पंतप्रधान कार्यालय

भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन


‘डबल इंजिन’ सरकारने त्रिपुराचे परिवर्तन केलेः पंतप्रधान

त्रिपुरामध्ये एचआयआरए विकास म्हणजेच महामार्ग, आय-वे, रेल्वे आणि हवाईमार्ग पहायला मिळत आहेत: पंतप्रधान

भारत आणि बांगलादेशमधील मैत्री वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे केवळ बळकटच होत नाही तर ती व्यवसायासाठी ही एक मजबूत दुवा असल्याचे सिद्ध होत आहे: पंतप्रधान

मैत्री पूल बांगलादेशातील आर्थिक संधीलाही प्रोत्साहन देईलः पंतप्रधान

Posted On: 09 MAR 2021 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे उद्‌घाटन केले. त्यांनी त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्‌घाटन व पायाभरणीही केली. त्रिपुराचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बांगलादेशच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश ऐकवण्यात आला.

कार्यक्रमास संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आधीच्या 30 वर्षातील सरकारे आणि गेल्या तीन वर्षातील ‘डबल इंजिन’ सरकारमधील स्पष्ट फरक त्रिपुरा अनुभवत आहे. या आधीच्या वर्षांमधील भ्रष्टाचार आणि कमिशन संस्कृतीच्या जागी, लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत आहे. एकेकाळी पगारावरुन त्रासलेल्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार पगार मिळत असल्याचे स्मरणही त्यांनी करून दिले. जेथे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन विक्रीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे त्या त्रिपुरात पहिल्यांदाच एमएसपी अर्थात किमान आधारभूत किमतीचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीच्या संपाच्या संस्कृतीच्या ऐवजी उद्योग सुलभतेचे वातावरण देखील त्यांनी नमूद केले. नवीन गुंतवणूकीमुळे उद्योग बंद होण्याच्या पूर्वीच्या परिस्थितीत बदल होत आहेत. ते म्हणाले की, त्रिपुरा येथून  होणाऱ्या निर्यातीत 5 पट वाढ झाली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 6 वर्षात केंद्र सरकारने त्रिपुराच्या विकासविषयक  प्रत्येक गरजेची काळजी घेतली आहे. ते म्हणाले, राज्यासाठीच्या केंद्रीय वाटपामध्ये महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे. 2009-2014 दरम्यान त्रिपुराला केंद्रीय विकास योजनांसाठी 3500 कोटी रुपये मिळाले होते तर 2014-2019 दरम्यान 12000 कोटींपेक्षा जास्त रुपये देण्यात आले आहेत.

पंतप्रधानांनी ‘डबल इंजिन’ सरकारच्या फायद्यावर भाष्य केले. ज्या राज्यात ‘डबल इंजिन’ सरकार नाही, अशी राज्ये गरीब, शेतकरी आणि महिलांच्या सशक्तीकरणाच्या योजनांची नीट अंमलबजावणी करत नसून त्यांची प्रगती अत्यंत संथ असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले., ‘डबल इंजिन’ सरकार त्रिपुराला बळकट करण्यासाठी काम करत आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, ‘डबल इंजिन’ सरकारने वीजेचा तुटवडा असणाऱ्या त्रिपुराला , अतिरिक्त वीज असणारे राज्य म्हणून परिवर्तित केले आहे. दोन लाख ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, अडीच लाख मोफत गॅस जोडणी उपलब्ध करून देणे, त्रिपुरामधील प्रत्येक खेडे उघड्यावरील शौच मुक्त करणे, 50,000 गर्भवती महिलांना मातृ वंदन योजनेचा लाभ, 40,000 गरीब कुटुंबांना नवीन घरे इ.  ही डबल इंजिन’ सरकारने राज्यात आणलेल्या इतर बदलांची यादी त्यांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत कनेक्टिव्हिटी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड सुधारणा झाली आहे. यासंदर्भात विमानतळ, त्रिपुरामधील इंटरनेटसाठी सी-लिंक, रेल्वे जोडणी आणि जलमार्गाचे वेगवान काम हे त्यांनी नमूद केले. त्यांनी हिरा विकास म्हणजेच महामार्ग, आय-वे, त्रिपुरासाठी रेल्वे आणि हवाई मार्ग याविषयी माहिती दिली.

पंतप्रधान म्हणाले की, ही कनेक्टिव्हिटी केवळ भारत आणि बांगलादेशमधील मैत्रीला बळकटी देत नाही तर ती उभय देशातील  व्यवसायासाठी मजबूत दुवा असल्याचेही सिद्ध करीत आहे. ईशान्य भारत आणि बांगलादेश दरम्यान संपूर्ण प्रदेश व्यापार कॉरिडोर म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडच्या वर्षांत साकारण्यात आलेल्या रेल्वे आणि जलवाहिनी प्रकल्पांना या पुलाद्वारे बळकटी मिळाली आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. यामुळे त्रिपुरासह बांगलादेश आणि दक्षिण-पूर्व आशियासह दक्षिण आसाम, मिझोरम आणि मणिपूरशी संपर्क व्यवस्था  सुधारेल. मोदी म्हणाले की, हा पूल बांगलादेशातही आर्थिक संधीला प्रेरणा देईल. पुलाचा प्रकल्प पूर्ण करण्यात सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी बांगलादेश सरकार आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान पुलाचा पाया रचला गेला होता.

पंतप्रधान म्हणाले, आता लोकांना ईशान्येकडे कोणत्याही प्रकारच्या पुरवठ्यासाठी केवळ रस्त्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. ते म्हणाले की, बांगलादेशचे चीतगांव बंदर नदीमार्गे पर्यायी मार्गाने ईशान्येकडे जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की सबरूममधील आयसीपी (एकात्मिक चेकपोस्ट) हे गोदाम आणि कंटेनर ट्रान्स-शिपमेंट सुविधेसह पूर्ण विकसित लॉजिस्टिक हबसारखे काम करेल.

फेनी नदीवरील या पुलामुळे अगरतळा हे भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी बंदराच्या  सर्वात जवळचे शहर बनले आहे. राष्ट्रीय महामार्ग-08 आणि राष्ट्रीय महामार्ग -208 च्या विस्ताराशी संबंधित प्रकल्प जे पूर्ण झाले आहेत आणि ज्यांची पायाभरणी झालीआहे  , त्या प्रकल्पांमुळे  ईशान्येकडील प्रदेशाचा बंदराशी संपर्क मजबूत हो ईल, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, आज अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन म्हणजे अगरतळाला एक चांगले शहर बनवण्याचे प्रयत्न आहेत. वाहतुकीशी संबंधित समस्या आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी नवीन एकात्मिक कमांड सेंटर तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. ते म्हणाले की, आज उदघाटन झालेल्या विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, मल्टी लेव्हल पार्किंग, कमर्शियल कॉम्प्लेक्समुळे अगरतळाच्या  राहणीमान आणि उद्योग सुलभतेत बरीच सुधारणा होईल.

पंतप्रधान म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे काही दशकांपासूनच्या ब्रू शरणार्थी समस्येचे निराकरण झाले. 600 कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे ब्रू लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्याच्या समृद्ध वारशाविषयी उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, अगरतळा  विमानतळाचे नामांतर महाराजा बीर विक्रम किशोर माणिक्य असे करणे म्हणजे त्रिपुराच्या विकासाबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाविषयी आदर दर्शविणे आहे . त्याचप्रमाणे, थांगा डारलॉंग, सत्याराम रेंग आणि बेनीचंद्र जामटिया या त्रिपुराच्या समृद्ध संस्कृती आणि साहित्याची सेवा करणाऱ्या लोकांचा सन्मान करण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. प्रधान मंत्री वन धन योजनेंतर्गत बांबूवर आधारित स्थानिक कलेला चालना देण्यात येत असून स्थानिक आदिवासींना नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करत पंतप्रधानांनी राज्य सरकार त्रिपुराच्या जनतेची सेवा करत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

 Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703535) Visitor Counter : 217