मंत्रिमंडळ
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून "भारत औद्योगिक विकास योजना रसायन (भव्य रसायन)" या केमिकल पार्क योजनेला मंजुरी
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 4:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात तीन समर्पित केमिकल पार्क स्थापन करण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना रसायन किंवा भव्य-रसायन (BHAVYA-Rasayan) योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेची घोषणा आर्थिक वर्ष 2026–27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
या योजनेचा एकूण आर्थिक परिव्यय Rs. 3,030 कोटी असेल, ज्यामध्ये पार्कमध्ये सामायिक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधा उभारण्याचा खर्च भागवण्यासाठी 3,000 कोटी रुपये आणि प्रशासकीय खर्चासाठी 30 कोटी रुपयांचा समावेश आहे. ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 ते आर्थिक वर्ष 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जाईल.
सदर योजनेअंतर्गत, केंद्र सरकार प्रति पार्क 1,000 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान देईल. हे संबंधित राज्य सरकारच्या किमान 500 कोटी रुपयांच्या योगदानाच्या अटीवर असेल.
भव्य रसायन योजनेमुळे अर्थव्यवस्थेला खालील लाभ होण्याची अपेक्षा आहेः
• हे अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम आणि अनुषंगिक उद्योगांसह संपूर्ण मूल्य साखळीत रासायनिक उद्योगाच्या विकासाला प्रोत्साहन देईल, ज्यामुळे संसाधनांचा कार्यक्षम वापर होईल आणि लॉजिस्टिक खर्च कमी होईल.
• रासायनिक उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, सामायिक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांद्वारे खर्चातील स्पर्धात्मकता वाढेल आणि भारतीय उद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनेल.
• यामुळे भारतीय रासायनिक उद्योगाला जागतिक मूल्य साखळीत अधिक चांगल्या प्रकारे समाविष्ट होण्यास मदत होईल, ज्यामुळे निर्यात वाढेल आणि आयात पर्यायतेला चालना मिळेल.
• हे पर्यावरणपूरक परिसंस्था तयार करून भारतीय रासायनिक उद्योगाच्या शाश्वत विकासाला चालना देईल. यामध्ये सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, प्रक्रिया, साठवणूक व विल्हेवाट सुविधा आणि धोकादायक कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा यांसारख्या मध्यवर्ती सुविधांचा समावेश असेल. यामुळे पर्यावरणीय नियमांचे अधिक चांगले पालन सुनिश्चित होईल, ज्यामुळे पर्यावरणास अनुकूल मार्गाने उद्योगाच्या विकासाला प्रोत्साहन मिळेल.
रसायन क्षेत्राच्या विकासामुळे, अर्थव्यवस्थेतील पुढच्या फळीतील क्षेत्रांचा देखील अधिक विकास होऊन एक साखळी परिणाम साधला जाईल आणि त्यायोगे अधिक रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेचा व्यापक विकास होऊन विकसित भारत @ 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.
हे क्षेत्र कृषी, वस्त्रनिर्मिती, औषधनिर्मिती, पोषणकारी औषध निर्मिती, बांधकाम, वाहन उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विविध उद्योगांमध्ये वापरली जाणारी रसायने आणि पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन करते हे ओळखून या क्षेत्राकडे देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करून, देशांतर्गत उत्पादन क्षमता सुधारुन आणि रोजगार निर्मिती करून रसायन क्षेत्राच्या विकासाला ही नवीन भव्य रसायन योजना चालना देईल.
सदर योजनेनुसार, केंद्र सरकार चॅलेंज रूट अंतर्गत राज्य सरकारांद्वारे तीन समर्पित रसायन पार्क्सच्या विकासासाठी सुविधा उपलब्ध करून देईल. यापैकी प्रत्येक पार्कमध्ये किमान 8 चौ.किमी इतकी (किमान 2,000 एकर) सलग आणि कोणत्याही कायदेशीर तंट्यापासून मुक्त जमीन असेल. या पार्क्समध्ये प्लग-अँड-प्ले प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील आणि रसायन उद्योगासाठी सामायिक पायाभूत सुविधा तसेच मुलभूत सोयीसुविधा असे त्यांचे स्वरूप असून त्या खालीलप्रमाणे असतील:
• सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी),
• प्रक्रिया, साठवण आणि विल्हेवाट सुविधा (टीएसडीएफ),
• पाणीपुरवठा आणि वितरण प्रणाली,
• द्रावक पुनर्प्राप्ती आणि उर्ध्वपातन सुविधा,
• बाष्प निर्मिती आणि वितरण जाळे,
• परस्परांशी जोडलेले पाईपलाईनचे जाळे,
• लॉजिस्टिक्स आणि गोदाम सुविधा.
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289003)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada