पंतप्रधान कार्यालय

ठाणे आणि दिवा यांच्या दरम्यानचा नवीन लोहमार्गाचे राष्ट्राला अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 18 FEB 2022 11:31PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार आणि आमदार, बंधू आणि भगिनींनो!

उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. भारताचा  गौरव, भारताची ओळख आणि संस्कृती रक्षक, देशाचे महानायक शिवाजी महाराज यांच्या चरणी सर्वात प्रथम मी आदरपूर्वक प्रणाम करतो. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर ठाणे-दिवा यांच्या दरम्यान नव्याने बनविण्यात आलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रारंभानिमित्त मुंबईकरांचे खूप- खूप अभिनंदन!

ही नवीन रेल्वे मार्गिका, मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक मोठे परिवर्तन आणणार आहे. त्याच्यांसाठी जीवन अधिक सुकर करणार आहे. ही नवीन रेल्वे मार्गिका मुंबईच्या कधीही न थांबणा-या जिवनाला अधिक गती देईल. या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यामुळे मुंबईच्या लोकांना अगदी सरळ सरळ चार फायदे होणार आहेत.

पहिला - आता उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी दोन वेगवेगळ्या मार्गिका असतील.

दुसरा - दुस-या राज्यांतून मुंबईला येणा-या-जाणा-या गाड्यांना आता उपनगरी गाड्यांच्या पासिंगसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

तिसरा - कल्याण ते कुर्ला विभागामध्ये मेल-एक्सप्रेस गाड्या आता कोणत्याही अडथळ्यांविना चालवणे शक्य होईल.

आणि चौथा फायदा -  प्रत्येक रविवारी होणा-या मेगाब्लॉकच्या कारणामुळे कळवा आणि मुंब्रा या भागातल्या लोकांचा त्रास आता दूर होणार आहे.

 

मित्रांनो,

आजपासून मध्यरेल्वे मार्गावर 36 नवीन उपनगरी गाड्या सुरू होत आहेत. यापैकी बहुतांश गाड्या वातानुकुलित आहेत. उपनगरी गाड्यांच्या सुविधांचा विस्तार करणे, उपनगरी गाड्या आधुनिक बनविणे यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, त्यानुसार हे काम करण्यात येत आहे. गेल्या सात वर्षांमध्ये मुंबईमध्ये मेट्रोचाही विस्तार करण्यात आला आहे. मुंबईला लागून असलेल्या उपनगरांमध्ये मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारण्यात येत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

दशकांपासून मुंबईची सेवा करीत असलेल्या उपनगरी सेवेचा विस्तार करणे, उपनगरी गाड्या आधुनिक बनविण्याची मागणी खूप जुनी आहे. 2008 मध्ये या 5व्या आणि 6 व्या मार्गिकेचा शिलान्यास झाला होता. हे काम 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु दुर्भाग्य असे आहे की, 2014 पर्यंत हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणांनी रखडला होता. त्यानंतर मात्र आम्ही या प्रकल्पाच्या काम वेगाने सुरू केले. प्रकल्पाच्या कामात येणा-या समस्या सोडविल्या.

मला असे सांगण्यात आले की, 34 स्थान तर असे होते की, तिथे नवीन लोहमार्गाला जुना लोहमार्ग जोडला जाणार होता. अनेक आव्हानांचा सामना केल्यानंतर आपल्या श्रमिकांनी, आपल्या अभियंत्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. डझनभर पूल बनवले, उड्डाण पूल बनवले, बोगदे तयार केले. राष्ट्रनिर्माणासाठी अशा समर्पणाला मी अगदी मनापासून-हृदयापासून नमन करतो. सर्वांचे अभिनंदनही करतो.

 

बंधू आणि भगिनींनो,

मुंबई महानगराने स्वतंत्र भारताच्या प्रगतीमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आता प्रयत्न आहे की, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणामध्येही मुंबईचे सामर्थ्य अनेकपटींनी वाढले पाहिजे. म्हणूनच मुंबईमध्ये 21 व्या शतकातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आमचा विशेष भर आहे. रेल्वे संपर्क व्यवस्थेची गोष्ट करायची झाली तर इथे हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक केली जात आहे. मुंबई उपनगरी रेल्वेला आधुनिक आणि श्रेष्ठ तंत्रज्ञानाने युक्त केले जात आहे. आमचा प्रयत्न आहे की, आत्ता जी मुंबई उपनगरी रेल्वे सेवेची क्षमता आहे, त्यामध्ये जवळ-जवळ 400 किलोमीटरची अधिक वृद्धी केली जावी. सीबीटीसी सारख्या आधुनिक सिग्नल व्यवस्थेबरोबरच 19 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचीही योजना आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण देशातल्या इतर राज्यांना मुंबईच्या रेल्वे संपर्क व्यवस्थेमध्ये अशाच वेगाची आवश्यकता आहे, त्यांना आधुनिक बनविण्याची गरज आहे. म्हणूनच अहमदाबाद -मुंबई अतिवेगवान रेल्वे म्हणजे आज मुंबई आणि देशाची आवश्यकता आहे. ही आधुनिक रेल्वे मुंबईच्या क्षमतेला, मुंबई म्हणजे स्वप्नातले शहर म्हणून जी ओळख आहे, ती अधिक सशक्त करेल. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्राधान्य आहे. याच प्रकारे मालवाहतूकसमर्पित पश्चिमीमार्गिकाही मुंबईला नव्याने ताकद देणार आहे.

 

मित्रांनो,

आपण सर्वजण जाणून आहात की, जितके लोक भारतीय रेल्वेने एका दिवसात प्रवास करतात, तितकी तर अनेक देशांची लोकसंख्याही नाही. भारतीय रेल्वे अधिक सुरक्षित, सुविधायुक्त आणि आधुनिक बनविण्यासाठी आमच्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलेल्या कार्यांपैकी एक आहे. आमच्या या कटिबद्धतेला कोरोना वैश्विक महामारीसुद्धा डळमळीत करू शकली नाही. गेल्या दोन वर्षात रेल्वेने माल वाहतुकीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्याचबरोबर 8 हजार किलोमीटरच्या रेलमार्गाचे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण केले. जवळपास साडे चार हजार किलोमीटरची नवीन लोहमार्ग बनवणे अथवा असलेल्या मार्गाचे दुपदरीकरणाचे कामही केले आहे. कोरोना काळामध्ये आम्ही शेतकरी रेल्वेच्या माध्यमातून देशातल्या शेतकरी बांधवांना देशभरातल्या बाजारपेठांशी जोडले आहे.

 

मित्रांनो,

आपण सर्वजण हेही जाणून आहे की, रेल्वेमध्ये सुधारणा झाली तर लॉजिस्टिक सेक्टरमध्ये क्रांतीकारी परिवर्तन घडून येऊ शकते. म्हणूनच गेल्या सात वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या सुधारणांना प्रोत्साहन दिले आहे. भूतकाळामध्ये पायाभूत प्रकल्पांचे काम वर्षानुवर्षे चालत होते, कारण नियोजनापासून ते त्याच्या अंमलबजावणीपर्यंत कोणत्याही बाबतीत संतुलनाची कमतरता होती. असा दृष्टीकोन 21 व्या शतकातल्या भारतामध्ये पायाभूत सुविधांचे निर्माण करताना असणे योग्य नाही.

म्हणूनच आम्ही पीएम गतिशक्ती मास्टरप्लान तयार केला आहे. यामध्ये केंद्र सरकारचा  प्रत्येक विभाग, स्थानिक प्रशासनआणि खाजगी क्षेत्र यांना एकाच डिजिटल मंचावर एकत्रित आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. पायाभूत सुविधेसाठी सुरू असलेल्या प्रकल्पाविषयीची सर्व माहिती त्या प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक भागिदाराला पहिल्यापासूनच मिळाली पाहिजे, यासाठी असा संयुक्त मंच तयार केला आहे. सर्व माहिती असेल तरच प्रत्येकजण आपआपल्या वाटणीचे काम, त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करू शकणार आहे. मुंबई आणि देशात सुरू असलेल्या इतर रेल्वे प्रकल्पांसाठीही आम्ही गतिशक्तीच्या भावनेतूनच काम करणार आहोत.

 

मित्रांनो,

अनेक वर्षांपासून इथे एका विशिष्ट प्रकारे विचार करण्याच्या पद्धतीचा पगडा आहे. जी साधन-सामुग्री गरीब वापरतात, मध्यमवर्ग वापरतात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुंतवणूक केली जावू नये, असा हा विचार होता. या कारणाने भारतामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधीच फारशी चांगली  नव्हती. आता मात्र भारत तो जुना विचार मागे सोडून  पुढे जात आहे. आता  सहा हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या देशाच्या रेल्वेला गती आणि आधुनिक सुविधा देत आहेत. आगामी वर्षांमध्ये 400 नवीन वंदे भारत रेल्वे गाड्या देशवासियांना सेवा देण्यास प्रारंभ करतील.

 

बंधू आणि भगिनींनो,

आणखी एक जुना दृष्टीकोन आमच्या सरकारने बदलला आहे, तो म्हणजे रेल्वेला आपल्या सामर्थ्यावर विश्वास आहे. 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत देशातले जे रेल्वे कोच- डबे बनविण्याचे कारखाने होते, त्यांच्याविषयी अतिशय उदासीनता होती. या कारखान्यांची स्थिती पाहिली तर कोणीही कल्पना करू शकत नाही की, हे कारखाने इतक्या आधुनिक गाड्या  बनवू शकतील. मात्र  आज वंदे भारत गाड्या आणि स्वदेशी विस्टाडोम डबे याच कारखान्यांमध्ये बनत आहेत. आज आपण आपल्या सिग्नल कार्यप्रणालीला स्वदेशी पर्याय निवडून आधुनिक बनविण्यासाठीही सातत्याने काम करीत आहोत. स्वदेशी पर्याय पाहिजे, कारण आपल्याला परदेशी अवलंबित्वातून मुक्त झाले पाहिजे.

 

मित्रांनो,

नवीन सुविधा विकसित करण्याच्या या प्रयत्नांचा खूप मोठा लाभ मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना होणार आहे. गरीब आणि मध्यमवर्गातल्या परिवारांना या नवीन सुविधा सहजपणे मिळतील आणि त्यांच्यासाठी कमाईचे साधनही मिळेल. मुंबईच्या निरंतर विकासाच्या वचनबद्धतेबरोबरच पुन्हा एकदा सर्व मुंबईकरांचे खूप खूप अभिनंदन करतो.

खूप - खूप धन्यवाद !!

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799534) Visitor Counter : 157