आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविडविषयक मंत्रिगटाची 21 वी बैठक


कोविड-19 बाबत भारताचा सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद अत्यंत निग्रही आणि दृढ

आगामी उत्सवकाळ आणि हिवाळ्यात कोविड संसर्गापासून संरक्षणासाठीचे नियम पाळतांना अत्यंत दक्ष राहण्याची गरज- डॉ हर्षवर्धन

Posted On: 13 OCT 2020 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 विषयक मंत्रिगटाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून बैठक झाली. केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंग पुरी, मनसुख लाल मंडवीय, अश्विनी कुमार चौबे, आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्यक्षेत्र) डॉ विनोद पॉल या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरवातीला डॉ हर्षवर्धन यांनी कोविड विरोधातील लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सर्व कोविड योध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी या सर्वांच्या सेवाकार्याला  सलाम केला. 

आतापर्यंत देशात कोविडचे 62,27,295 रुग्ण बरे झाले असून आज जगात भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक म्हणजे 86.78% इतका आहे.  मृत्यूदरही 1.53% म्हणजे जगात सर्वात कमी इतका आहे. सुरुवातीला भारतात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवस इतका होता. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा कालावधी आता 74.9 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असे डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले. सध्या देशभरात कोविड चाचणीसाठी 1927 प्रयोगशाळा आहेत, ज्यामुळे चाचाण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताची चाचणी क्षमता आता दररोज 1.5  दशलक्षपर्यंत वाढवण्यात आली आहे.  गेल्या 24 तासात सुमारे 11 लाख चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

आगामी काळात, येणारे सणवार आणि उत्सव तसेच हिवाळ्यात आपल्या सर्वांना अत्यंत दक्ष राहून कोविड संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करावे लागेल, असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. अशा काळात आपण निष्काळजीपणा केल्यास, रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1664022) Visitor Counter : 169