माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पंतप्रधानांनी 14 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून पाळण्याचे घोषित केले

Posted On: 14 AUG 2021 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021

देशाच्या फाळणीमुळे आपले प्राण गमावलेल्या आणि  विस्थापित झालेल्या सर्वांना योग्य श्रद्धांजली म्हणून, त्यांच्या  बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा दिवस "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून पाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या  दिवसाची घोषणा  भारतीयांच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना फाळणीच्या वेळी लोकांना सोसाव्या लागलेल्या वेदना आणि दुःखाची आठवण करून देईल. त्या अनुषंगाने ,सरकारने  14 ऑगस्ट हा "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून घोषित केला आहे.

ट्वीट्स संदेशांच्या  मालिकेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वाची घोषणा केली

पंतप्रधान म्हणाले,

" फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून पाळला जाईल.

#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी वेदना स्मृती दिन) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषाला संपवण्यासाठी प्रेरित करण्याबरोबरच एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवी संवेदनाही सशक्त होतील".

15 ऑगस्ट ,1947 रोजी भारताने  ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले.दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही राष्ट्रासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असतो; मात्र , स्वातंत्र्याच्या गोडव्यासह  फाळणीचे दुःखही येते.  नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतीय राष्ट्राच्या जन्माबरोबरच  फाळणीच्या हिंसक वेदनाही होत्या ज्यांनी लाखो भारतीयांवर कायमचे व्रण सोडले आहेत. 

फाळणीमुळे मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या स्थलांतरांमुळे सुमारे 20 दशलक्ष लोक प्रभावित झाले. लाखो कुटुंबांना त्यांची वडिलोपार्जित गावे/शहरे सोडावी लागली आणि त्यांना निर्वासित म्हणून नवीन आयुष्य शोधावे लागले.

14 - 15 ऑगस्ट, 2021 च्या मध्यरात्री, संपूर्ण देश 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, फाळणीची वेदना आणि हिंसा या देशाच्या आठवणीत  खोलवर कोरलेली आहे. देश सर्वात मोठा लोकशाही आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी पुढे वाटचाल करत  असताना, देशाला भोगाव्या लागलेल्या  फाळणीच्या  वेदना कधीही विसरता येणार नाहीत . आपले स्वातंत्र्य साजरे करताना, हे  कृतज्ञ राष्ट्र आपल्या प्रिय मातृभूमीच्या त्या सुपुत्रांनाही  सलाम करत आहे ,ज्यांना हिंसाचाराच्या उन्मादात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745794) Visitor Counter : 438