कृषी मंत्रालय
रायसेन येथील प्रगत कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांकडून मिळणार मार्गदर्शन: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
Posted On:
05 APR 2026 5:53PM by PIB Mumbai
रायसेन येथे आयोजित 'प्रगत कृषी महोत्सव 2026 - प्रदर्शन आणि प्रशिक्षण' या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना देशातील नामवंत कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच शेती पिकांच्या अवशेषांचे 'कचऱ्यातून संपत्ती'मध्ये रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान आणि तीन दिवसांच्या अखंड प्रशिक्षण कार्यक्रम यांमुळे शेतकऱ्यांचे कृषीकार्य नवी उंची गाठू शकेल.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, रायसेन इथे दसरा मैदानावर आयोजित कऱण्यात आलेल्या या महोत्सवात, तीनही दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य सभागृहासह सभागृह 1, सभागृह 2, सभागृह 3 मध्ये विषयाधारित चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये पीक व्यवस्थापनापासून बाजारपेठा आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतच्या संपूर्ण साखळीचा समावेश असेल.
"वैज्ञानिकांकडून मार्गदर्शन, आधुनिक शेतीची झलक- तीन दिवसांचा ज्ञान महाकुंभ"
पहिल्या दिवशी, 11 एप्रिल रोजी दुपारच्या सत्रांमध्ये पीक कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि कृषी पायाभूत सुविधआ निधी (एआयएफ) चा प्रगत शेतीसाठी वापर, डिजीटल शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाय, मधमाशी पालनाद्वारे शेती उत्पन्नात वाढ करणे आणि शेतीला प्रगतीपथावर नेण्यामध्ये यांत्रिकीकरणाची भूमिका आदी विविध विषयांचा समावेश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, कडधान्यांमध्ये उत्पादन वृद्धी, लागवडीखालील क्षेत्रवृद्धी, नैसर्गिक शेती, फळबागांची अधिक लागवड आणि 'कचऱ्यातून संपत्ती' निर्मिती संकल्पनेअंतर्गत पीक-अवशेष व्यवस्थापन या विषयांवरही सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांपर्यंत व्यवहार्य संदेश पोहोचवण्यासाठी पथनाट्यांचेही सादरीकरण केले जाणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, 12 एप्रिल रोजी सकाळी शेतकरी उत्पादक संस्थांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मृदा आरोग्याद्वारे हरित आणि सुरक्षित शेती, तसेच हवामानपूरक आणि शाश्वत शेतीचा दृष्टिकोन म्हणून संरक्षित शेती यावर सविस्तर चर्चा केली जाईल; याच सत्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जनजागृती कार्यशाळा आणि विशेष पथनाट्ये सादर केली जातील. दुपारच्या आणि संध्याकाळच्या सत्रात एकात्मिक शेती पद्धती, एकात्मिक पोषक तत्वे व्यवस्थापन, फुले व भाज्यांची शास्त्रीय लागवड, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि जैविक कीडनाशकांचा वापर, रोपवाटिका व्यवस्थापन व दर्जेदार लावणी साहित्याची निर्मिती, सूक्ष्म सिंचन आणि खतयुक्त सिंचन , मृदाविहीन शेती,अचूक शेती आणि व्हर्टिकल फार्मिंग यांसारख्या आधुनिक विषयांवर विशेष तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, 13 एप्रिल रोजी सकाळी कृषी विज्ञान केंद्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये भात बियाण्यांमध्ये स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी प्रणाली-आधारित दृष्टिकोन, मत्स्यपालन आणि मोतीची शेती , तसेच कृषी कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. दुपारच्या सत्रात मध्य प्रदेशातील हवामान-आधारित दुग्धव्यवसाय विकास आणि पशुसंवर्धन, भाताची थेट पेरणी, कुक्कुटपालन आणि शेळीपालनाद्वारे उत्पन्नाचे विविधीकरण यावर विशेष सत्रे होतील; तसेच हवामान संतुलित आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी धरती वाचवा या विषयावर आधारित पथनाट्य आयोजित करण्यात आले आहे.
केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांना या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249182)
अभ्यागत कक्ष : 27