शिक्षण मंत्रालय

माध्यान्ह भोजन योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार


या निर्णयाचा लाभ 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना होणार

या योजनेसाठी 1200 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद

Posted On: 28 MAY 2021 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मे 2021

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल  ‘निशंक’ यांनी माध्यान्ह भोजन योजनेसाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांसाठीच्या एका विशेष कल्याणकारी योजनेअंतर्गत, या योजनेत अंतर्भूत पदार्थ बनविण्याच्या खर्चापोटी 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या योजनेमुळे माध्यान्ह भोजन योजनेला उत्तेजन मिळेल. केंद्र सरकारने या आधी घोषित केलेल्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रती व्यक्ती 5 किलो धान्याचे मोफत वितरण करण्याच्या योजनेच्या व्यतिरिक्त ही विशेष योजना राबविण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे शालेय मुलांच्या पोषण पातळीचे संरक्षण होण्यास मदत होईल आणि महामारीच्या या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांची प्रतिकारशक्ती सुरक्षित राखण्यास पाठबळ मिळेल.

केंद्र सरकार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना 1200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पुरविणार आहे. देशभरातील 11 लाख 20 हजार सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या  सुमारे 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या एकदाच अमलात येणाऱ्या या विशेष कल्याणकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722447) Visitor Counter : 225