युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"राष्ट्रीय क्रीडा महासंघ परिषद हे आगामी आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांच्या तयारीच्या दिशेने भारताने उचललेले एक समन्वयित पाऊल ठरेल": केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया


"भारतीय क्रीडा विश्वातून उत्तेजक सेवनाचे उच्चाटन करण्यासाठी सामूहिक जबाबदारी आणि कठोर कारवाईची आवश्यकता आहे": डॉ. मनसुख मांडविया

"खेळाडूंचे कल्याण आणि खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवणारा कारभार हेच प्रत्येक महासंघाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे": केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडवीय


"आगामी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या दिशेने भारताची वाटचाल ही कामगिरीवर आधारित, विज्ञानाचे साहाय्य आणि अधिक सक्षम महासंघांच्या माध्यमातून समर्थपणे उभी राहिलेली असेल": राज्यमंत्री रक्षा खडसे

Posted On: 07 MAY 2026 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2026

 

भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह 37 राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे (एन एस एफ) प्रतिनिधी एकत्र आलेल्या 'राष्ट्रीय क्रीडा महासंघ परिषद 2026' या परिषदेला  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संबोधित केले.  भारताचा भविष्यातील क्रीडा आराखडा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026, आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आणि उन्हाळी ऑलिम्पिक 2028 यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीवर चर्चा करणे हा या परिषदेचा उद्देश होता.

"राष्ट्रीय क्रीडा महासंघ परिषद हे आगामी जागतिक क्रीडा स्पर्धांच्या तयारीच्या दिशेने भारताने उचललेले एक समन्वित पाऊल आहे." असे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मांडविया  या परिषदेला संबोधित करताना म्हणाले.

दीर्घकालीन नियोजन, वैज्ञानिक प्रशिक्षण, अधिक सक्षम क्रीडा पायाभूत सुविधा आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करणाऱ्या खेळाडूंना सातत्यपूर्ण पाठिंबा देऊन भारताला एक 'अग्रगण्य क्रीडा राष्ट्र' म्हणून घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याबाबतचा सरकारचा व्यापक दृष्टीकोनदेखील क्रीडा मंत्र्यांनी अधोरेखित केला.

"भारताचे क्रीडा भविष्य हे खेळाडू, महासंघ आणि सरकार यांच्यातील अधिक सक्षम समन्वयावर अवलंबून आहे." असे  डॉ. मांडविया  संस्थात्मक सुधारणा आणि सुशासनाच्या पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले. 

महासंघांमधील कारभार हा खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवणाराच असला पाहिजे यावर भर देत त्यांनी अधिक पारदर्शकता, कालबद्ध निवडणूका, उत्तरदायित्व आणि अधिक सक्षम संस्थात्मक यंत्रणांची मागणी केली. याद्वारे भारतीय क्रीडा विश्वात खेळाडूंचे कल्याण हेच केंद्रस्थानी राहील याची खात्री करणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. 

जनजागृती, शिक्षण आणि कडक कायदेशीर उपाययोजनांच्या माध्यमातून, भारताच्या क्रीडा विश्वातून 'उत्तेजक पदार्थांचे सेवन' अर्थात डोपिंगचे समूळ उच्चाटन करण्याच्या सरकारच्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्र्यांनी केला.

"भारताच्या क्रीडा विश्वातून डोपिंगचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सामुहिक जबाबदारी आणि कठोर कृती आवश्यक आहे असे  डॉ. मांडविया म्हणाले. देशांतील विविध क्रीडा महासंघ, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना, देशांत निर्दोष आणि पारदर्शक क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी सक्रीय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच वर्ष  2028 मध्ये, लॉस एंजलीस येथे  होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या पदकांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षण, स्पर्धांमध्ये नियमित सहभाग, खाजगी क्षेत्राचे  क्रीडा क्षेत्रात योगदान, साखळी सामने, प्रशिक्षण संस्था आणि प्रशासकीय सुधारणा महत्त्वपूर्ण असल्याचे  त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं.

या परिषदेदरम्यान, 'राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2025 : नियम आणि सुधारणा मार्गदर्शक तत्वे' या पुस्तिकेचे औपचारिक अनावरणदेखील, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

अधिकाधिक जबाबदारीची जाणीव अर्थात उत्तरदायित्व, खेळाडू निवडीची पारदर्शक प्रक्रिया, आणि क्रीडा महासंघांना शाश्वत आणि संस्थात्मक पाठिंबा याद्वारे देशाची  क्रीडा संरचना अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे  क्रीडा मंत्र्यांनी नमूद केले.

मुक्त आणि निष्पक्ष निवड प्रक्रिया, स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभाग, विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांसोबत  संबंध अधिक दृढ करणे आणि खेळाडू, प्रशिक्षक तसेच  प्रशासकीय यंत्रणांमध्ये वाढीव गुंतवणूक सुनिश्चित करण्यासाठी, सरकार कटिबद्ध आहे असे मांडविया  यांनी  सांगितलं.

केंद्रीय युवा  व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी, भविष्यात सुसज्ज अशी क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी, दीर्घकालीन नियोजन, खेळाडूंना सहाय्यभूत यंत्रणा आणि शास्त्रोक्त प्रशिक्षण पद्धती यांचे महत्त्व  विषद केले.

"आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि 2028 मध्ये  होणाऱ्या लॉस एंजलीस ऑलिम्पिक, या  आगामी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या दिशेने भारताची वाटचाल ही कामगिरीवर आधारित, विज्ञानाचे साहाय्य आणि अधिक सक्षम महासंघांच्या माध्यमातून समर्थपणे उभी राहिलेली असेल", असे  त्या  म्हणाल्या.

 

* * *

सोनाली काकडे/संदेश नाईक/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258895) अभ्यागत कक्ष : 6