विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल -2020 बाबत जनजागृती करण्यासाठी सीएसआयआर-आयआयटीआर, सीएसआयओ आणि आयएमडी यांच्या वतीने कर्टनरेझर कार्यक्रम आयोजित


इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल -2020 मध्ये 41 कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या बहुआयामी बाबी अधोरेखित करणार

Posted On: 29 NOV 2020 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  29 नोव्हेंबर 2020

यावर्षी व्हर्चुअल स्वरूपात होणाऱ्या 6 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाबद्दल (आयआयएसएफ -2020) जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

इंडिया इंटरनॅशनल सायन्स महोत्सव हा चर्चासत्र , कार्यशाळा, प्रदर्शन, चर्चा आणि वादविवादाचे अनोखे मिश्रण असून विविध  प्रात्यक्षिकांसह  तज्ञांशी संवाद आणि वैज्ञानिक नाट्य, संगीत आणि कविता यांचान यात समावेश आहे.  आयआयएसएफ -2020  मध्ये 41  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावर्षी हा महोत्सव 22,डिसेंबर 2020  रोजी सुरू होईल आणि  25, डिसेंबर, 2020 रोजी जगातील प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी याची सांगता होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान नेहमीच देशाच्या प्रगतीचा केंद्रस्थानी असतील यावर त्यांचा दृढ विश्वास होता.

सीएसआयआर- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च, लखनौ इथे झालेल्या  कर्टनरेझर अर्थात पूर्वमाहिती कार्यक्रमात, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे (डीएसआयआर) सचिव , वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक आणि आयआयएसएफ - 2020 च्या  सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. शेखर सी मांडे आपल्या बीजभाषणात  म्हणाले की हा एक बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रम आहे आणि कोविड -19  जागतिक महामारीमुळे   निर्बंध असूनही  सर्व हितधारकांमध्ये वैज्ञानिक आवड जोपासण्याप्रती दुर्दम्य इच्छाशक्ती यातून दिसून येते. आयआयएसएफ  2020 ची संकल्पना : "आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी  विज्ञान" अशी असून आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या भूमिकेबद्दल विचारविनिमय करणे आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय सुचवणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेश सरकारच्या  उच्च शिक्षण व विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री  नीलिमा कटियार  या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणून  आणि लखनौच्या महापौर  संयुक्ता भाटिया विशेष अतिथी  म्हणून उपस्थित होत्या .

तत्पूर्वी उपस्थितांचे स्वागत करताना, सीएसआयआर - आयआयटीआरच्या  संचालक डॉ. सरोज के बारिक म्हणाल्या  की, हा महोत्सव युवा वैज्ञानिकांना संवाद साधण्याची, कल्पनांची देवाणघेवाण  करण्याची  आणि अधिकाधिक जागतिक लाभासाठी सहकार्य  करण्याची संधी आहे.

अवध प्रांत , विज्ञान भारतीचे  राष्ट्रीय संघटन सचिव  जयंत सहस्रबुद्धे,आणि संघटन सचिव श्रेयांश मंडलोई, यांनीही ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला आणि शाळा व महाविद्यालयांना यात  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची असलेली  भूमिका जाणून घेण्यासाठी आयआयएसएफ मंचाचा वापर करण्याचे आवाहन केले

दुसऱ्या एका कार्यक्रमात, सीएसआयआर-नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), लखनऊ यांनी ऑनलाईन  समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमात डॉ.एस.के. बारिक, संचालक, सीएसआयआर-एनबीआरआय यांनी उद्‌घाटनपर भाषण केले आणि  अवध प्रांत , उत्तर प्रदेशचे संघटन सचिव  श्रेयांश मांडलोई यांनी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे  महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले. शेखर सी. मांडे , महासंचालक, सीएसआयआर आणि सचिव, डीएसआयआर यांनी मुख्य भाषण केले.  उत्तर प्रदेश सरकारचे  मंत्री बृजेश पाठक , या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे होते.

चंदीगडमध्ये सीएसआयआर-केंद्रीय वैज्ञानिक साधन संघटनेने (सीएसआयओ) ने आयआयएसएफ -2020 च्या पार्श्वभूमीवर  कर्टनरेझर अर्थात पूर्वमाहिती  कार्यक्रम आयोजित केले होते. डॉ. सुरेशकुमार चौधरी, उपमहासंचालक, आयसीएआर, नवी दिल्ली या आभासी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. एस.डी. महाविद्यालय , केरळचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नागेंद्र प्रभू, आणि आयसीएआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च, हैदराबादचे प्राचार्य वैज्ञानिक डॉ. ब्रजेंद्र परमार यांनी मुख्य व्याख्यान  दिले.  शाश्वत शेती व पर्यावरण यासाठी विज्ञान ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती.

त्याचप्रमाणे, भारत हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), भू विज्ञान मंत्रालय (एमओईएस) यांनी  यूट्यूब चॅनेलवर आयआयएसएफचा कर्टनरेझर अर्थात पूर्वमाहिती   कार्यक्रम आयोजित केला. भू विज्ञान मंत्रालय  सहाव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या आयोजकांपैकी एक आहे. आयएमडीचे  हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम.मोहपात्रा , यांनी स्वागतपर  भाषण केले. भू विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव डॉ.शैलेश नायक, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. या कार्यक्रमाची संकल्पना आत्मनिर्भर भारत  आणि जागतिक कल्याणासाठी हवामान सेवा " अशी होती. डॉ  सती देवी, डॉ.डी.एस. पै, डॉ. आर.के. जेनामणी, के.एन. मोहन, डॉ. ए.के. मित्रा, डॉ.एस.डी. अत्री, डॉ.अशोक कुमार दास आणि डॉ.आर.के. गिरी हे या कार्यक्रमाचे अन्य वक्ते होते.

 

Jaydevi P.S./S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677002) Visitor Counter : 219