पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (133 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
Posted On:
26 APR 2026 12:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2026
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार!
मन की बातच्या आणखी एका भागात तुमच्या सोबत संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. याच वेळी मध्येच निवडणुकीची धावपळ सुरू आहे. मात्र, तुमच्या पत्रांच्या आणि संदेशांच्या माध्यमातून आपण देश आणि देशवासियांच्या यशाबद्दल एकमेकांसोबत आपल्या आनंदवार्ता देखील सामायिक करत आहोत. यावेळी 'मन की बात' ची सुरुवात देशाच्या अशाच एका खूप मोठ्या कामगिरीने करूया.
मित्रांनो,
भारताने विज्ञानाला नेहमीच देशाच्या प्रगतीशी जोडले आहे. याच विचाराने आपले शास्त्रज्ञ 'नागरी अणू कार्यक्रम' पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देत आहे. यामुळे आपल्या औद्योगिक विकासाला, ऊर्जा क्षेत्राला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. शेतीपासून ते आधुनिक नवसंशोधकांपर्यंत सर्वांनाच भारताच्या नागरी अणू कार्यकर्माने मोठी मदत केली आहे.
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वीच आपल्या अणू शास्त्रज्ञांनी आणखी एका मोठ्या कामगिरीद्वारे भारताचा गौरव वाढवला आहे. तामिळनाडूच्या कल्पक्कम येथील 'फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ने क्रिटिकॅलिटी (Criticality) साध्य केली आहे. प्रत्यक्षात क्रिटिकॅलिटी हा तो टप्पा आहे ज्यामध्ये रिऍक्टर पहिल्यांदाच सेल्फ सस्टेनिंग न्यूक्लिअर चेन रिऍक्शन मध्ये यश मिळवतो. या टप्प्याचा अर्थ असा आहे की, रिऍक्टर आता ऑपरेशन टप्प्याच्या स्थितीत पोहोचला आहे. भारताच्या अणू ऊर्जा प्रवासातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे अणू संयंत्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले आहे.
मित्रांनो,
याला ब्रीडर रिॲक्टर का म्हणतात? यामागेही एक कारण आहे. ही अशी एक प्रणाली आहे, जी ऊर्जेच्या उत्पादनासोबतच भविष्यासाठी नवीन इंधनही स्वतःच तयार करते. मित्रहो, मला मार्च 2024 चा तो काळ आठवतोय, जेव्हा मी कल्पक्कममध्ये रिऍक्टरच्या कोर लोडिंगचा साक्षीदार झालो होतो. ज्यांनी भारताच्या अणू कार्यक्रमात आपले अमूल्य योगदान दिले आहे, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. देशवासियांचे जीवन अधिक चांगले आणि सुसह्य बनवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे 'विकसित भारता'च्या आपल्या संकल्पालाही एक नवी ऊर्जा मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
'मन की बात' मध्ये आज मला अशा एका शक्तीबद्दल बोलायचे आहे जी अदृश्य आहे, परंतु जिच्याशिवाय आपले जीवन एक क्षणही चालू शकत नाही. हीच ताकद भारताला पुढे नेत आहे. ही आपली पवन-शक्ती आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे –
‘वायुर्वा इति व्यष्टि:, वायुरवै समष्टि:|’
अर्थात वायू केवळ एक तत्व नाही, ही जीवनाची ऊर्जा आहे, ही समष्टीची शक्ती आहे.
मित्रांनो,
आज हीच पवन-शक्ती भारताच्या विकासाची नवीन गाथा लिहित आहे. भारताने अलीकडेच पवन-ऊर्जा म्हणजेच Wind Energy मध्ये मोठे यश संपादन केले आहे. आता भारताची पवन-ऊर्जा निर्मिती क्षमता 56 गिगावॉट पेक्षा अधिक झाली आहे. गेल्या केवळ एका वर्षातच सुमारे 6 गिगावॉट नवीन क्षमतेची भर पडली आहे. पवन-ऊर्जेमध्ये भारत झपाट्याने पुढे जात आहे आणि जगही आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.
मित्रहो,
आज भारत पवन-ऊर्जा क्षमतेमध्ये जगात चौथ्या स्थानावर आहे. आपल्या अभियंत्यांचे हे कष्ट आहेत, हे आपल्या तरुणांचे परिश्रम आहेत आणि हे देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे.
मित्रांनो,
गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान अशी देशातील अनेक राज्ये या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. गुजरातचे कच्छ, पाटण, बनासकांठा यांसारखे भाग, जिथे पूर्वी फक्त वाळवंट दिसायचे, तिथे आज मोठे नवीकरणीय ऊर्जा पार्क तयार होत आहेत. याचा लाभ युवा वर्गाला मिळत आहे, नवीन संधी निर्माण होत आहेत, नवीन कौशल्ये विकसित होत आहेत आणि रोजगाराचे नवे मार्ग खुले होत आहेत.
मित्रांनो,
भारताच्या विकासासाठी सौर आणि पवन ऊर्जा आवश्यक आहेत. ही केवळ पर्यावरणाची बाब नाही - तर ही आपल्या भविष्याची सुरक्षा आहे. यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका आहे. आपल्याला वीज वाचवायची आहे, आपल्याला स्वच्छ ऊर्जा म्हणजेच clean energy चा स्वीकार करायचा आहे. देशामध्ये प्रत्येक स्तरावर असे प्रयत्न होणे गरजेचे आहे, कारण यातूनच मोठा बदल घडून येतो.
मित्रांनो,
मे महिन्याची सुरुवात एका पावन पर्वाने होणार आहे. काही दिवसांतच आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. मी तुम्हा सर्व देशवासियांना आधीपासूनच शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्धांचा जीवन संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. शांततेची सुरुवात आपल्या आतूनच सुरू होते, हे त्यांनी आपल्याला शिकवले आहे; स्वतःवर विजय मिळवणे हाच सर्वात मोठा विजय असतो, हे त्यांनी सांगितले आहे. आज जग ज्या प्रकारच्या तणावातून आणि संघर्षातून जात आहे, अशा काळात बुद्धांचे विचार अधिकच महत्त्वाचे झाले आहेत.
मित्रांनो,
दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये एक संस्था भगवान बुद्धांचे विचार पुढे नेत आहे. लडाखमध्ये जन्मलेल्या ड्रबपोन ओत्जर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. ही संस्था ध्यान आणि करुणा लोकांच्या जीवनाशी जोडत आहे. कोचीगुआज खोऱ्यात बांधलेला स्तूप लोकांना शांततेची अनुभूती देतो. खरोखरच, हे पाहून अभिमान वाटतो. भारताची प्राचीन विचारसरणी जगापर्यंत पोहोचत आहे आणि दूर-दूरचे लोकही तिच्यासोबत जोडले जात आहेत.
मित्रांनो,
बौद्ध परंपरा आपल्याला निसर्गासोबत नाते निर्माण करण्याची शिकवण देते. भगवान बुद्धांना ज्ञान एका वृक्षाखालीच मिळाले होते. निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. देशामध्येही असे प्रयत्न होत आहेत. कर्नाटकातील कर्मा मोनास्टरी याचे उत्तम उदाहरण आहे. 100 एकरमध्ये पसरलेला हा मठ एक जिवंत वनक्षेत्र आहे. या वनामध्ये 700 हून अधिक देशी वृक्षांचे जतन करण्यात आले आहे.
मित्रांनो,
बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध पौर्णिमेची ही संधी आपल्याला प्रेरणा देते. आपण आपल्या जीवनात शांतता वाढवूया, करुणेचा अंगिकार करुया आणि संतुलनासह पुढे जाऊया.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, आपल्या देशात आता 23 जानेवारी, म्हणजेच नेताजी सुभाष यांच्या जयंतीपासून ते 30 जानेवारी, म्हणजेच गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत प्रजासत्ताकाचा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असतो – बीटिंग रिट्रीट...... आज मी तुमच्याशी बीटिंग रिट्रीट बद्दल चर्चा करत आहे, कारण त्यामागे एक विशेष कारण आहे.
मित्रांनो,
तुम्ही पाहिले असेल की, हा सोहळा विविध बँडच्या वैविध्यपूर्ण संगीत परंपरांचे दर्शन घडवतो. गेल्या काही वर्षांपासून यामध्ये भारतीय संगीताचा समावेश वाढला आहे आणि देशातील लोकांनाही ते आवडू लागलं आहे. या वर्षीचा बीटिंग रिट्रीट सोहळा देखील अत्यंत संस्मरणीय ठरला होता. हवाई दल, लष्कर, नौदल आणि सी.ए.पी.एफ च्या बँड्सनी अतिशय उत्तम सादरीकरण केले होते.
मित्रांनो,
शानदार संगीताबरोबरच दिमाखदार फॉरमेशन हा कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेतो. हवाई दलाच्या बँडने सिंदूर फॉरमेशन तयार केले. नौदलाच्या बँडने मत्स्य यंत्र फॉरमेशन बनवले. तर दुसरीकडे, लष्कराच्या बँडच्या सादरीकरणात वंदे-मातरम् ची 150 वर्षे आणि क्रिकेट मधील भारताच्या यशाचेही दर्शन घडवण्यात आले.
मित्रांनो,
बीटिंग रिट्रीटची सांगता झाल्यानंतर हे सर्व परिश्रम आणि हे यश हळूहळू धूसर होत जायचे. परंतु आता यासंदर्भात एक खूप चांगला प्रयत्न झाला आहे. बीटिंग रिट्रीटचे संगीत पहिल्यांदाच वेव्हस ओटीटी वर देखील उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात ते इतर मंचावर सुद्धा उपलब्ध असेल - तुम्ही ते नक्कीच ऐका. तुम्हाला आपली सशस्त्र दले आणि त्यांच्या परंपरांचा खूप अभिमान वाटेल.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत देशाच्या विविध भागांतून निसर्ग संवर्धनाच्या प्रेरणादायी कथा समोर आल्या आहेत. या कथा आपल्यामध्ये आशावाद निर्माण करतात आणि अभिमानाने भरून टाकतात. ‘मन की बात’च्या श्रोत्यांना मला काही उदाहरणांची माहिती द्यायची आहे. ती ऐकून तुमचे मन प्रसन्न होईल.
सर्वात आधी, कच्छच्या रणाबद्दल बोलूया. पाऊस संपताच येथील धरणी जिवंत होते. दरवर्षी लाखो फ्लेमिंगो येथे येतात. संपूर्ण परिसर गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो, म्हणूनच याला ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हटले जाते. हे पक्षी इथेच घरटी बांधतात आणि आपल्या पिलांना मोठे करतात. कच्छचे लोक यांना ‘लाखा जी के बाराती’ म्हणतात. आता लाखा जींचे हे वऱ्हाडी कच्छमध्ये पर्यावरण संवर्धनाचे एक अतिशय सुंदर प्रतीक बनले आहेत.
मित्रांनो,
दुसरा किस्सा मानव आणि वन्यजीवांच्या सहयोगाचा आहे आणि हा उत्तर प्रदेशातला आहे. इथल्या तराई क्षेत्रात सुगीच्या हंगामात हत्तींचे कळप गावाकडे येतात. यामुळे संघर्षाची शक्यता वाढते. परंतु, आता यू.पी. मध्येही ‘गज मित्र’ सारखे प्रयत्न सुरू झाले आहेत. गावातील लोकच पथके तयार करून हत्तींवर लक्ष ठेवतात. ते वेळेवर लोकांना सावध करतात. यामुळे संघर्ष कमी होत आहे आणि लोकांमध्ये विश्वास वाढत आहे.
मित्रांनो,
मध्य भारतातूनही एक चांगली बातमी आली आहे. छत्तीसगडमध्ये ब्लॅकबग, म्हणजेच काळवीट पुन्हा दिसू लागले आहेत. एकेकाळी यांची संख्या खूप कमी झाली होती, परंतु सतत प्रयत्न झाले आणि संरक्षण वाढवण्यात आले. आज ते पुन्हा मोकळ्या मैदानात धावताना दिसतात. हे आपल्या हरवलेल्या वारशाचे पुनरागमन आहे. अशीच आशा ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच गोडावणच्या संवर्धनातही दिसत आहे. हे पक्षी आपल्या वाळवंटी भागाची ओळख असायचे. परंतु, एक काळ असा आला की ते फारच कमी संख्येने उरले होते. परिस्थिती अशी होती की हा पक्षी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. पण आता याच्या संवर्धनासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब होत आहे. प्रजनन केंद्रे उभारली गेली आहेत आणि आता नव्या जीवनाची सुरुवात दिसून येत आहे.
मित्रांनो,
निसर्ग आणि मानव वेगवेगळे नाहीत. आपण एकमेकांचे सोबती आहोत. ज्यावेळी आपण निसर्गाचा विचार करतो, त्याचा आदर करतो आणि त्याच्या सोबत वाटचाल करतो, तेव्हा बदल स्पष्टपणे दिसून येतो. आज हाच बदल देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी आशा बनून समोर येत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
ईशान्य भारत आपल्या सर्वांसाठी अष्टलक्ष्मी आहे. या भागात अफाट प्रतिभा आहे आणि ईशान्येचे नैसर्गिक सौंदर्यही सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. मन की बात मध्येही आपण नेहमीच ईशान्येकडील लोकांच्या यशाबद्दलची चर्चा करत आलो आहोत. आज अशाच एका आणखी यशाद्दलची चर्चा मी तुमच्यासोबत करणार आहे आणि ती आहे बांबूच्या क्षेत्रात ईशान्येच्या यशस्वी घोडदौडीची. मित्रहो, ज्या गोष्टीकडे कधीकाळी ओझे म्हणून पाहिले जात होते, ती गोष्ट आज रोजगार, व्यवसाय आणि नवोन्मेषाला नवी गती देत आहे. आपल्या माता भगिनी याच्या सर्वात मोठ्या लाभार्थी आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बांबूची व्याख्या बदलल्यामुळे किती मोठा बदल घडून आला आहे. मित्रहो, इंग्रजांनी बनवलेल्या कायद्यानुसार बांबूची व्याख्या झाड म्हणून केली गेली होती, आणि त्याच्याशी संलग्न नियम अतिशय कडक होते. कुठेही बांबूची ने आण करणे खूप कठीण झाले होते. अशा परिस्थितीमुळे इथले लोक बांबूशी संबंधित उद्योग - व्यवसायांपासून दूर होत गेले. मित्रहो, 2017 या वर्षात या कायद्यात बदल करून आम्ही बांबूला झाडांच्या श्रेणीमधून वगळले. आता त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. आज संपूर्ण ईशान्य भारतात बांबू क्षेत्र बहरू लगाले आहे. लोक सातत्याने नवोन्मेषाची कास धरून त्याचे मूल्यवर्धनही करत आहेत.
मित्रहो,
त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातले बिजॉय सूत्रधार आणि दक्षिण त्रिपुराचे प्रदीप चक्रवर्ती यांच्याबद्दल बोलू या. त्यांनी नवीन कायद्यांकडे स्वतःसाठीची एक मोठी संधी म्हणून पाहिले. मग त्यांनी आपल्या कामाला तंत्रज्ञानाची जोड दिली. आज ते पूर्वीपेक्षाही कितीतरी जास्त चांगली आणि कितीतरी पटीने जास्त बांबूची उत्पादने तयार करत आहेत.
नागालँडच्या दिमापूर आणि आसपासच्या परिसरात असे अनेक स्वयंसहायता गट आहेत, ज्यांनी बांबूशी संबंधित खाद्य उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन घडवून आणले आहे. तिथे खोरोलो क्रिएटिव्ह क्राफ्ट सारखे गट देखील आहेत, हे गट बांबूचे फर्निचर आणि हस्तकारागिरीबद्दलची कामे करत आहेत.
मित्रहो,
मिझोरामच्या मामित जिल्ह्यात असे गट आहेत, जे बांबूचे उती संवर्धन (टिश्यू कल्चर) आणि पॉली हाऊस व्यवस्थापनावर काम करत आहेत. मला सिक्कीममधील गंगटोक जवळच्या लागास्तल बांबू एंटरप्राइझ टीम बद्दलही माहिती मिळाली आहे. ते बांबूपासून हस्तकारागिरीच्या वस्तू, अगरबत्तीच्या काड्या, फर्निचर आणि गृहसजावटीच्या वस्तू तयार करतात.
मित्रहो,
मी इथे काही मोजकीच उदाहरणे मांडली आहेत. देशातील बांबू क्षेत्राच्या यशाची ही यादी खूप लांबलचक आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करू इच्छितो की, ईशान्येकडची कोणती ना कोणती तरी बांबू उत्पादने नक्की खरेदी करा. तुम्ही त्या भेटवस्तू म्हणूनही देऊ शकता. तुमच्या अशा प्रयत्नांमुळे त्या लोकांचा उत्साह वाढेल, जे बांबूची उत्पादने तयार करण्यासाठी आपला घाम गाळतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
वेगानेने बदलत असलेल्या या काळात तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग बनले आहे. आज आपण आपल्या भूतकाळाला वर्तमानाशी जोडून घेतानाही तंत्रज्ञानाची किमया दिसून येते. या दिशेने अलीकडेच एक अशी घडामोड झाली आहे, ज्यामुळे शिक्षणाशी संबंधित लोक आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांना खूप आनंद झाला आहे. मित्रहो, काही दिवसांपूर्वीच भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने (नॅशनल आर्काईव्ह ऑफ इंडियाने) एका विशेष पोर्टलवरून एक अद्भूत डेटाबेस सामायिक केला आहे. या संस्थेने 20 कोटींपेक्षा जास्त अनमोल दस्तऐवजांचे डिजीटायझेशन करून ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही तर खूपच उत्सुकता चाळवणारे आहेत, - 7 व्या शतकातील गिलगिट हस्तलिखिते भोजपत्रावर लिहिलेली आहेत. इथे तुम्हाला 8 व्या शतकातील एक रंजक ग्रंथ श्री भुवालय देखील पाहायला मिळेल. अंकांवर आधारित असलेला हा ग्रंथ एका ग्रीडच्या स्वरूपात आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्याशी संबंधित काही महत्त्वाची पत्रे देखील तुम्ही इथे पाहू शकता. यातून 1857 मध्ये त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांचा उलगडा होतो, त्यातून त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. जे लोक नेताजी सुभाषचंद्र यांचे मोठे चाहते आहेत, त्यांच्यासाठी इथे नेताजींचे आयुष्य, आझाद हिंद सेना आणि त्यांच्या भाषणांशी संबंधित अनेक दस्तऐवज आहेत. तुम्हाला पंडित मदन मोहन मालवीयजी यांच्याशी संबंधित असंख्य दस्तऐवज देखील मिळतील. यात बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीचयू) स्थापनेची आणि हिंदी साहित्य संमेलनाशी संबंधित महत्त्वाची माहिती आहे. इथे आपल्या संविधान सभेशी संबंधित असंख्य महत्वाचे दस्तऐवज देखील उपलब्ध आहेत. माझे तुम्हा सर्वांना आवाहन आहे की, तुम्ही www.abhilekh-patal.in ला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला आपल्या इतिहासाची एक अद्भुत अनुभूती येईल.
मित्रहो,
जरा कल्पना करा, तुम्ही जगातील सर्वात प्रभावावान लोकांमध्ये आहात, तुमच्यासमोर गणिताचे अत्यंत कठीण प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी वेळ आहे - केवळ साडेचार तास. म्हणजेच वेळ खूप कमी आहे आणि स्पर्धा आंतरराष्ट्रीय आहे, खूप तगडी आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थ होणे खूप स्वाभाविक आहे. पण याच परिस्थितीत आपल्या मुलींनी कमाल करून दाखवली. या महिन्याच्या सुरुवातीला फ्रान्सच्या बोर्दो इथे युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. गणिताची प्रचंड आवड असलेल्या शालेय विद्यार्थिनींसाठी ही एक मोठी स्पर्धा होती. ही जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहे. या ऑलिम्पियाडमध्ये आपल्या मुलींनी आतापर्यंतची सर्वात्कृष्ट कामगिरी नोंदवली. मला या प्रतिभासंपन्न टीमचा खूप अभिमान वाटतो. यात मुंबईची श्रेया मुंधडा, तिरुवनंतपुरमची संजना चाको, चेन्नईची शिवानी भरत कुमार आणि कोलकाताची श्रिमोयी बेरा यांचा समावेश होता. या स्पर्धेत आपली टीम जगात सहाव्या क्रमांकावर पोहचली. श्रेयाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला, संजनाने रौप्य, तर शिवानीने कांस्य पदक आपल्या नावावर केले.
मित्रहो,
या ऑलिम्पियाडसाठी भारताची जी निवड प्रक्रिया आहे, ती मूळातच खूप अवघड स्वरुपाची आहे. यासाठी एक बहु स्तरीय निवड प्रक्रिया आहे. त्यात प्रादेशिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची अवघड आव्हाने पार करावी लागतात. त्यानंतर सर्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी एका महिन्याच्या गणित प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतात. हे शिबीर टाटा मूलभूत संशोधन होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आयोजित केले जाते. या शिबिराच्या अखेरीला पथकाची निवड चाचणी घेतली जाते. त्यातल्या कामगिरीच्या आधारावरच भारताचं पथक निवडलं जातं.
मित्रहो,
दरवर्षी देशभरातील सुमारे 6 लाख विद्यार्थी या मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड प्रोग्राममध्ये भाग घेतात. काळानुसार ही संख्या सातत्याने वाढते आहे, म्हणजेच, देशाच्या मुलींमध्ये ऑलिम्पियाडची ही संस्कृती वेगाने लोकप्रिय होऊ लागली आहे. या हुशार मुलींना पाठबळ देण्यासाठी मी त्यांच्या पालकांचेही कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशात या वेळी एक अतिशय महत्त्वाची मोहीम सुरू आहे, ज्याबद्दलची प्रत्येक भारतीयाला माहित असणे गरजेचं आहे. ही आहे जनगणनेची मोहीम, ही जगातील सर्वात मोठी जनगणना आहे. मित्रहो, जे सहकारी पूर्वी अशा प्रकारच्या प्रक्रियेतून गेले आहेत, या वेळचा जनगणनेचा त्यांचा अनुभव वेगळा असणार आहे. जनगणना 2027 ला डिजिटल बनवले गेले आहे. सर्व माहिती थेट डिजिटल माध्यमातून नोंदवली जात आहे. घरोघरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोबाईल ॲप आहे. ते तुमच्याशी बोलल्यानंतर त्यातच माहितीची नोंद करतील. मित्रहो, या वेळी जनगणनेतील तुमचा सहभागही सुलभ केला गेला आहे, तुम्ही स्वतः देखील आपली माहिती नोंदवू शकता. कर्मचारी येण्याच्या 15 दिवस आधी तुमच्यासाठी ही सुविधा खुली केली जाईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार माहिती भरू शकता. जेव्हा तुम्ही प्रक्रिया पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला एक विशेष ओळख क्रमांक (आयडी) मिळतो. हा ओळख क्रमांक तुमच्या मोबाईल किंवा ई मेलवर येतो. नंतर जेव्हा कर्मचारी तुमच्या घरी येतो, तेव्हा तुम्ही हाच ओळख क्रमांक दाखवून माहितीची खातरजमा करू शकता. यामुळे पुन्हा माहिती देण्याची गरज भासत नाही, वेळही वाचतो आणि प्रक्रियाही सुलभ होते. मित्रहो, ज्या राज्यांमध्ये स्व गणनेचे काम पूर्ण झाले आहे, तिथे गणना कर्मचाऱ्यांद्वारे गृह सूचीकरणाच्या कामाचाही प्रारंभ केला गेला आहे. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 20 लाख कुटुंबांचे गृहसूचीकरण पूर्ण झाले आहे. मित्रहो, देशाची जनगणना हे फक्त सरकारी काम नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. तुमची दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित असते, ही गोपनीय ठेवली जाते, डिजिटल संरक्षणासह ती सुरक्षित केली जाते. चला, आपण सर्वजण मिळून या प्रक्रियेत सहभागी होऊ या आणि जनगणना 2027 यशस्वी करू या.
मित्रहो,
आपल्या देशात खाण्यापिण्याची परंपरा फक्त चवीपुरती मर्यादित राहिलेली नाही. याच परंपरेचा एक रंजक भाग आहे भारताचे चीज. काही दिवसांपूर्वी मी ट्विटच्या माध्यमातून एक माहिती सामायिक केली होती. ब्राझीलमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय चीज स्पर्धेत भारतीय चीजच्या दोन ब्रँड्सना प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. या यशाची समाज माध्यमांवरही मोठी चर्चा झाली. अनेक लोकांनी मला सांगितले की, भारतात चीजच्या बाबतीत जे वैविध्य आहे त्याबद्दलही बोलले पाहिजे.
मित्रहो,
भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्रात खूप मोठा बदल घडून येत आहे. या क्षेत्रातील मूल्यवर्धनाने आपल्या पारंपरिक चवीला एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. आज भारतीय चीज जगभरात आपले स्थान निर्माण करत आहे. नाश्ता असो, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, जगभरातील ताटांपर्यंत भारताची चव पोहोचत आहे. जम्मू काश्मीरच्या कलारी चीजबद्दलच घ्या - याला काश्मीरचे मोझेरेला म्हटले जाते. गुज्जर बकरवाल समुदायाचे लोक पिढ्यानपिढ्या हे बनवत आणि खात आले आहेत. त्याचवेळी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये छुरपी खूप प्रसिद्ध आहे. डोंगराळ भागातील साधेपणा आणि कोमलता याच्या चवीतही जाणवते. या चीजचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे याकच्या दुधापासून बनवले जाते.
मित्रहो,
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये टोपली नु पनीर ज्याला सुरती चीज असेही म्हटले जाते, त्याची सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मी इथे फक्त काहीच नावे घेतली आहेत, पण आपल्या देशातील चवीचे हे जग खूप व्यापक आहे. आज या परंपरेला नवे बळ मिळू लागले आहे. अनेक भारतीय कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान येत आहे, उत्तम पॅकेजिंग केले जात आहे आणि आपली उत्पादने जागतिक मानकांनुसार प्रगती करत आहेत. याचाच परिणाम म्हणजे भारतीय चीज आता देशाच्या सीमा ओलांडून जगातील बाजारपेठा आणि रेस्तराँपर्यंत पोहोचू लागले आहे. आज आपण लोकल टू ग्लोबल बद्दल बोलतो, त्यात भारतीय चीजचे उदाहरण आपल्याला पुढची दिशा दाखवते. मला विश्वास आहे की भारताची चव, भारताची परंपरा आणि भारताची गुणवत्ता जगभरातील लोकांना एक नवा अनुभव देईल आणि भारताशी एक नवे नाते देखील निर्माण करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या महिन्यात देशाच्या अनेक भागांत नववर्षासह अनेक सण उत्सव साजरे केले गेले. काहीच दिवसांनंतर 9 मे रोजी पोच्चीशे बोइशाखच्या निमित्ताने आपण गुरुदेव टागोर यांची जयंती साजरी करणार आहोत. गुरुदेव हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. ते एक महान लेखक आणि विचारवंत तर होतेच, त्यांनी अनेक प्रसिद्ध संस्थांचीही जडणघडण केली. गुरुदेव टागोर हे लोकांसाठी अशा उद्योगांचे समर्थक होते, ज्यांमुळे कायमस्वरुपी रोजगार मिळण्यासोबतच गावांचेही कल्याण होऊ शकेल. त्यांच्या रवींद्र संगीताचा प्रभाव आज आजही जगभरात कायम आहे. माझ्यासाठी शांतीनिकेतनला दिलेल्या भेटी अविस्मरणीय ठरल्या आहेत. ही तीच संस्था आहे, जी त्यांनी पूर्ण समर्पणभावनेने मशागत करून घडवली. त्यांना पुन्हा एकदा माझी विनम्र श्रद्धांजली.
मित्रहो,
मे महिना 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचेही स्मरण करून देतो. मी भारतमातेच्या त्या सर्व वीर सुपुत्रांना नमन करतो, ज्यांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली होती. हा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुट्ट्यांचाही काळ असतो. माझे आवाहन आहे की, त्यांनी आपल्या सुट्ट्यांचा भरपूर आनंद लुटावा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. उन्हाळ्याच्या या हंगामात तुम्ही सगळ्यांनी आपल्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्या. पुढच्या महिन्यात आपली पुन्हा भेट होईल, काही नवीन विषयांसह, देशवासियांच्या काही नव्या यशासह.
खूप खूप धन्यवाद.
नेहा कुलकर्णी/आकाशवाणी मुंबई/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255633)
अभ्यागत कक्ष : 33
Read this releasein:
Gujarati
,
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Kannada
,
Malayalam