पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंतच्या सबमरीन केबल कनेक्टिविटीचे उद्‌घाटन केले


कनेक्टिव्हिटीमुळे अंदमान आणि निकोबार बेटांवरील संधींना चालना मिळेल;पंतप्रधानांचे प्रतिपादन

व्यापार सुलभता आणि समुद्रमार्गे व्यापार याला चालना देण्यावर सरकारचे लक्ष केंद्रीत :पंतप्रधान

अंदमान आणि निकोबार बेटे हे बंदर आधारित विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील

आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापारासाठी अंदमान आणि निकोबार बेटे मुख्य बंदर केंद्र बनतील

Posted On: 10 AUG 2020 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांना मुख्य भूमीशी जोडणाऱ्या  सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे (समुद्र तळाशी टाकलेली केबल) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  उद्‌घाटन करून हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला. या प्रकल्पाची पायाभरणी  पंतप्रधानांकडून 30 डिसेंबर 2018. रोजी  पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली होती.

या कनेक्टिव्हीटीमुळे आता बेटावर अनेक अमर्याद संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. 2300 किलोमीटर्स सबमरीन केबल टाकण्याचे उद्दिष्ट ठेवणे आणि काम नियोजित लक्ष्याच्याआधीच पूर्ण करणे हे स्तुत्य असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

ही सेवा आज चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिटल अंदमान आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज आयलंड अशा काही ठराविक मुख्य बेटांवर सुरू झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. समुद्राखाली जवळपास 2301 किलोमीटर केबल टाकताना खोल समुद्राचे सर्वेक्षण करणे , केबलची गुणवत्ता राखणे आणि खास जहाजातून केबल टाकणे या  गोष्टी कराव्या लागतात, ज्या सोप्या नाहीत, असे म्हणत पंतप्रधानांनी या कामाचे कौतुक केले. या प्रकल्पाला महाकाय लाटा, वादळे,मोसमी पाऊस तसेच कोरोना महामारी दरम्यानचा कठीण काळ या सगळ्यांशीच सामना करावा लागला.

अंदमान निकोबार बेटांना बऱ्याच वर्षांपासून याची निकड भासत होती पण त्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नव्हती, असे पंतप्रधानांनी सांगितले‌‌.अनेक मोठ्या आव्हानांना तोंड देत हा प्रकल्प वेळेवर पूर्ण करू शकल्याबद्दल मोदींनी  आनंद व्यक्त केला.

अंदमान निकोबार बेटावरील नागरिकांना उत्तम आणि किफायतशीर कनेक्टिविटी पुरवणे ही देशाची जबाबदारी आहे असं मोदी म्हणाले. या प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. अंदमान निकोबार बेटे ही दिल्ली किंवा मुख्य भूमीच्या हृदयापासून दूर नाहीत हे सिद्ध करण्याचा केबल कनेक्टीव्हिटी हा एक प्रयत्न आहे, असेही मोदी यांनी सांगितले

प्रत्येक नागरिकाला चांगले राहणीमान

मोदी म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक क्षेत्रातील उत्तम आणि सोयीस्कर राहणीमानासाठी   आधुनिक सुविधा पुरवण्यास सरकार वचनबद्ध आहे. अंदमान निकोबार बेटांना देशाच्या उर्वरित भागांशी   जोडनारे ऑप्टिकल फायबर प्रकल्प हे सुलभ राहणीमानाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचउदाहरणच आहे. देशाचा सीमा भाग आणि बेटे यावरील राष्ट्रीय संरक्षणाच्या  सुविधा यांचा जलद गतीने विकास व्हावा यासाठीही सरकार वचनबद्ध आहे असेही ते म्हणाले.

डिजिटल इंडियाद्वारे अमर्याद संधी

पंतप्रधान म्हणाले की सबमरीन केबल अंदमान-निकोबारला किफायतशीर आणि चांगली कनेक्टीविटी पुरवण्यात मदत करेल आणि डिजिटल इंडियाचे सर्व फायदे आता त्यांच्यापर्यंत पोहोचतील. विशेषतः ऑनलाइन एज्युकेशन , टेलीमेडिसीन ,बँकिंग व्यवस्थापन, ऑनलाइन ट्रेडिंग तसेच पर्यटनाला चालना हे यापैकी काही प्रमुख फायदे.

पंतप्रधान म्हणाले की, हिंदी महासागर हा  हजारो वर्षापासून  नेहमीच भारताच्या व्यापार आणि धोरणात्मक कौशल्ये यांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अंदमान निकोबार ही भारताच्या आर्थिक धोरणात्मक सहकार्याचीमहत्त्वाची केंद्रे आहेत.

इंडो पॅसिफिक भागातील भारताच्या नवीन व्यापार धोरणात भारताची सगळी बेटे महत्त्वाच्या भूमिका बजावतील असेही ते म्हणाले.

ॲट ईस्ट पॉलिसी अंतर्गत भारताचे पूर्व आशियाई देश तसेच सागरी मार्गाने जोडले गेलेले इतर देश यांच्याशी नातेसंबंध राखण्यात अंदमान निकोबार बेटांची भूमिका मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे असेही मोदींनी स्पष्ट केले.

या भूमिकेलाच बळकटी आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी आयलँड विकास समिती  स्थापन झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंदमान निकोबारमध्ये जेप्रकल्प वर्षानुवर्षे पूर्ण झाले नव्हते ते आता वेगाने पूर्ण होत आहेत असेही त्यांनी सांगितले.

मोठे प्रभावी प्रकल्प आणि उत्तम भूमार्ग, हवाईमार्ग तसंच जलमार्ग

पंतप्रधानांनी सांगितलं की, अंदमान आणि निकोबार मधल्या 12 बेटांवर मोठ्या प्रभावी प्रकल्पांचा विकास केला जात आहे. मोबाईल किंवा इंटरनेटसाठी चांगली कनेक्टिविटी देण्यासोबतच पुढे रस्ते हवाई मार्ग आणि जलमार्गाने द्वारे थेट कनेक्टिव्हिटी सुधारावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत असंही त्यांनी सांगितलं.

दोन मोठे पूल आणि राष्ट्रीय महामार्गाद्वारे उत्तर अंदमान आणि मध्यअंदमानमध्ये रस्ते कंनेक्टिविटी सुधारण्याचे काम सुरू आहे त्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

पोर्ट ब्लेअर विमानतळाची क्षमता बाराशे प्रवाशांची व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही त्यांनी सांगितलं याशिवाय दिग्लीपूर, कार निकोबार आणि कॅम्पबेल याठिकाणी विमानतळ कार्यान्वित होत असल्याचं ते म्हणाले.

स्वराज दीप, शहीद दीप आणि लॉंग आयलंड येथे पॅसेंजर टर्मिनल विकसित होत आहेत. याशिवाय  तरंगत्या जेट्टी सारखे वॉटर एरोड्रोम इन्फ्रास्ट्रक्चर येत्या काही महिन्यातच तयार होईल असंही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले  लवकरच बेटे आणि मुख्य भूमीमध्ये सागरी मार्गाने कनेक्टिविटीसाठी  कोची  जहाज बांधणी कारखान्यात तयार होत असलेली चार जहाजे   लवकरच वापरात आणली जातील.

बंदरकेंद्री विका

अंदमान निकोबार या बेटांच्या जगातील अनेक बंदरापासून  असलेल्या अंतरामुळे  ही बेटे बंदरकेंद्री  विकासाचे केंद्र स्थान म्हणून विकसित होत आहेत असं त्यांनी सांगितलं .

बंदरांचे उत्कृष्ट जाळे आणि  त्यांच्या मधील कनेक्टिव्हिटी ज्या देशात आहे त्याला एकविसाव्या शतकातील व्यापाराला चालना देणे शक्य होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज जेव्हा भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि वैश्विक पुरवठा तसेच मूल्य साखळीत मोलाची भूमिका बजावणारा देश म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे अशावेळी जल मार्गांचे जाळे आणि आपली बंदरे ही बळकट करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

बंदरांच्या मूलभूत विकासामधील  कायदेशीर अडथळे दूर करण्यासाठी सतत काम केले जात आहे असेही मोदी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापार

पंतप्रधान म्हणाले की सागरी मार्गाद्वारे व्यापाराला चालना देण्याकडे.  तसेच समुद्र मार्गे सामानवाहतूक सुलभ व्हावे याकडे सरकार लक्ष केंद्रित करत आहे.  आतील बंदरांचे वेगाने बांधकाम होण्यासंदर्भातला मसुदा तसंच ग्रेट निकोबार मध्ये ट्रान्स शिपमेंट पोर्ट संबंधीचा अंदाजे दहा हजार करोड रुपये खर्चाच्या प्रस्तावित प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला. मोदी म्हणाले की यामुळे मोठी जहाजे तिथे नांगरणे शक्य होईल आणि भारताचा समुद्री व्यापारातील हिस्सा वाढेल. त्यामुळे नवीन रोजगार संधी उपलब्ध होतीलअसे ते म्हणाले. मासेमारी, ऍक्वाकल्चर समुद्री वनस्पतींची शेती यासारखी ब्ल्यू इकॉनोमी बेटांमध्ये वाढेल. यामुळे अंदमान निकोबार मध्ये नवीन पायाभूत सुविधा वाढतील. सरकारच्या प्रयत्नांमुळे अंदमान निकोबारला फक्त नवीन सुविधा मिळतील असे नाही तर जगाच्या प्रवासी नकाशावर त्याला ठळक स्थान मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

 

 U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644818) Visitor Counter : 292