पंतप्रधान कार्यालय

सेरावीक मध्ये पंतप्रधानांनी केलेले बीजभाषण

Posted On: 05 MAR 2021 8:55PM by PIB Mumbai

डॉक्टर डॅनियल यर्गिन, परिचयासाठी आभार. मान्यवर अतिथींचेही उपस्थितीबद्दल आभार.


नमस्कार !
अतिशय विनम्रतेने सेरावीक जागतिक उर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार मी स्वीकारत आहे. माझी महान मातृभूमी, भारताच्या जनतेला मी हा पुरस्कार समर्पित करत आहे. पर्यावरणाची जोपासना करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या, माझ्या मातृभूमीच्या झळाळत्या परंपरेला मी हा पुरस्कार समर्पित करतो,


मित्रहो,
पर्यावरणासंदर्भातल्या नेतृत्वासाठी हा पुरस्कार दिला जातो. नेतृत्व म्हणजे सामान्यतः कृतीद्वारे दाखवलेला उत्तम मार्ग. पर्यावरणाची जोपासना आणि संरक्षण करण्याची गोष्ट येते तेव्हा भारतातली जनता निश्चितच नेतृत्व करते. शतकापासून हे चालत आलेले आहे. आमच्या संस्कृतीत निसर्ग आणि देवत्व यांची सांगड घातलेली आहे. आमच्या देव-देवता कोणत्या ना कोणत्या प्रकारे वृक्ष आणि प्राणीमात्रांशी जोडलेल्या आहेत. हे वृक्ष आणि प्राणीही पवित्र मानले जातात. आपण कोणत्याही राज्यातले कोणत्याही भाषेतले साहित्य पहा, जनता आणि निसर्ग यांच्यातला घट्ट बंध असल्याचा आपल्याला दाखला मिळेल. मित्रहो,
महात्मा गांधी हे आपल्याला लाभलेल्या आतापर्यंतच्या  सर्वात महान पर्यावरणवादी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मानवतेने वाटचाल केली असती तर आजच्या बऱ्याचश्या  समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले नसते. गुजरातमधल्या पोरबंदर या किनारी शहरामधल्या महात्मा गांधी यांच्या घराला आपण सर्वांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन मी करतो. त्यांच्या घराजवळच जल संवर्धनाचे अतिशय व्यवहार्य उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. पावसाचे पाणी साठवण्यासाठी 200 वर्षापूर्वी भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या आहेत.

मित्रहो,
हवामान बदल आणि आपत्ती ही सध्याची महत्वाची आव्हाने आहेत. ही परस्पराशी संबंधित आहेत. या आव्हानांशी लढा देण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे धोरणे, कायदे, नियम,आदेश याद्वारे. यांचे स्वतःचे नक्कीच महत्व आहे. मी आपल्यासमोर काही उदाहरणे मांडतो :  भारताच्या स्थापित विद्युत क्षमतेत बिगर जीवाश्म स्त्रोतांचा वाटा 38 टक्यापर्यंत वाढला आहे. एप्रिल 2020 पासून आम्ही भारत – 6 उत्सर्जन निकष अवलंबत आहोत. युरो – 6 इंधनाप्रमाणे हे निकष आहेत. भारत नैसर्गिक वायूचा सध्याचा 6% वाटा 2030 पर्यंत 15% पर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. एलएनजीचा इंधन म्हणून वापर करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी आम्ही नुकतेच राष्ट्रीय हायड्रोजन अभियान सुरु केले आहे. पीएम कुसुम ही योजनाही सुरु करण्यात आली आहे. यामुळे सौर उर्जा निर्मितीच्या न्याय्य आणि विकेंद्रित मॉडेलसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मात्र धोरणे, कायदे,नियम आणि आदेश यांच्या पलीकडे काही आहे. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे तो म्हणजे वर्तनात्मक परिवर्तन. एक प्रसिध्द गोष्ट आहे, आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. एका लहान मुलाला जगाचा फाटलेला नकाशा दिला आणि त्याला हे जमणारच नाही असा समज ठेवून तो जोडायला सांगितला. मात्र त्या मुलाने तो नकाशा यशस्वीरित्या जोडला. त्याला हे कसे जमले असे विचारले असता, या नकाशाच्या पाठीमागे मानवी आकृती आहे आणि ती मी जोडली, त्यातून नकाशा जोडला गेला असे त्याने सांगितले. यातला संदेश स्पष्ट आहे, आपल्याला जोडुया म्हणजे जग हे उत्तम स्थान बनेल. 

मित्रहो,
वर्तनातल्या बदलाचे बाळकडू हा आपल्या पारंपारिक सवयींचा एक महत्वाचा भाग आहे, जी आपल्याला करूणा भावाने वापर करण्याची शिकवण देते. बेफिकीरपणे वस्तू टाकून देणे हा आपल्या संस्कारांचा भाग नाही. आपल्या शेती पद्धती किंवा अन्नाकडे पहा. आपल्या उर्जा वापराच्या पद्धतीकडे पहा. सिंचनाच्या आधुनिक तंत्रांचा सातत्याने वापर करणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांचा मला अभिमान आहे. मृदा आरोग्य सुधारण्यासाठी आणि कीटक नाशकांचा वापर कमी करण्यासाठी जागरूकता वाढली आहे. आज जग तंदुरुस्ती आणि वेलनेस यावर अधिक लक्ष देत आहे. आरोग्यदायी आणि सेंद्रिय अन्नासाठी वाढती मागणी आहे. आपले मसाले, आयुर्वेदिक उत्पादने यांच्यासह भारत या जागतिक बदलाचे नेतृत्व करू शकतो. याप्रमाणेच पर्यावरण स्नेही संचाराची बाब घ्या. 27 शहरांमध्ये आम्ही मेट्रो प्रकल्पांवर काम करत आहोत हे जाणून आपल्याला निश्चितच आनंद वाटेल.

मित्रहो,
मोठ्या प्रमाणात वर्तनात्मक बदलासाठी आपल्याला कल्पक, किफायतशीर आणि प्रभावी लोकसहभाग देणाऱ्या उपायांची आवश्यकता आहे. मी एक उदाहरण देतो. भारतातल्या जनतेने एलईडी बल्बचा व्यापक उपयोग करण्याचे ठरवले. एक मार्च 2021 पर्यंत 37 दशलक्ष एलईडी बल्बचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पैसे आणि उर्जेचीही बचत झाली आहे. वर्षाकाठी 38 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी झाले आहे. आणखी एक उदाहरण आहे भारताच्या गिव्ह इट अप चळवळीचे. अधिक गरजू लोकांना लाभ व्हावा यासाठी आपले एलपीजी अनुदान त्यागण्याचे एक आवाहन करण्यात आले आणि भारतातल्या अनेकांनी त्याला प्रतिसाद देत या अनुदानाचा त्याग केला. भारतात लाखो घरांना धुरमुक्त स्वयंपाकघर पुरवण्यामध्ये याची मोठी भूमिका राहिली. भारतात एलपीजीचे जाळे 2014 मधल्या 55% वरून आज 99.6% पर्यंत विस्तारले आहे. याचा महिलांना मोठा लाभ झाला आहे. मी आणखी एक सकारात्मक बदल पाहत आहे, तो म्हणजे टाकाऊतून संपत्ती हा भारताचा मूलमंत्र ठरू लागला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात पुनर्वापराची आगळी मॉडेल घेऊन आमचे नागरिक पुढे येत आहेत. चक्राकार अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळेल. किफायतशीर वाहतूक उपक्रमांसाठी शाश्वत पर्याय याअंतर्गत आमचा देश टाकाऊतून संपत्ती निर्मितीला चालना देत आहे. 2024 पर्यंत 15 एमएमटी उत्पादनाचे लक्ष्य ठेवून 5000 कॉम्प्रेस बायोगॅस सयंत्र उभारण्यात येतील. पर्यावरण आणि मानवी सबलीकरणाला यामुळे मदत होणार आहे. 

मित्रहो,
भारतात इथेनॉलचा स्वीकार वाढत आहे. जनतेचा प्रतिसाद लक्षात घेऊन 2030 ऐवजी आता 2025 पर्यंत पेट्रोल मध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.

मित्रहो,
गेल्या सात वर्षात भारतातल्या वन आच्छादनात लक्षणीय वाद झाली आहे. सिंह, वाघ, बिबटे आणि पाणपक्षी यांची संख्या वाढली आहे. सकारात्मक वर्तनात्मक बदलाचे हे मोठे द्योतक आहेत. पॅरिस कराराची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ठरवलेल्या 2030 च्या तारखेआधीच ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गावर भारत आहे याची खात्री हे बदल देतात.

मित्रहो, 
पर्यावरण विषयक स्थित्यंतरासाठी भारताचा दृष्टीकोन हा समविचारी देशांसमवेत काम करण्याचा आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे प्रारंभीचे यश हे, आपली वसुंधरा उत्तम करण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये भारताचे गांभीर्याने केलेल्या प्रयत्नाचे द्योतक आहे. असे प्रयत्न भविष्यातही आम्ही सुरूच ठेवू. महात्मा गांधीजींच्या विश्वस्त भावनेच्या  तत्वाला अनुसरून हे प्रयत्न आहेत. सामुहिकता, करून आणि उत्तरदायित्व हा याचा गाभा आहे. संसाधनांचा जबाबदारीने वापर म्हणजेही  विश्वस्त भावना  होय. महात्मा गांधी यांनी म्हटले होते, ‘आपण निवडल्याप्रमाणे आपण निसर्गाची देणगी वापरू शकतो, मात्र निसर्गामध्ये डेबिट आणि क्रेडीट हे नेहमीच समान असतात.’निसर्ग सोपा ताळेबंद ठेवतो. जे उपलब्ध आहे किंवा क्रेडीट केलेले आहे, ते उपयोगात आणता येईल किंवा डेबिट राहील. मात्र याचे योग्य वितरण हवे, कारण आपण संसाधनाचा बेसुमार वापर केला तर आपण कोणत्यातरी ठिकाणांहून ते हिसकावून घेत आहोत. त्याच धर्तीवर, हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, हवामान न्याय या संदर्भात भारताची भूमिका आहे. 

मित्रहो,
तर्कसंगत आणि पर्यावरण दृष्ट्या विचार करण्याची ही वेळ आहे. हे केवळ मी किंवा तुमच्याबाबत नव्हे तर हे आपल्या ग्रहाच्या भविष्याबाबत आहे, आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण हे देणे लागतो. या पुरस्कारासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.

नमस्ते.

***

Sonal/NC/DY



(Release ID: 1702854) Visitor Counter : 141