पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली
पुद्दुचेरीच्या उत्साही लोकांमध्ये उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आज अनेक विकासकामांचा शुभारंभ होत आहे, ज्यामुळे राहणीमान सुलभ होईल आणि या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल." : पंतप्रधान
मी यापूर्वी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा मी BEST पुद्दुचेरीचा मंत्र दिला होता; BEST म्हणजे बिझनेस, एज्युकेशन, स्पिरीच्युऍलिटी, आणि टूरीझम. गेल्या साडेचार वर्षांत हा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे : पंतप्रधान
पुद्दुचेरीने सुशासन आणि विकासाचा अनुभव घेतला आहे
एक मजबूत आणि सशक्त युवा हा आपल्या वृद्धीचा पाया आहे. त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही काम करत आहोतः पंतप्रधान
एनआयटी कराईकल येथे नवीन डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंजिनीअरिंग ब्लॉक आणि आधुनिक वसतिगृह सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाला बळकटी मिळेल; तसेच पाँडिचेरी विद्यापीठातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे." : पंतप्रधान
आमचा असा विश्वास आहे की आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ, उपलब्ध आणि परवडणारी असावी; आयुष्मान भारत योजना आधीच संपूर्ण भारतातील कोट्यवधी कुटुंबांसाठी हे स्वप्न पूर्ण करत आहे : पंतप्रधान
माझा ठाम विश्वास आहे की पुद्दुचेरी 'मेडिकल टुरिझम'चे (वैद्यकीय पर्यटन) केंद्र बनू शकते. पुद्दुचेरीमध्ये आधीच नऊ वैद्यकीय महाविद्यालये आहेत; 'जिपमेर' (JIPMER) मधील प्रादेशिक कर्करोग केंद्राच्या आधुनिकीकरणामुळे आरोग्य सेवा क्षमतेचा आणखी विस्तार होईल : पंतप्रधान
आज PM-ABHIM अंतर्गत गंभीर आजारी रुग्णांसाठी तीन 'क्रिटिकल केअर ब्लॉक्स'ची पायाभरणी करण्यात आली आहे : पंतप्रधान
Posted On:
01 MAR 2026 2:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुद्दुचेरीमध्ये रु. 2,700 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित असून, यामुळे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत.
यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, "पुद्दुचेरी ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, जिथे महाकवी सुब्रमण्य भारती यांनी राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि श्री अरविंद व माताजींनी जगाला आध्यात्मिक दृष्टी प्रदान केली."
पंतप्रधानांनी ‘बीईएसटी’ पुदुचेरीचा आपला मंत्र पुन्हा अधोरेखित केला, ज्यामध्ये बिझनेस, एज्युकेशन, स्पिरिच्युअॅलिटी आणि टुरीझम अर्थात व्यवसाय, शिक्षण, अध्यात्म आणि पर्यटन यांचा समावेश आहे. “मागील साडेचार वर्षांत या दृष्टीकोनामुळे सुशासन आणि विकासाला चालना मिळाली असून, दरडोई उत्पन्नात वाढ आणि देशातील सर्वोच्च सामाजिक विकास निर्देशांक गुणांकन यावरून हे स्पष्ट होते,” असे मोदी यांनी नमूद केले.
देशभर पायाभूत सुविधांवर दिल्या जाणाऱ्या विशेष भर अधोरेखित करताना पंतप्रधानांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात राखून ठेवलेल्या विक्रमी 12 लाख कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख केला. “यापूर्वी केवळ राज्यांपुरती मर्यादित असलेली राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना आता पुदुचेरीलाही लागू करण्यात आली आहे; यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, रुग्णालये आणि अशा अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी अधिक निधी उपलब्ध होईल,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले, “सशक्त आणि सक्षम युवक हे आपल्या विकासाचे भक्कम अधिष्ठान आहे. त्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की एनआयटी कराईकल येथील नव्याने उद्घाटन करण्यात आलेला डाॅ. एपीजे अब्दूल कलाम अभियात्रिक विभाग आणि आधुनिक वसतिगृह सुविधा, तसेच पाँडिचेरी विद्यापीठातील पायाभूत सुविधा उन्नतीकरणामुळे तांत्रिक शिक्षण अधिक बळकट होईल आणि अनेक विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या हजारो पदांच्या भरतीनंतर शासन सेवेत रुजू झालेल्या युवकांचेही त्यांनी अभिनंदन केले.
मोदी यांनी निरीक्षण नोंदवले की, सध्या जग स्वच्छ आणि हरित गतिशीलतेकडे लक्ष केंद्रित करत आहे आणि इलेक्ट्रिक वाहने दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनत आहेत. पर्यटन केंद्र असलेल्या पुदुचेरीसारख्या ठिकाणी पीएम इ - बस सेवेअंतर्गत आज उपलब्ध करून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णायक ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय, कुटुंबांना स्थैर्य आणि सन्मान देणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांचा तसेच पुडुचेरी, कराईकल, माहे आणि यानम येथे शेकडो कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. या उपक्रमांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी समुद्रजल गोडीकरण प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प आणि मान्सून काळातील पूर व पाणी साचणे कमी करण्यासाठी सुरू असलेली कामे यांचा समावेश आहे. “पुदुचेरीतील नागरिकांना सुलभ जीवनमान प्रदान करणे, हाच आमच्या सर्व प्रयत्नांचा उद्देश आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की कोणत्याही राष्ट्राची प्रगती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्याची मानवी संपत्ती निरोगी असते, त्यामुळे आरोग्यसेवा ही सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ, उपलब्ध आणि परवडणारी असावी, ही सरकारची भूमिका असून आयुषमान भारत योजनेद्वारे कोट्यवधी कुटुंबांसाठी हा संकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुदुचेरीतील कोणत्याही नागरिकाला उपचारांसाठी दूरवर जावे लागू नये, यावर भर देताना त्यांनी सांगितले की, आधीपासूनच नऊ वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या या प्रदेशात वैद्यकीय पर्यटन केंद्र बनण्याची मोठी क्षमता आहे. आरोग्यसेवा सुविधा अधिक बळकट करण्यासाठी 'जिपमेर' (JIPMER) येथील प्रादेशिक कर्करोग केंद्राचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियाना अंतर्गत पुदुच्चेरी आणि कराईकल येथे आपत्कालीन आरोग्यसेवा सुधारण्यासाठी तीन अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार असून त्यांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. याशिवाय, कराईकल येथे उभारले जाणारे एकात्मिक आयुष रुग्णालय सिद्ध वैद्यक परंपरा आणि सर्वांगीण आरोग्यसेवेची ओळख अधिक बळकट करेल. माझा ठाम विश्वास आहे की, पुदुचेरी वैद्यकीय पर्यटन केंद्र बनू शकते, असे मोदी म्हणाले.
दळणवळण सुविधा हा विकासाचा कणा आहे आणि त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. विद्यार्थी, शेतकरी आणि लघुउद्योगांना चांगली रस्ते सुविधा मिळावी यासाठी शेकडो किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्याचवेळी पुदुच्चेरी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी गुंतवला जात असून, त्यात 440 कोटी रुपयांच्या नवीन उड्डाणपुलाचा समावेश आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ईस्ट कोस्ट रोड आणि ग्रँड सदर्न ट्रंक रोडमार्गे चेन्नईशी जोडणी अधिक सुधारली जात असून प्रवासाचा वेळ दोन तासांपेक्षा कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. कन्याकुमारीपर्यंतच्या ईस्ट कोस्ट कॉरिडॉरमध्ये 30,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे पुदुचेरीची बेंगळुरू आणि कोयंबतूरसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांशी दळणवळण वाढून पर्यटन, व्यापार आणि उद्योगांना मोठी चालना मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.
पुदुचेरी हे सप्ताहाच्या अंती भेट देण्याचे एक प्रमुख ठिकाण आहे आणि आधीपासूनच हजारो पर्यटकांना आकर्षित करत आहे याकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी पर्यटन हे पुदुचेरीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे,असे नमूद केले.त्यांनी या यशाचे श्रेय स्थानिक लोकांच्या आतिथ्यशीलतेला दिले आणि या प्रदेशात जाणाऱ्या गाड्या आणि विमाने कायम भरून जात असतात, असेही सांगितले.
"प्रशाद योजनेअंतर्गत विविध मंदिरांमध्ये तीर्थक्षेत्र सुविधांचा विकास करण्यासह, सरकार आध्यात्मिक, पर्यावरणीय आणि आरोग्य पर्यटनातील लक्ष्यित गुंतवणुकीद्वारे येथील पर्यटन क्षेत्राला नवीन उंचीवर घेऊन जात आहे",असे मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले.
श्री अरबिंदो आणि द मदर यांनी ऑरोव्हिलेची संकल्पना चित्तशुध्दतेचे वैश्विक शहर म्हणून केली होती,यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि आज तेथे जागतिक आध्यात्मिक महोत्सव सुरू होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.अशा मेळाव्यांमुळे विविध प्रदेश आणि धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे कार्य होते यावर त्यांनी भर दिला.
पुदुचेरी हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक आहे, अनेक महान नेत्यांचे जन्मस्थान किंवा कार्यस्थळ आहे,याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले.1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या भूमीचा महत्त्वाचा वाटा होता,असे त्यांनी नमूद केले. भविष्यात, 2047 पर्यंत विकसित पुदुचेरी आणि विकसित भारत निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि डबल-इंजिन सरकार या ध्येयासाठी वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
"आम्ही पुदुचेरीला उत्तम भूमी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहू" असे प्रतिपादन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/नितीन गायकवाड/राज दळेकर/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234192)
अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam