निती आयोग

वर्तनात्मक बदलासाठीचे ‘नेव्हीगेटिंग द न्यू नॉर्मल’ हे अभियान व संकेतस्थळाचा नीती आयोगाकडून प्रारंभ


(सर्वांनी मास्कचा वापर करण्यावर विशेष भर)

Posted On: 25 JUN 2020 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2020

 

नीती आयोगाने आज बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशन (बीएमजीएफ), सामाजिक व वर्तनात्मक परिवर्तन केंद्र (सीएसबीसी), अशोका विद्यापीठ, आरोग्य तसेच महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने ‘नेव्हीगेटिंग द न्यू नॉर्मल’ या अभिया नाचा व संकेतस्थळाचा प्रारंभ केला.

कोविड पासून संरक्षण करण्याच्या सवयींवर, विशेषत: महामारीच्या या काळात टाळेबंदी उठविण्याचा टप्पा सुरु असताना मास्कचा वापर करण्यावर, यात प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताब कांत, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा के विजयराघवन, बीएमजीएफचे देशातले संचालक हरी मेनन, प्रसिध्द गीतकार व मॅक्केन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सीसीओ प्रसून जोशी, नीती आयोग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच बीएमजीएफचे वरिष्ठ अधिकारी  होते.

नीती आयोगासमवेत काम करणाऱ्या 92,000 स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्थाही या वेबकास्ट द्वारे केलेल्या आभासी कार्यक्रमास उपस्थित होत्या.

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या व नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या अधिकारप्राप्त गट 6 च्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या अभियानाचे दोन भाग आहेत. पहिला http://www.covidthenewnormal.com/ हे संकेतस्थळ, ज्यामध्ये वर्तनात्मक विज्ञान संबंधित संसाधने व टाळेबंदी उठविण्याच्या काळात कोविड पासून संरक्षण करण्यासाठीच्या सवयी व सामाजिक निकषांचा वापर, यांचा समावेश आहे; तर दुसऱ्या भागात मास्कचा वापर करण्याबाबत माध्यमातून प्रचार, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

 

भारतात टाळेबंदी उठविण्यास सुरुवात झाली असून जनता व संस्था यांना कोविड पासून संरक्षण करण्यासाठीच्या सवयींचा वापर करण्यासाठी कसे प्रोत्साहित करायचे, ही महत्वाची चिंता असल्याचे, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताब कांत यांनी उद्घाटन पर भाषणात सांगितले. लस उपलब्ध होईपर्यंत, मास्कचा वापर, त्याच्या बरोबरीने हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यांचे पालन, नोवेल कोरोना व्हायरसचा फैलाव मंदावण्यासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकार प्राप्त गट 6 व आरोग्य मंत्रालय, आवश्यक सामाजिक वर्तन विषयक सवयींना प्रोत्साहन देऊ इच्छिते; ज्यामध्ये  अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारकडून नागरिकांकडे राहावी. नीती आयोगाने बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशन, सामाजिक व वर्तनात्मक परिवर्तन केंद्र यांच्याशी भागीदारीने, जनतेला अशा सवयी सहजपणे वापरात आणता याव्यात, यासाठी सोप्या व सुटसुटीत कल्पना देण्याचा प्रयत्न केला आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी, आपले भविष्य विषाणूवर नव्हे तर, आपल्या वर्तनावर अवलंबून आहे यावर भर दिला. आपण सुरक्षित अंतर राखले, मास्कचा वापर केला तर विषाणूचा प्रसार होणार नाही, असे त्यांनी सांगितले. मानवतेच्या सच्चेपणाने आपण हा लढा देत आहोत. आदर्श विश्वात आपण कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठीच्या या सवयींचे पालन केले तर, विषाणूचा फैलाव होणार नाही. छोटे कारखाने व वंचित घटकाचा मोठा भाग असलेला गरीब मजूर वर्ग, यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचणे आवश्यक आहे. हे अभियान सुरु केल्यानंतर केवळ एक लाट नव्हे तर, वर्तनात्मक बदलाची सुनामी येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

प्रधान वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन यांनी या अभियानाची प्रशंसा केली व आपण जोपर्यंत प्रभावीपणे सुरक्षित अंतराचे पालन करत नाही, तोपर्यंत हा रोग सातत्याने पसरत राहील असे सांगितले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी राजेश भूषण यांनी या अभियानाला मंत्रालयाकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

'बीएमजीएफ'चे भारतातले संचालक हरी मेनन यांनी, राष्ट्रीय कोविड-19 प्रतिसादामधे सहकार्यासाठी भारत सरकार आणि नीती आयोगा समवेत भागीदारीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठीच्या सवयींना  प्रोत्साहन देण्यासाठी सोप्या पद्धतीने वर्तनात्मक विज्ञान वापरात आणण्यासाठीच्या या अभिनव उपक्रमात सरकार समवेत काम करणे, ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे ते म्हणाले. ‘नेव्हीगेटिंग द न्यू नॉर्मल’ या अभियानातून रोगापासून संरक्षण देणाऱ्या सवयी, विशेषतः नेहमीच मास्कचा वापर करण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले.

मॅक्केन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सीसीओ प्रसून जोशी यांनी या टप्य्यात आपणासमोर अनेक आव्हाने असल्याचे सांगितले. कोविड रोखण्यासंदर्भातल्या सवयी आपल्या दिनचर्येचा भाग होईपर्यंत आपण त्याकडे लक्ष पुरवले पाहिजे. मास्कचा वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. एक समाज म्हणून आपण  मास्कचा वापर करण्याची आवश्यकता स्वीकारली पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे आणि आपल्या वर्तणुकीत ते प्रतीत झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=pbaSzQQ9q5s&feature=youtu.be

अभियानाबाबत:

संकेतस्थळ

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी, तसेच इतर संबंधीतांशी विचार विनिमय करून विकसित करण्यात आलेल्या या संकेतस्थळाचा उद्देश जनतेचा सहभाग वाढवणे, तसेच  सामाजिक व स्वयंसेवी संस्थाना सहभागी करून घेणे, हा आहे. विविध क्षेत्रात कोविड संदर्भात सुरक्षित सवयी उपयोगात आणण्यासाठी धोरण व सहाय्यक उपाय यांचा हा कोश ठरेल. सामाजिक, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक संस्था, आंगणवाडी कार्यकर्त्या, जिल्हा प्रशासन यासह सर्वांना मुक्त स्त्रोत उपलब्ध करून देण्याचा यामागचा उद्देश आहे. या उपलब्ध माहितीच्या आधारे संस्था व नागरी सामजिक संघटना, कोविड पासून संरक्षण करण्याच्या उपायांसह दैनंदिन व्यवहार सुरु करण्याचा आराखडा तयार करू शकतात.

या संकेस्थळामध्ये टाळेबंदी उठविण्याच्या काळात वर्तनविषयक चार बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे-

1 मास्कचा वापर

2 सुरक्षित अंतर

3 हातांची स्वच्छता

4 सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे

या संकेतस्थळावरआरोग्य, पोषण व सार्वजनिक परिवहन यासाठी क्षेत्रानुसार उपाय व मार्गदर्शक तत्वे असतील.

मास्कचा वापर करण्याच्या अभियानावर भर

योग्य प्रकारे मास्क घालण्यासाठी माध्यमांचा उपयोग केला जाईल. या सोप्या उपायामुळे कोविड-19 विरोधातल्या लढ्याला निश्चितच बळ मिळेल. जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांनी मास्कचा वापर सामाजिक स्वीकृत मानदंड ठरवला आहे. मास्क बांधण्याचे अभियान बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनने मॅक्केन वर्ल्ड ग्रुपशी भागीदारीने तयार केले आहे.

 

S.Pophale/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634556) Visitor Counter : 280