पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे उद्घाटन
मायक्रॉनच्या सेमीकंडक्टर सुविधेचे उद्घाटन, हा, भारताच्या तंत्रज्ञान नेतृत्वाच्या दिशेने प्रवासातील एक मैलाचा दगड आहे: पंतप्रधान
सॉफ्टवेअर सामर्थ्यासाठी दीर्घ काळापासून ओळखला जाणारा भारत आता हार्डवेअर क्षेत्रातही आपली ओळख भक्कमपणे प्रस्थापित करत आहे: पंतप्रधान
आज, भारत अतिशय वेगाने जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीचा अविभाज्य भाग बनत आहे: पंतप्रधान
हे शतक एआय क्रांतीचे शतक आहे: पंतप्रधान
तेल हे मागील शतकाचे नियामक होते, तर मायक्रोचिप्स हे या शतकाचे नियामक असणार आहेत : पंतप्रधान
जगभरातील गुंतवणुकदारांसाठी भारताचा एकच संदेश आहे, भारत सज्ज आहे, भारत विश्वसनीय आहे, भारत करून दाखवतो : पंतप्रधान
जगापर्यंत संदेश स्पष्टपणे पोहोचला आहे: भारत सक्षम आहे, भारत स्पर्धात्मक आहे, भारत वचनबद्ध आहे: पंतप्रधान
Posted On:
28 FEB 2026 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन एटीएमपी (असेंब्ली, टेस्ट, मार्किंग आणि पॅकेजिंग) सुविधेचे उद्घाटन केले. व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात हा जागतिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाच्या दिशेने भारताच्या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी एआय शिखर परिषदेनंतर, आज आपण आणखी एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार झालो आहोत. “एआय शिखर परिषदेने जगाला भारताच्या एआय सामर्थ्याची ओळख करून दिली, तर आजचा दिवस तंत्रज्ञान नेतृत्वाप्रति भारताच्या वचनबद्धतेचा आणखी एक दाखला आहे”, असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी नमूद केले की भारत एकेकाळी सॉफ्टवेअर आणि आयटी सेवांसाठी प्रामुख्याने ओळखला जात होता, मात्र आता तो हार्डवेअर क्षेत्रात सुद्धा आपली ओळख वेगाने मजबूत करत आहे. “आज, साणंदमध्ये, आपण एका नवीन भविष्याची पहाट होताना पाहत आहोत. मायक्रोनच्या एटीएमपी सुविधेतील व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात जागतिक तंत्रज्ञान मूल्य साखळीत भारताची भूमिका मजबूत करण्यासाठी सज्ज आहे”, यावर मोदी यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी "नवीन भारताची" विचारसरणी अधोरेखित केली, ज्यामध्ये धोरण ते उत्पादन हे संक्रमण अभूतपूर्व वेगाने होत आहे. पंतप्रधानांनी प्रकल्पाच्या जलद प्रगतीवर भर दिला. जून 2023 मध्ये या सुविधेसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये साणंदमध्ये भूमिपूजन झाले. “फेब्रुवारी 2024 पर्यंत, पायलट सुविधेत मशीन बसवण्यास सुरुवात झाली होती आणि फेब्रुवारी 2026 मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू झाले”, असे मोदी यांनी नमूद केले.
मोदी यांनी सांगितले की भारताने गुंतागुंतीच्या नियामक प्रक्रिया लक्षणीयरीत्या सुलभ केल्या असून प्रगत किंमत करार (एपीए) केवळ काही महिन्यांत मंजूर करण्यात यश मिळवले आहे. विकसित देशांमध्ये हाच प्रक्रियाक्रम पूर्ण होण्यासाठी साधारणतः 3 ते 5 वर्षे लागतात, असे त्यांनी नमूद केले.
“जेव्हा उद्दिष्ट स्पष्ट असते आणि राष्ट्राच्या वेगवान विकासासाठी समर्पण असते, तेव्हा धोरणे पारदर्शक बनतात आणि निर्णय प्रक्रियेला गती मिळते,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी नमूद केले की ही सुविधा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि चिप तंत्रज्ञान क्षेत्रातील, भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत भागीदारीचे द्योतक आहे. जगातील दोन सर्वात मोठी लोकशाही राष्ट्रे, भारत आणि अमेरिका, जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. एआय शिखर परिषदेदरम्यान झालेल्या ‘पॅक्स सिलिका’ कराराचा उल्लेख करत त्यांनी महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीला अधिक विश्वासार्ह बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे स्पष्ट केले.
या शतकाला एआय क्रांतीचे शतक संबोधत पंतप्रधानांनी सेमिकंडक्टरला या परिवर्तनाचा दुवा म्हटले. एक ऐतिहासिक तुलना करताना मोदी म्हणाले की 20व्या शतकात ज्याप्रमाणे तेल हा मुख्य नियामक घटक होता, त्याप्रमाणे 21व्या शतकात मायक्रोचिप हे नियमन करणारे साधन ठरणार आहे. लहानशी चिप ही औद्योगिक क्रांतीपासून एआय क्रांतीपर्यंत जोडणारे माध्यम आहे. “या दृष्टिकोनातून भारताने सेमिकंडक्टर क्षेत्रात आक्रमकपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतला. जग कोविडच्या संकटाशी झुंज देत असताना भारताने सेमिकंडक्टर मिशनची घोषणा केली. साथरोगाच्या काळात सर्व काही विस्कळीत होत असल्याची भावना असताना आपण ठाम विश्वासाने पेरलेली बीजे आज रुजत आहेत आणि फळ देत आहेत,” असे मोदी यांनी अधोरेखित केले.
सेमिकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचे पुन्हा अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की उत्तर प्रदेश, आसाम, ओदिशा आणि पंजाबसह विविध राज्यांमध्ये आणखी 3 प्रकल्प लवकरच उत्पादन सुरू करणार आहेत. “आपण उभारत असलेली ही परिसंस्था एका प्रदेशापुरती मर्यादित नाही; ती संपूर्ण भारतभर विस्तारलेली आहे. ‘विकसित भारता’साठी नवे तंत्रज्ञान केंद्र देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकसित केले जात आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
सेमीकंडक्टर प्रणाली ही केवळ एक कारखाना नसून ती बहुस्तरीय व्यवस्था आहे. यात यंत्र निर्माते, डिझाइन अभियंते, संशोधन संस्था, लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि कुशल तंत्रज्ञांचा समावेश आहे. या सर्व घटकांच्या अखंड समन्वयातून एक चिप तयार केली जाते, असे पंतप्रधानांनी सांगितले. "भारत संपूर्ण मूल्य साखळीवर लक्ष केंद्रित करत आहे. आम्ही याच उद्देशाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0' ची घोषणा केली आहे," असे पंतप्रधान म्हणाले. "उत्पादन वाढेल तसतसे भारतातील साहित्य, घटक आणि सेवांची मागणी देखील वाढेल. ही सर्वात मोठी संधी आहे, " असे वाढीचे प्रमाण अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले.
"भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग पहिल्यांदाच गॅझेट वापरणारे बनत आहे. इलेक्ट्रॉनिक्स असो, ऑटोमोबाईल्स असो किंवा इतर तंत्रज्ञान असो, मागणी सतत वाढत आहे. "मेक इन इंडिया" आता पूर्ण जोमात आहे," असेही पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या 11 वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या उत्पादन आणि निर्यातीत झालेल्या अनेक पट वाढीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, "गुंतवणूकदारांसाठी, देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक संधी दोन्ही उपलब्ध आहेत."
साणंदच्या ऑटोमोबाईल हबमध्ये झालेल्या परिवर्तनाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की मायक्रॉन प्रकल्प नवीन सेमीकंडक्टर प्रणालीचा आधारस्तंभ बनेल. हा प्रकल्प जागतिक डेटा सेंटर, एआय ॲप्लिकेशन्स आणि मोबाईल उपकरणांसाठी डी-रॅम आणि नँड सोल्यूशन्स तयार करेल. जगातील सर्वात मोठ्या एटीएमपी क्लीनरूमपैकी एक या प्रकल्पात असल्याबद्दल तसेच कमीत कमी पाण्याच्या वापराद्वारे पर्यावरणीय शाश्वततेवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिल्याबद्दल पंतप्रधानांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.
गुजरात सरकारच्या धोरणांचे कौतुक करताना पंतप्रधानांनी सांगितले की सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी तयार केलेल्या धोरणांचे आता प्रत्यक्षात परिणाम दिसून येत आहेत. गुजरात तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "मंजुरी, जमीन वाटप आणि उपयुक्तता यासारख्या प्रक्रिया सुलभ केल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. धोलेरा आणि साणंद पश्चिम भारतातील सेमीकंडक्टर क्लस्टर म्हणून विकसित होत आहेत", असे त्यांनी नमूद केले. सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी आवश्यक रसायने, पेट्रोकेमिकल्स यासारख्या इनपुटशी संबंधित उद्योगांसह, कौशल्य केंद्रे आणि प्रशिक्षण उपक्रम एकाच वेळी विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जागतिक गुंतवणूकदारांना एक प्रभावी संदेश देत भाषणाच्या समारोपात सांगितले की, "भारत सज्ज आहे. भारत विश्वासार्ह आहे. भारत मदत करतो." त्यांनी जागतिक भागीदार आणि गुंतवणूकदारांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून अढळ पाठिंबा मिळण्याची खात्री दिली. हे दशक भारताच्या तांत्रिक प्रगतीत एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या भाषणातून जागतिक स्तरावर स्पष्ट आणि ठाम संदेश प्रतिध्वनित झाला: "भारत सक्षम आहे. भारत स्पर्धात्मक आहे. भारत वचनबद्ध आहे.”
* * *
माधुरी पांगे/सुषमा काणे/गजेंद्र देवडा/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234054)
अभ्यागत कक्ष : 9