पंतप्रधान कार्यालय

‘ग्लोबल सिटीझन लाइव्ह’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ संदेश

Posted On: 25 SEP 2021 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25  सप्टेंबर 2021

नमस्ते!

या युवा आणि उत्साही सभेमध्ये बोलताना मला अतिशय प्रसन्न, आनंदी वाटत आहे. आपल्या पृथ्वीवर सर्वात सुंदर आणि विविधतेने नटलेला असा एक वै‍श्वि‍क परिवार आज माझ्या समोर आहे.

वैश्विक नागरिक अभियान, दुनियेला बरोबर घेऊन जाण्यासाठी संगीत आणि रचनात्मकतेचा उपयोग करीत आहे. खेळाप्रमाणेच संगीतामध्येही लोकांना एकतेच्या सूत्रामध्ये बांधून ठेवण्याची अंतर्निहित क्षमता असते. महान हेन्री डेविड थरो यांनी एकदा जे म्हटले होते, तेच मी इथे उदधृत करतो: ‘‘ ज्यावेळी मी संगीत ऐकत असतो, त्यावेळी मी कोणत्याही संकटाला घाबरत नाही. माझ्यामध्ये असुरक्षेची भावना येत नाही. मला कोणीही शत्रू वाटत नाही.  काळाचा सर्वात जुना कालखंड तसंच काळाचा सर्वात नवीन क्षण हे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत, असं मला जाणवत असतं.’’

संगीत आपल्या जीवनावर शांतपणे प्रभाव टाकत असते. ते मनाला आणि संपूर्ण शरीरालाही शीतलता देत असते. भारतामध्ये अनेक संगीत परंपरा आहेत. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे, शैलीचे संगीत आहे. आपण सर्वांनी भारतामध्ये यावे आणि आमच्या संगीतातला जीवंतपणा, त्यातली विविधता यांच्याविषयी शोध घ्यावा, यासाठी आमंत्रित करतो.

मित्रांनो,

जवळपास दोन वर्षांपासून संपूर्ण जीवनामध्ये आत्तापर्यंत कधीच न आलेल्या वैश्विक महामारीशी माणूस लढा देत आहे. महामारीबरोबर लढताना आपल्याला आलेल्या अनुभवांनी आपल्याला शिकवलं की, ज्यावेळी आपण सर्वजण एकत्र, बरोबर असतो, त्यावेळी आपण अधिक मजबूत आणि अधिक चांगले असतो. ज्यावेळी आपले कोविड-19 चे योद्धा, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक, यांनी महामारीच्या विरोधात लढण्यामध्ये आपले सर्वश्रेष्ठ योगदान दिले, त्यावेळी आपण या सामूहिक भावनेची झलकही पाहिली. आम्ही हीच भावना आमच्या वैज्ञानिकांमध्ये आणि नवोन्मेषकांमध्येही पाहिली. ज्यावेळी त्यांनी विक्रमी कमी वेळेत नवीन लस बनविली त्यावेळी त्यांच्यामध्ये हीच भावना होती. अनेक पिढ्यांना आता ही प्रक्रिया स्मरणात राहणार आहे. मानवाची सहन करण्याची ताकद सर्वोपरी होती, याचे स्मरण सर्वांना राहणार आहे.

मित्रांनो,

कोविड व्यतिरिक्त इतर आव्हानेही आहेत. गरीबी हे त्यापैकीच  एक आव्हान कायम आहे. गरीब समुदायाला सरकारवर अवलंबित करून गरीबीच्या विरोधात लढता येत नाही. गरीबीच्या विरोधात लढण्यासाठी गरीब समुदायाच्या पाठीशी सरकारला भरवशाचा सहकारी म्हणून उभं राहिले पाहिजे. असा भरवशाचा सहकारी म्हणून ज्यावेळी सरकार गरीबाच्या पाठीशी उभे राहील, त्याचवेळी गरीबीचे दुष्टचक्र कायमचे भेदणे शक्य करण्यासाठी पाया तयार करणे शक्य होणार आहे.

मित्रांनो,

ज्यावेळी सत्तेचा उपयोग गरीबांना सशक्त बनविण्यासाठी केला जातो, त्यावेळी त्यांना गरीबीच्या विरोधात लढण्यासाठी ताकद मिळते. आणि म्हणूनच, आम्ही प्रयत्न करून बँकिंग सेवांचा लाभ घेण्यापासून वंचित असलेल्या लोकांना बँकिंग सेवेची सुविधा प्रदान केली. लाखो लोकांना सामाजिक सुरक्षा कवच निर्माण करून दिले. यामध्ये 50 कोटी  म्हणजेच 500 दशलक्ष भारतीयांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्याचे काम केले. तुम्हा लोकांना हे जाणून आनंद वाटेल की, आमच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये बेघरांसाठी जवळपास तीन कोटी म्हणजे 30 दशलक्ष घरकुले बनविण्यात आली आहेत. एक घर म्हणजे म्हणजे केवळ आश्रय असे होत नाही. आपल्या डोक्यावर स्वतःचं छप्पर आहे, ही भावनाच स्वाभीमान जागृत करणारी आहे. भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये पेयजलासाठी नळाची जोडणी, देण्यासाठी जनआंदोलन उभे केले आहे. सरकार अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी एक अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त निधी खर्च करीत आहे. गेल्यावर्षी अनेक महिन्यांपासून आणि आताही आमच्या 80 कोटी म्हणजे 800 दशलक्ष नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरीत केले जात आहे. ही सर्व पावले आणि इतर प्रयत्न गरीबीच्या विरोधात लढा देण्यासाठी ताकद प्रदान करण्यासाठी उचलली आहेत.

मित्रांनो,

आमच्या समोर हवामान परिवर्तनाचा धोका आहे. संपूर्ण जगाना एक गोष्ट स्वीकार करावी लागणार आहे, ती म्हणजे वैश्विक वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा प्रारंभ सर्वात प्रथम स्वतःपासून होत असतो. हवामान परिवर्तनाचा धोका कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि सर्वात यशस्वी उपाय म्हणजे निसर्गाच्या अनुरूप आपण स्वतःची जीवनशैली ठेवली पाहिजे.

महान महात्मा गांधी आणि अहिंसा यांच्याविषयीच्या त्यांच्या विचारांमुळे ते अधिक व्यापक स्वरूपात लोकांना माहिती आहेत. मात्र, तुम्हा सर्वांना माहिती आहे का, की ते दुनियेतले एक महान पर्यावरण तज्ञांपैकीच एक होते. त्यांनी शून्य कार्बन उत्सर्जनवाली जीवनशैली अंगिकारली होती. त्यांनी जे काही कार्य केले, ते करताना आपल्या पृथ्वी ग्रहाच्या कल्याणाचा विचार सर्वोपरी ठेवला. त्यांनी आपण इथले ‘विश्वस्त’  आहोत, या सिद्धांतावर प्रकाश टाकला. त्यानुसार आपण सर्वजण या पृथ्वी ग्रहाचे विश्वस्त आहोत आणि या वसुंधरेची देखभाल करणे, आपले कर्तव्य आहे, असा विचार त्यांनी सर्वांना दिला.

पॅरिस करारासंबंधी आपली कटिबद्धता जपणारे, आज भारत जी-20 बरोबर जोडले गेलेले एकमात्र असे राष्ट्र आहे.   आणि भारत त्याविषयी संपूर्णपणे समर्पित आहे. भारताने  आंतरराष्ट्रीय सौर करार आणि आपदा प्रतिबंधक पायाभूत सुविधांसाठी आघाडीमध्ये संपूर्ण दुनियेला एकाच पातळीवर आणल्याबद्दल अभिमान वाटतो. 

मित्रांनो,

आम्ही समस्त मानव जातीच्या विकासामध्येच भारताचाही विकास आहे, यावर विश्वास ठेवतो. इथे मी यासंबंधी ऋग्वेदामध्ये जे सांगितले आहे, त्याचे उच्चारण करून माझे मनोगत समाप्त करू इच्छितो. ऋग्वेद कदाचित या जगातल्या सर्वात प्राचीन शास्त्रांपैकी एक आहे.  या उद्धरणाचे छंद आजही वैश्विक नागरिकांच्या विकासामध्ये स्वर्णिम मानक आहेत.

ऋग्वेदामध्ये असे म्हटले आहे की -

संगच्छध्वंसंवदध्वंसंवोमनांसिजानताम्

देवाभागंयथापूर्वेसञ्जानानाउपासते।।

समानोमन्त्रःसमितिःसमानीसमानंमनःसहचित्तमेषाम्।

समानंमन्त्रम्अभिमन्त्रयेवःसमानेनवोहविषाजुहोमि।।

समानीवआकूतिरू समानाहृदयानिव: ।

समानमस्तुवोमनोयथावरू सुसहासतिद।।

याचा अर्थ असा आहे की -

या आपण सर्वजण मिळून एका स्वरामध्ये म्हणत, पुढे जाऊ या;

आपल्या सर्वांमध्ये एकमत असावे आणि जे काही आमच्याजवळ आहे, ते सर्व आपण सर्वांमध्ये वाटून घेऊ, ज्याप्रमाणे भगवान एकमेकांना बरोबर एकसारखी वाटणी करतो, तसेच आपण जे आहे त्याची वाटणी करूया.

या आपण एक सामायिक उद्देश आणि सामायिक विचार निश्चित करू या. या आपण अशा एकतेसाठी प्रार्थना करू या.

या आपल्या सर्वांना एकजूट करेल, अशा निश्चयांना आणि आकांक्षांना सामायिक करू या

मित्रांनो,

एका वैश्विक नागरिकासाठी यापेक्षा अधिक चांगले घोषणा पत्र आणखी काय असू शकते?

आपण सर्वजण दयाळू, न्यायपूर्ण आणि समावेशक जगासाठी एकत्रितपणे काम करीत रहावे.

धन्यवाद!

आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद!!

नमस्ते!

 

 

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758380) Visitor Counter : 178