कृषी मंत्रालय
एल निनोच्या चिंतेमुळे केंद्र सरकार सतर्क, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले जाईल”: शिवराज सिंह चौहान
ज्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तेथे विशेष देखरेख आणि जलद कारवाई करण्याचे निर्देश शिवराज सिंह चौहान यांनी दिले
“आकस्मिक योजना केवळ कागदावरच न राहता जमिनीवर स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत,” शिवराज सिंह चौहान यांचे उच्चस्तरीय आढावा बैठकीदरम्यान प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2026 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2026
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्लीत नैऋत्य मान्सून, एल निनोचा संभाव्य परिणाम, पाण्याची उपलब्धता, बियाण्यांची व्यवस्था, पीक धोरण आणि विविध राज्यांच्या तयारीचा स्तर या संदर्भात सविस्तर आणि व्यापक आढावा घेतला. या महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठकीत शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सर्व संबंधित केंद्रीय विभाग आणि राज्य सरकार यांनी पूर्ण गांभीर्याने, उत्तम समन्वयाने आणि योग्य पूर्वनियोजनासह काम केले पाहिजे.

कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला, योग्य बियाणे, पर्यायी पिकांचे पर्याय, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पाठिंबा आणि योग्य जल व्यवस्थापनासाठी मदत मिळावी, हे सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पूर्ण सतर्कतेने सर्व तयारी करत आहे. हवामानाशी संबंधित कोणत्याही आव्हानांचा शेतांवर आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम शक्य तितका कमी राहील, हे सुनिश्चित करणे हे पहिले लक्ष्य आहे.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, एल निनोचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन सर्व ती आवश्यक तयारी वेळेवर पूर्ण केली पाहिजे. बैठकीदरम्यान हवामानाचा अंदाज, पाण्याची उपलब्धता, पिकांची सद्यस्थिती, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठांची व्यवस्था, राज्यांची तयारी आणि कोणत्याही संभाव्य प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या कृती योजनांवर सविस्तर चर्चा झाली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2026 मधील नैऋत्य मोसमी पाऊस, सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारचे समन्वित प्रयत्न, जलव्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धती, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन सुविधांचा विस्तार आणि हवामान अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब यांद्वारे संभाव्य आव्हानांचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येईल,असे ते म्हणाले.
बैठकीत मांडण्यात आलेल्या महत्त्वाच्या आणि दिलासादायक माहितीनुसार, सध्या देशातील जलाशयांतील पाणीसाठा समाधानकारक असून एकूण साठवण, सामान्य पातळीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहे.
ज्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस, दीर्घकालीन कोरडे कालखंड किंवा एल निनोचा तुलनेने अधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे, त्या भागांमध्ये विशेष देखरेख, सातत्यपूर्ण आढावा आणि तातडीची कार्यवाही कोणताही विलंब न करता सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा पातळीपर्यंत आकस्मिक योजना सक्रिय केल्या पाहिजेत आणि या योजनांकडे केवळ कागदोपत्री सोपस्कार म्हणून पाहिले जाऊ नये, यावर त्यांनी तीव्र भर दिला.

बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांसाठी, आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात बियाण्यांचा साठा उपलब्ध आहे.
बैठकीत रोग आणि कीड व्यवस्थापनाला विशेष महत्त्व देण्यात आले.
बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली.
* * *
सुषमा काणे/निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268192)
आगंतुक पटल : 9