पंतप्रधान कार्यालय

हरमोहन सिंह यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 25 JUL 2022 6:54PM by PIB Mumbai

नमस्कार!

मी स्वर्गीय हरमोहन सिंह यादव यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक नमन करतो, माझी श्रद्धांजली वाहतो. मी सुखरामजी यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला इतक्या प्रेमाने आमंत्रित केले. माझी मनापासून इच्छा देखील होती की मी या कार्यक्रमासाठी कानपूरला येऊन आपल्या सर्वांसोबत उपस्थित राहावे. मात्र आज, आपल्या देशाच्या  लोकशाहीचा मोठा  क्षण देखील आहे. आज आपल्या नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी झाला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती देशाचं नेतृत्व करणार आहेत. हे आपल्या लोकशाहीच्या शक्तीचं, आपली सर्वसमावेशक विचारधारा याचं जिवंत उदाहरण आहे. या प्रसंगी आज दिल्लीत अनेक महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी माझं दिल्लीत उपस्थित राहणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं देखील आहे. म्हणून मी आपल्याशी दूरदृष्यप्रणाली द्वारे जोडला जातो आहे.

मित्रांनो,

आपल्याकडे असं मानतात की शरीर गेल्यानंतर देखील जीवन संपत नाही. गीतेत भगवान श्री कृष्णाचं एक वाक्य आहे -

 नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः.

म्हणजे, आत्मा अविनाशी असतो, आत्मा अमर असतो. म्हणूनच, जे लोक समाजासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी जगतात, ते मृत्यूनंतर देखील अमर राहतात. स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधी असोत किंवा स्वातंत्र्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय जी, राममनोहर लोहिया जी, जयप्रकाश नारायण जी, अशा अनेक महान व्यक्तीमत्वांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. लोहियाजींचे  विचार उत्तर प्रदेश आणि कानपूरच्या भूमीतून हरमोहन सिंह यादवजींनी आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात पुढे नेले. त्यांनी राज्य आणि देशाच्या राजकारणात जे योगदान दिलं आहे, समाजासाठी जे कार्य केलं आहे, त्यातून येणाऱ्या पिढ्यांना सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत राहणार आहे.

मित्रांनो,

चौधरी हरमोहन सिंह यादव जी यांनी आपला  राजकीय प्रवास ग्रामपंचायतीपासून सुरु केला होता. त्यांनी ग्रामसभेपासून राज्यसभेपर्यंतचा प्रवास केला. ते सरपंच झाले, विधानपरिषद सदस्य झाले, खासदार झाले. एक काळ असा होता, की हरमोहन सिंह यांच्या विचारातून उत्तर प्रदेशाच्या राजकारणाला एक दिशा मिळत असे. राजकारणाच्या या शिखरावर पोचून देखील हरमोहन सिंह जी यांनी समाजालाच प्राथमिकता दिली. त्यांनी समाजासाठी सक्षम नेतृत्व तयार करण्याचे काम केले. त्यांनी तरुणांना पुढे आणले, लोहियाजींचे विचार आणि संकल्प पुढे नेले. त्यांचे करारी आणि समर्थ व्यक्तिमत्व आपण 1984 मध्ये देखील बघितले होते. हरमोहन सिंह यादवजींनी केवळ शीख नरसंहाराविरुद्ध राजकीय भूमिकाच घेतली नाही, तर शीख बंधू - भगिनींचे संरक्षण करण्यासाठी ते समोर येऊन लढले. आपल्या जीवावर उदार होऊन त्यांनी कितीतरी शीख कुटुंबांचे, निष्पापांचे जीव वाचवले. देशाने देखील त्यांच्या या नेतृत्वाची दखल घेतली, त्यांना शौर्यचक्राने सन्मानित केले. सामाजिक जीवनात हरमोहन सिंह यादवजी यांनी आपल्या सामाजिक जीवनातून जो आदर्श घालून दिला आहे, तो अतुलनीय आहे.

मित्रांनो,

हरमोहनजी यांनी संसदेत श्रद्धेय अटलजी यांच्यासारख्या नेत्यांच्या काळात काम केलं होतं. अटलजी म्हणत असत -“सरकारं येतील, सरकारं जातील, पक्ष बनतील, संपतील, मात्र हा देश टिकला पाहिजे.” हाच आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. “व्यक्ती पेक्षा मोठा पक्ष, पक्षाहून मोठा देश.” कारण पक्षांचे अस्तित्व लोकशाहीमुळे आहे, आणि लोकशाहीचे अस्तित्व देशामुळे आहे. आपल्या देशात बहुतांश पक्षांनी, खास करून सर्व बिगर - काँग्रेसी पक्षांनी या विचाराचं, देशासाठी सहकार्य आणि समन्वयाच्या आदर्शाचं पालन केलं आहे.

मला आठवतं, जेव्हा 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, तेव्हा प्रत्येक प्रमुख पक्षानं सरकारची साथ दिली होती, सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. जेव्हा देशाने पहिली अणुचाचणी केली, तर सर्व पक्ष त्या काळच्या सरकार सोबत ठामपणे उभे राहिले. मात्र, जेव्हा आणीबाणी दरम्यान लोकशाही पायदळी तुडवली गेली तेव्हा देखील सर्व प्रमुख पक्षांनी, आपण सर्वांनी एकत्र येऊन राज्य घटना वाचण्यासाठी संघर्ष देखील केला. चौधरी हरमोहन सिंह यादव जी देखील त्या संघर्षातले एक लढाऊ सैनिक होते. म्हणजे, आपल्याकडे देश आणि समाजाचं हित, विचारधारेपेक्षा मोठं आहे. वास्तविक, अलीकडच्या काळात विचारधारा किंवा राजकीय स्वार्थाला समाज आणि देश हितापेक्षा जास्त महत्व देण्याची वृत्ती वाढू लागली आहे.  अनेकदा तर सरकारच्या कामात विरोधी पक्ष केवळ एवढ्यासाठी अडथळे आणतात, कारण जेव्हा ते सत्तेत होते, तेव्हा त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करू  शकले नव्हते. मात्र, आता ते अमलात आणले जात आहेत तर ते त्याला विरोध करतात. देशाच्या लोकांना ही मानसिकता आवडत नाही. प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी आहे, पक्षाचा विरोध, व्यक्तीचा विरोध करता करता देशाचाच विरोध सुरु व्हायला नको. विचारधारांचे स्वतःचे एक स्थान आहे, आणि असायलाही हवे. राजकीय महत्वाकांक्षा तर असू शकतात. मात्र, देश सर्वप्रथम आहे, समाज सर्वप्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे. 

मित्रांनो,

लोहियाजी असं मानत असत की समाजवाद समानतेचा सिद्धांत आहे. ते नेहमी धोक्याचा इशारा द्यायचे की जर समाजवाद संपला तर देशात असमानता वाढेल. आपण बघितलं आहे, की भारताच्या मूळ विचारांत समाज, वाद आणि विवादाचा विषय नाही. आपल्यासाठी समाज आपली सामूहिकता आणि सहकार्य याचा आराखडा आहे.  आपल्यासाठी समाज आपला संस्कार आहे, संस्कृती आहे, स्वभाव आहे. म्हणूनच, लोहियाजी भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याविषयी बोलत असत. त्यांनी रामायण जत्रा सुरु करून आपला वारसा आणि आपल्या भावना एकत्र आणण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली. त्यांनी गंगेसारख्या सांस्कृतिक नद्यांच्या संरक्षणाची, त्याची चिंता अनेक दशकांपुर्वीच केली होती. आज नमामि गंगे मोहिमेच्या माध्यमातून देश ते स्वप्न पूर्ण करत आहे. आज देश आपला समाज आणि सांस्कृतिक प्रतीकांचा पुनरुद्धार करत आहे. या प्रयत्नामुळे समाजाची सांस्कृतिक चेतना पुन्हा जिवंत होत आहे, समाजाची उर्जा आपले परस्पर संबंध सुदृढ होत आहे. याप्रमाणेच, नव्या भारतासाठी, देश आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कर्तव्य पालन करत आहे. जेव्हा ही कर्तव्य भावना मजबूत होईल, तेव्हा समाज आपोआप मजबूत होईल.

मित्रांनो,

समाजाची सेवा करण्यासाठी हे देखील गरजेचं आहे, की आपल्यात सामाजिक न्यायाची भावना रुजावी आणि त्याचा अंगीकार करावा. आज जेव्हा देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा करत आहे, तर हे समजून घेणे आणि त्या दिशेने मार्गक्रमण करणे अतिशय गरजेचं आहे.  सामाजिक न्यायाचा अर्थ आहे - समाजाच्या प्रत्येक घटकाला समान संधी मिळाव्यात, जीवनात मुलभूत गरजांपासून कुणीही वंचीत राहू नये. दलित, मागास, आदिवासी जेव्हा समोर येतील, तेव्हा देश पुढे जाईल. हरमोहन सिंग जी या परिवर्तनासाठी शिक्षण सर्वात महत्वाचे आहे, असे मानत असत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे काम केलं त्यामुळे कितीतरी युवकांचं आयुष्य सुधारलं. त्यांचे कार्य आज सुखराम जी आणि बंधू मोहित पुढे नेत आहेत. देश देखील शिक्षणातून सक्षमीकरण, आणि शिक्षण हेच सक्षमिकरण या मंत्रावर पुढे जात आहे. म्हणूनच, आज मुलींसाठीच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' यासारख्या मोहिमा इतक्या यशस्वी होत आहेत.  देशाने आदिवासी भागात राहणाऱ्या मुलांसाठी एकलव्य शाळा सुरु केली आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत मातृभाषेत शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. यामागे प्रयत्न हेच आहेत की, खेड्यातली, गरीब कुटुंबातली मुलं इंग्रजी येत नसल्यामुळे मागे राहायला नकोत. सर्वांना घर, सर्वांना वीज जोडण्या, जल - जीवन अंतर्गत सर्वांना शुद्ध पाणी, शेतकऱ्यांना सन्मान निधी, या प्रयत्नांमुळे आज गरीब, मागास, दलित - आदिवासी, सर्वांच्या स्वप्नांना उभारी देत आहे, सेशात सामाजिक न्यायाची मजबूत पायाभरणी होत आहे. अमृतकाळात येणारी 25 वर्षे सामाजिक न्यायाचे हेच संकल्प पूर्ण करण्याची वर्षे आहेत. मला विश्वास आहे, देशाच्या या मोहिमेत आपण सर्व आपापली भूमिका पार पाडू. पुन्हा एकदा श्रद्धेय स्वर्गीय हरमोहन सिंह यादवजींना विनम्र श्रद्धांजली. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार!

***

Jaydevi PS/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844922) Visitor Counter : 138