पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गंगा नदी  निर्मल आणि अविरल बनवण्यासाठी उत्तराखंडमधील सहा प्रमुख प्रकल्पांचे केले उद्घाटन


नमामि गंगे अभियानामुळे उत्तराखंडची सांडपाणी प्रक्रिया क्षमता गेल्या 6 वर्षात 4 पटीने  वाढली

गेल्या 6 वर्षात गंगा नदीत वाहणारे  130 हून अधिक नाले बंद करण्यात आले

गंगा नदीवरील  ‘गंगा अवलोकन ’ या पहिल्या वस्तू संग्रहालयाचे केले उद्घाटन

देशातील प्रत्येक शाळा आणि  अंगणवाडीला पिण्याच्या पाण्याची जोडणी  मिळावी यासाठी 2 ऑक्टोबरपासून 100 दिवसांच्या विशेष मोहिमेची केली घोषणा

उत्तराखंड सरकारने कोरोनाच्या काळातही 50 हजाराहून अधिक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची जोडणी पुरवल्याबद्दल केली प्रशंसा

Posted On: 29 SEP 2020 6:23PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तराखंडमधील 6 भव्य  विकास प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.

मोदींनी हरिद्वार येथे गंगा नदीवरील पहिल्याच गंगा अवलोकन  संग्रहालयाचे उद्घाटन केले. त्यांनी रोइंग  डाऊन द गँजेस पुस्तक आणि जल जीवन मिशनसाठी नवीन लोगोचे प्रकाशन केले. पंतप्रधानांनी याप्रसंगी जल जीवन अभियानांतर्गत ग्रामपंचायती आणि जल समित्यांसाठी मार्गदर्शिकाचे (ग्रामपंचायती व जल समितीसाठी मार्गदर्शक सूचना) अनावरण केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले कि जल जीवन मिशनचे उद्दीष्ट देशातील प्रत्येक ग्रामीण घरात पाईपद्वारे पाण्याची जोडणी उपलब्ध करुन देणे हे आहे.  मोदी म्हणाले की, या अभियानाचा नवीन लोगो पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रेरणा देत राहील.

मार्गदर्शिकेसंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ते ग्रामपंचायतींसाठी, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी तसेच शासकीय यंत्रणेसाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत.

रोइंग डाऊन द गँजेसया पुस्तकाचे वर्णन करताना ते म्हणाले की, त्यात कशा प्रकारे गंगा नदी आपल्या संस्कृती, विश्वास आणि वारसा यांचे एक उज्ज्वल प्रतीक आहे  यासंबंधी तपशीलवार माहिती दिली आहे.

मोदींनी गंगा नदी स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले .  उत्तराखंडमधील तिच्या उगमापासून पश्चिमेकडील बंगालपर्यंत देशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे 50 टक्के लोकांचे जीवन टिकवून ठेवण्यात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

त्यांनी नमामि गंगे अभियान हे सर्वात मोठे एकात्मिक नदी संवर्धन अभियान असल्याचे नमूद केले , ज्याचे उद्दीष्ट केवळ गंगा नदी स्वच्छ करणे हे नाही तर नदीच्या व्यापक संरक्षणाचे देखील  आहे. पंतप्रधान म्हणाले की या नवीन विचारसरणीने आणि दृष्टिकोनामुळे गंगा नदी पुनरुज्जीवित झाली आहे.  जुन्या पद्धती अवलंबल्या असत्या तर आज परिस्थिती तितकीच वाईट झाली असती. जुन्या पद्धतींमध्ये लोकांचा सहभाग आणि दूरदृष्टीचा अभाव होता.

पंतप्रधान म्हणाले की सरकार आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी चार सूत्री  धोरण घेऊन पुढे गेले.

सर्वप्रथम सांडपाणी प्रक्रिया प्लांट (एसटीपी) चे जाळे टाकण्याचे काम सुरू केले जेणेकरून सांडपाणी गंगेमध्ये वाहू नये.

दुसरेपुढील 10 ते 15 वर्षांच्या मागण्या लक्षात घेऊन सांडपाणी प्रक्रिया प्लांट उभारण्यात आले.

तिसरे - गंगा नदी काठची सुमारे शंभर मोठी गावे/शहरे आणि पाच हजार गावे उघड्यावरील शौचापसून मुक्त (ओडीएफ) केली.

आणि चौथे - गंगा नदीच्या उपनद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.

नमामि गंगे अंतर्गत 30,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे प्रकल्प एकतर प्रगतीपथावर किंवा पूर्ण झाले असल्याचे  मोदींनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे उत्तराखंडमधील सांडपाणी प्रक्रिया क्षमतेत गेल्या 6 वर्षात 4 पटीने  वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

गंगा नदीत वाहणारे  उत्तराखंडमधील  130 हून अधिक नाले बंद करण्याच्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यांनी ऋषिकेशमधील मुनी की रेती येथे भेट देणाऱ्या पर्यटक आणि राफ्टर्ससाठी  चंद्रेश्वर नगर नाला डोळ्यांना खुपणारा होता याचा त्यांनी खास उल्लेख केला. नाले बंद केल्याबद्दल आणि मुनी की रेती येथे चार मजली एसटीपी बांधकामाचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले की प्रयागराज कुंभ मध्ये  यात्रेकरूंनी अनुभवल्याप्रमाणे हरिद्वार कुंभ येथे येणाऱ्या भाविकांना देखील उत्तराखंडमधील  स्वच्छ व शुद्ध गंगा नदीचा अनुभव घेता येईल. नरेंद्र मोदी यांनी गंगेतील शेकडो घाटांचे सुशोभीकरण आणि हरिद्वार येथील आधुनिक रिव्हरफ्रंटच्या विकासाचा उल्लेख केला.

गंगा अवलोकन संग्रहालय हे यात्रेकरूंचे विशेष आकर्षण ठरेल आणि यामुळे गंगाशी संबंधित वारशाची समज आणखी वाढेल असे पंतप्रधान म्हणाले

पंतप्रधान म्हणाले, गंगा स्वच्छतेशिवाय नमामि गंगे संपूर्ण गंगा नदीच्या पट्ट्याची  अर्थव्यवस्था आणि पर्यावरण विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. ते म्हणाले, सरकारने सेंद्रिय शेती आणि आयुर्वेदिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक योजना आखल्या आहेत.

या प्रकल्पामुळे यावर्षी 15 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या मिशन डॉल्फिनलाही बळ मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर काम वेगवेगळ्या मंत्रालये आणि विभागांमध्ये विभागल्यामुळे  स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि  समन्वयाचा अभाव दिसून आला. परिणामी, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याशी संबंधित समस्या कायम आहेत. स्वातंत्र्य मिळूनही बरीच वर्षे लोटली तरी  देशातील  15 कोटींहून अधिक घरात  अद्याप पाईपद्वारे पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.

मोदी म्हणाले की, या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समन्वय आणि चालना देण्याच्या उद्देशाने जलशक्ती मंत्रालय तयार करण्यात आले . ते म्हणाले, मंत्रालय आता देशातील प्रत्येक घरात पाईपद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या अभियानात सहभागी झाले आहे.

जल जीवन अभियानांतर्गत आज सुमारे 1 लाख कुटुंबांना दररोज पाइपद्वारे पाणीपुरवठा जोडणी  दिली जात आहेत. ते म्हणाले, केवळ 1 वर्षात देशातील 2 कोटी कुटुंबांना पिण्याच्या पाण्याच्या  जोडण्या  देण्यात आल्या आहेत.

गेल्या 4-5 महिन्यांत कोरोनाच्या काळातही 50 हजाराहून अधिक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची जोडणी दिल्याबद्दल त्यांनी उत्तराखंड सरकारचे कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले की मागील कार्यक्रमांप्रमाणेच जल जीवन मिशनमध्ये  तळागाळापासून सुरुवात करण्याचा दृष्टिकोन अवलंबला आहे, ज्यात  खेड्यांमधील वापरकर्ते आणि पाणी समिती (पाणी समिती) संपूर्ण प्रकल्प राबवण्यापासून देखभाल व कार्यान्वयन सांभाळतील. ते म्हणाले, जल समितीच्या किमान  50%  सदस्या महिला असतील हे या अभियानाने सुनिश्चित केले आहे. ते म्हणाले की, आज प्रसिद्ध  करण्यात आलेल्या मार्गदर्शिका सूचना पाणी समिती व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना योग्य निर्णय घेण्यात  मार्गदर्शन करतील.

पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक शाळा आणि अंगणवाडीला पिण्याच्या पाण्याची जोडणी मिळावी यासाठी जल जीवन अभियानांतर्गत यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी 100 दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान म्हणाले, सरकारने अलीकडेच शेतकरी, औद्योगिक कामगार आणि आरोग्य क्षेत्रात प्रमुख  सुधारणा घडवून आणल्या आहेत.

या सुधारणांना विरोध करणारे केवळ विरोधासाठी  विरोध करत आहेत अशी टीका  मोदींनी केली. ते म्हणाले की, ज्यांनी अनेक दशके देशावर राज्य केले त्यांनी देशातील कामगार, तरुण, शेतकरी आणि महिला सबलीकरणाची कधीही पर्वा केली नाही.

पंतप्रधान म्हणाले की शेतकर्‍यांनी  शेतमाल  फायद्याच्या किंमतीत  कोणालाही किंवा देशात कुठेही  विकू नये अशी त्यांची इच्छा आहे.

पंतप्रधानांनी जन धन बँक खाती, डिजिटल इंडिया मोहीम , आंतरराष्ट्रीय योग दिन यासारख्या सरकारच्या विविध उपक्रमांची यादी सादर केली ज्या  जनतेच्या लाभाच्या असूनही  विरोधकांनी विरोध दर्शविला होता.

ते म्हणाले की, हेच ते लोक आहेत जे हवाई दलाच्या आधुनिकीकरणाला आणि त्यांना  आधुनिक लढाऊ विमाने देण्याला  विरोध करतात. सरकारच्या वन रँक वन पेन्शन धोरणालाही याच लोकांनी विरोध दर्शवला,ज्यामध्ये सरकारने सशस्त्र दलाच्या निवृत्तीवेतनाधारकांना थकबाकीच्या स्वरूपात 11,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची थकित रक्कम दिली.

ते म्हणाले की, हे तेच लोक आहेत ज्यांनी सर्जिकल स्ट्राइकवर टीका केली आणि जवानांना सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सिद्ध करण्यास सांगितले. मोदी म्हणाले की यातून त्यांचे हे खरे हेतू काय आहेत हे संपूर्ण देशाला स्पष्ट झाले आहे.

ते म्हणाले की, काळाच्या ओघात विरोध करणारे आणि निषेध करणारे हे लोक अप्रासंगिक  होत आहेत.

 

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660080) Visitor Counter : 471