प्रमाणात प्रतिभा प्राप्त करण्यासाठी सक्षम केले पाहिजे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारने संपूर्ण जगाला डिजिटल भारत मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करून दाखविली आहे आणि त्यामुळे आता देशातील अधिकाधिक आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने किंवा यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून केले जात आहेत.

केंद्रीय मंत्री आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते जालंधरच्या दोआबा महाविद्यालयातील दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना

जालंधरच्या दोआबा महाविद्यालयातील वरिंदर सभागृहात आज झालेल्या 65व्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी ते पुढे म्हणाले की, 34 वर्षांच्या कालावधीनंतर नव्या शैक्षणिक धोरणाची सुरुवात करून क्रीडा, शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रादेशिक भाषेत शिक्षण या क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने क्रांतिकारी पावले उचलली आहेत. ’स्किल इंडिया’ कार्यक्रमातून देशातील युवकांना रोजगाराच्या कमाल संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि सॉफ्ट स्कील्सच्या बाबतीत विशेष लक्ष पुरवून या युवकांना देशात तसेच परदेशात उत्तम कारकीर्द घडविण्याच्या अगणित संधी मिळवून दिल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मंगळवारी समारंभाला उपस्थित राहिलेले केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की आजचे युग हे महिला सशक्तीकरणाचे युग आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात, विशेषतः शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये महिला करून दाखवत असलेली कामगिरी हा त्याचा पुरावा आहे आणि आजच्या बदलत्या भारताचे हे आदर्श चित्र आहे. आणि हा बदल घडण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जगात 11व्या क्रमांकावर होती, आता ही परिस्थिती बदलली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. देशाच्या सर्व क्षेत्रांतील लोकांनी, मग ते श्रीमंत असो वा गरीब, सर्वांनीच यशस्वी डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून देशाचे डिजिटल भारत होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे आणि त्याबद्दल सर्व देशवासीय अभिनंदनास पात्र आहेत.

या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात काही रोपे देखील लावली.

श्री.चंद्र मोहन, प्रा.प्रदीप भंडारी,डॉ.सुषमा चावला,ध्रुव मित्तल आणि अश्मी सोंधी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होताना

दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन यांच्या पवित्र नित्यविधीने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.प्रदीप भंडारी म्हणाले की अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीमुळे आज दोआबा महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना अभिमान वाटत आहे आणि ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. श्री.चंद्र मोहन, श्री.अविनाश कपूर, डॉ.सुषमा चावला, प्रा.प्रदीप भंडारी यांनी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना विशेष दोआबा पारितोषिक आणि दुशाला देऊन त्यांचा सन्मान केला.

दोआबा महाविद्यालयाचे अत्यंत हुशार आणि प्रतिभावंत माजी विद्यार्थी अनुराग सिंह ठाकूर यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे आज संपूर्ण दोआबा महाविद्यालय परिवाराला त्यांचा अत्यंत अभिमान वाटत आहे असे चंद्र मोहन यांनी सांगितले. ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनात मोठी उंची गाठलेल्या ठाकूर यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.

 

 

 

 

 

 

 

S.Patil /S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1861074) Visitor Counter : 170