पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नवसारी येथे ए. एम नाईक आरोग्य सेवा संकुल आणि  निराली मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे केले उदघाटन


"गरीबांचे सक्षमीकरण आणि जीवन सुलभ करण्यासाठी आरोग्य सुविधांचे आधुनिकीकरण आणि सहज उपलब्धता महत्त्वपूर्ण आहे"

"गुजरातमधील माझ्या अनुभवामुळे संपूर्ण देशातील गरीबांची सेवा करण्यात मदत झाली आहे"

"आपल्याकडे बापूंसारख्या महापुरुषांची प्रेरणा आहे ज्यांनी सेवेला देशाची ताकद बनवली"

Posted On: 10 JUN 2022 3:36PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवसारी येथे ए.एम. नाईक आरोग्यसेवा संकुल  आणि  निराली मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज नवसारीला अनेक प्रकल्प मिळाले आहेत , ज्यामुळे आसपासच्या परिसरातील लोकांचे जीवनमान सुधारेल.  त्यांनी निराली ट्रस्ट आणि ए.एम. नाईक यांची प्रशंसा केली, इतर कोणत्याही कुटुंबाला हे सहन करावे लागू नये यासाठी त्यांनी वैयक्तिक दुःखाला संधीत बदलले आणि आधुनिक आरोग्य संकुल आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाबद्दल नवसारीतील लोकांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, गरीबांचे सक्षमीकरण आणि जीवन सुलभ करण्यासाठी आरोग्य सुविधांचे आधुनिकीकरण आणि सहज उपलब्धता महत्त्वाची आहे. "गेल्या 8 वर्षात देशाच्या आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आम्ही सर्वांगीण दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले आहे", असे ते म्हणाले. उपचार सुविधांच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोषण सुधारण्यासाठी आणि स्वच्छ जीवनशैलीसाठी   प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरीब आणि मध्यमवर्गीयांचे  आजारापासून  संरक्षण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि आजार झाल्यास, उपचाराचा खर्च कमी करणे हे आमचे ध्येय आहे असे  पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात गुजरातने अव्वल स्थान पटकावल्यामुळे गुजरातच्या आरोग्यसेवा विषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवा निर्देशांकांमध्ये सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाची आठवण सांगितली जेव्हा त्यांनी स्वस्थ गुजरात, उज्ज्वल गुजरात, मुख्यमंत्री अमृतम योजना सारख्या योजना सुरू केल्या .  हा अनुभव संपूर्ण देशातील गरीबांची सेवा करण्यात उपयुक्त ठरत  असल्याचे ते म्हणाले.  आयुष्मान भारत अंतर्गत गुजरातमध्ये 41  लाख रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे, यापैकी अनेक महिला, वंचित आणि आदिवासी लोकांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेमुळे रुग्णांच्या  7 हजार कोटींहून अधिक रुपयांची बचत झाली आहे. गुजरातला 7.5 हजारांहून अधिक आरोग्य आणि निरामयता  केंद्रे आणि 600 ‘दीनदयाल औषधालयप्राप्त झाली  आहेत. गुजरातमधील सरकारी रुग्णालये कर्करोगासारख्या आजारांवरील  प्रगत उपचारांसाठी सुसज्ज आहेत. भावनगर, जामनगर, राजकोट सारख्या अनेक शहरांमध्ये कर्करोगावरील उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावरील उपचाराच्या बाबतीतही पायाभूत सुविधांचा असाच विस्तार राज्यात होताना दिसत आहे.

महिला आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण मापदंडांमध्ये सुधारणा करण्याबाबतही पंतप्रधानांनी माहिती दिली. दवाखान्यात प्रसूतीसाठी चिरंजीवी योजनेचा त्यांनी संदर्भ दिला, ज्याचा 14 लाख मातांना फायदा झाला आहे. गुजरातच्या चिरंजीवी आणि खिलखिलाट योजनांचा राष्ट्रीय स्तरावर मिशन इंद्रधनुष आणि पंतप्रधान  मातृ वंदना योजनेत विस्तार करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधानांनी राज्यातील वैद्यकीय शिक्षण सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचाही उल्लेख केला. राजकोटमध्ये एम्स सुरू होत आहे, राज्यातली  वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 30 वर पोहोचली आहे आणि एमबीबीएसच्या जागा 1100 वरून 5700 पर्यंत वाढल्या आहेत. पदव्युत्तर शिक्षणाच्या  जागा 800  वरून 2000 पेक्षा जास्त झाल्या आहेत.

पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेच्या सेवा भावनेला अभिवादन करून भाषणाचा समारोप केला . ते म्हणाले, गुजरातच्या लोकांसाठी आरोग्य आणि सेवा हे जीवनाचे ध्येय आहे. बापूंसारख्या महापुरुषांची प्रेरणा आपल्याला लाभली आहे, ज्यांनी सेवेला देशाचे सामर्थ्य बनवले. गुजरातची ही भावना  आजही उर्जेने भरलेली  आहे. येथे सर्वात यशस्वी व्यक्ती देखील कुठल्या ना कुठल्या सेवा कार्यात सहभागी आहेत . क्षमतेत वाढ झाल्यास गुजरातची सेवा भावनाही वाढेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832963) Visitor Counter : 174