पंतप्रधान कार्यालय

रोम आणि ग्लासगो दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

Posted On: 28 OCT 2021 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 ऑक्टोबर 2021

इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून, 29-31 ऑक्टोबर 2021 या काळात मी इटलीची राजधानी रोम आणि व्हेटीकन सिटीच्या दौऱ्यावर जात  आहे. या दौऱ्यानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या आमंत्रणावरून, 1-2 नोव्हेंबर 2021 या दरम्यान मी ग्रेट ब्रिटनच्या ग्लासगो इथे जाणार आहे.

रोममध्ये होणाऱ्या जी-20 देशांच्या नेत्यांच्या सोळाव्या शिखर परिषदेत, मी सहभागी होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि महामारीपासून आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल, शाश्वत विकास आणि हवामान बदल, या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात देखील मी सहभागी होणार आहे. कोविड महामारीचा 2020 मध्ये उद्रेक झाल्यापासून, जी-20 नेत्यांची ही पहिलीच शिखर परिषद आहे. या परिषदेत, सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि सर्व सदस्य देशांमधील आर्थिक लवचिकता आणि टिकावूपणा वाढवण्यासाठी तसेच महामारीनंतर सर्वसमावेशक तसेच शाश्वत जगाची उभारणी करण्यासाठी जी-20 देश काय करू शकतील, यावर देखील या परिषदेत विचारमंथन होईल.

इटलीतील माझ्या भेटीदरम्यान, मी व्हेटिकन सिटी इथेही जाणार आहे, हीच होलीनेस पोप फ्रान्सिस यांच्या निमंत्रणावरुन मी तिथे जाणार असून, तिथले परराष्ट्र मंत्री, पिएत्रो पॅरोलीन यांचीही भेट घेणार आहे.

जी-20 शिखर परिषदेच्या दरम्यान, मी विविध भागीदार देशांच्या नेत्यांनाही भेटणार असून  या द्विपक्षीय बैठकीत भारतासोबतच्या द्वीपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे.   

जी-20 शिखर परिषदेची सांगता 31 ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यानंतर, मी ग्लासगो इथे, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक आराखडा परिषद (UNFCCC)- कोप म्हणजेच, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, (COP-26) च्या 26 व्या बैठकीत सहभागी होणार आहे.

कोप-26 च्या  ‘जागतिक नेतृत्व शिखर परिषदेच्या’ उच्चस्तरीय बैठकीत देखील मी सहभागी होणार आहे. 1 आणि 2 नोव्हेंबरला ही परिषद होणार असून, त्यात 120 राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत.

निसर्गासोबत, सौहार्दाने सहजीवनाची आपली परंपरा असून, आपल्याकडे वसुंधरेप्रति आमच्या मनात नितांत आदर आहे. आम्ही भारतात, स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा क्षेत्र विस्तारण्यासाठी, तसेच उर्जाक्षमता वाढवणे, वनीकरण आणि जैवविविधता संवर्धन या क्षेत्रांसाठी महत्वाकांक्षी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर काम करत आहोत.

आज भारत, हवामान अनुकूलता, हवामानाचा प्रभाव कमी करणे आणि हवामान बदलाच्या संकटात टिकून राहण्यासाठी सामाईक प्रयत्नांचे नवे विक्रम भारतात प्रस्थापित केले जात आहे. स्थापित अक्षय उर्जा, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या बाबतीत भारताचे स्थान, आज जगातील सर्वोच्च देशांपैकी एक आहे.जागतिक नेत्यांच्या या शिखर परिषदेत मी, भारताने हवामान बदल क्षेत्रात मिळवलेल्या यशाविषयी माहिती सांगणार आहे .

हवामान बदलावर सर्वंकष उपाय शोधण्याची गरज देखील मी अधोरेखित करेन. यात कार्बन उत्सर्जनाचे समान वाटप, हवामान बदलाची तीव्रता कमी करणे तसेच त्यांच्याशी जुळवून घेणे आणि लवचिकता आणण्यासाठी उपाय योजना, त्यासाठी आर्थिक मदत पुरवणे, तंत्रज्ञानाची अदलाबदल आणि हरित आणि सर्वसमावेशक वाढीसाठी शाश्वत जीवनशैलीचे महत्व याचा समावेश  असेल.

COP-26 शिखर परिषदेत सहकारी देशांचे सर्व नेते, संशोधक, हितसंबंधीय आणि आंतर - सरकार संस्था यांची भेट होऊन, स्वच्छ विकासाच्या शक्यतांना चालना देण्याच्या शक्यतांवर चर्चा करण्याची संधी मिळेल

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767356) Visitor Counter : 272