शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या (एनआयओएस) माध्यमातून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचा अग्निपथ योजनेला पाठिंबा

Posted On: 16 JUN 2022 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2022

संरक्षण मंत्रालयाने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या देशव्यापी गुणवत्ताधारित योजनेच्या माध्यमातून सैनिक, वायुसेैनिक आणि नाविकांची भरती केली जाणार आहे. नागरी समाजात एक चैतन्यदायी संरक्षण दल आणि शिस्तबद्ध कुशल युवक विकसित करण्यासाठी सशस्त्र दलांमध्ये तरुण पुरुष आणि महिलांना सहभागी करण्याच्या केन्द्र सरकारच्या या उपक्रमाचे शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने, स्वागत केले आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग  संरक्षण प्राधिकरणांशी सल्लामसलत करून एक विशेष कार्यक्रम सुरू करत आहे. त्याद्वारे, दहावी उत्तीर्ण असलेल्या अग्निवीरांना पुढचे शिक्षण घेण्यासाठी  सक्षम केले जाईल. त्यासाठी वर्तमानातच नाही तर त्यांच्या सेवाक्षेत्रातही प्रासंगिक असलेला 12 वी उत्तीर्ण अनुकूल अभ्यासक्रम विकसित केला जाईल. हे प्रमाणपत्र संपूर्ण देशात रोजगार आणि उच्च शिक्षण या दोन्ही उद्देशांसाठी मान्यताप्राप्त आहे. याचा फायदा अग्निवीरांना पुढील आयुष्यात समाजात उत्पादक भूमिका घेण्यासाठी पुरेशी शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये मिळवण्यासाठी होईल. एनआयओएसचा हा विशेष कार्यक्रम नावनोंदणी, अभ्यासक्रमांचा विकास, विद्यार्थ्यांना साहाय्य, स्वयं-शिक्षण सामग्रीची तरतूद, अभ्यास केंद्रांची मान्यता, वैयक्तिक संपर्क कार्यक्रम, मूल्यमापन आणि प्रमाणन सुलभ करेल. एनआयओएसची मुक्त शालेय शिक्षण प्रणाली अत्यंत सुलभ आणि सर्वांसाठी कोठूनही साध्य आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सर्व अग्निवीरांसाठी तिची दारे सदैव खुली आहेत.

 S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 



(Release ID: 1834543) Visitor Counter : 229