रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून समन्वयाद्वारे दाव्यांचा जलद निपटारा

Posted On: 17 JUN 2020 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जून 2020

समन्वयाद्वारे दाव्यांचा त्वरित तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आणि त्याद्वारे देयता कमी करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तीन स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करुन सामंजस्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रत्येक समितीती प्रत्येकी तीन सदस्य आहेत. या समन्वय समितीचे अध्यक्ष न्यायपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, लोक प्रशासन, आर्थिक व खासगी क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत.

लवाद अधिनियम 2015 आणि 2019 मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार सर्व लवादाचे विवाद 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत निकाली काढले जायला हवे. तथापि, 12 महिन्यांत दाव्यांचे निराकरण होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण त्यात विविध प्रक्रिया समाविष्ट असतात. त्याच वेळी, समन्वयाचा मार्ग जलद, सुस्पष्ट आणि पारदर्शक पद्धतीने दाव्यांचा निपटारा सुसंवादातून सुनिश्चित करतो. सीसीआयई अर्थात स्वतंत्र तज्ज्ञांच्या समन्वय समितीकडे दावे वर्ग झाल्याच्या दिवसापासून सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पाच बैठकींद्वारे प्रत्येक प्रकरणात सामंजस्याने निपटारा कार्यवाही पूर्ण केली जाते. शिवाय, लवादाच्या आणि समन्वय (दुरुस्ती) कायदा, 2015 नुसार सामंजस्य ही अधिक सुदृढ, जलद प्रक्रिया असून या पद्धतीद्वारे झालेल्या तडजोडीला न्यायालयाच्या निकालाइतकेच कायदेशीर मूल्य आहे.

आतापर्यंत 108 प्रकरणे सीसीआयईकडे पाठविण्यात आली असून 13,349 कोटी रुपये किमतीचे दावे 3,743 कोटी रुपयांवर यशस्वीरित्या निकाली काढण्यात आले आहेत. सर्व विवाद सामंजस्याने सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय जलदगतीने काम करीत आहे. यामुळे लवादाच्या प्रक्रियेत दीर्घकाळ रखडलेल्या दोन्ही बाजूंच्या अडचणी कमी होण्याबरोबरच लवादाच्या प्रक्रियेत अडकलेला पैसा खाजगी क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी वापरला जाऊ शकतो.

 

S.Thakur/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1632157) Visitor Counter : 259