श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) 75 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला प्रारंभ
आरोग्य हे आमचे ध्येय आहे आणि सेवा ही आमची परंपरा : केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया
आरोग्य सुरक्षेचे जागतिक उदाहरण म्हणून ईएसआयसी उदयास यावे : डॉ. मांडविया
Posted On:
24 FEB 2026 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2026
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आपल्या सेवेला 75 वर्ष झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचा प्रारंभ केला. ईएसआयसीमुळे देशभरातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सात दशकांहून अधिक काळ समर्पित सेवा मिळाली. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या कार्यक्रमात मुख्य भाषण केले.

कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. मनसुख मांडविया यांनी संस्थेच्या प्रवासाचे विकास, सुधारणा आणि राष्ट्रसेवेचे एक उल्लेखनीय उदाहरण असे वर्णन केले. त्यांनी नमूद केले की ‘ईएसआयसी’ ने 1952 मध्ये सुमारे 1.2 लाख लाभार्थी आणि एकल दवाखाना यासह आपला प्रवास सुरू केला होता आणि आज 166 रुग्णालये, 17 वैद्यकीय महाविद्यालये आणि जवळपास 1,600 दवाखान्यांचे विशाल जाळे तयार केले असून, त्याव्दारे 15 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना सेवा दिली जात आहे.
यश मिळविण्यासाठी वचनबद्धता आणि दृढनिश्चयाचे महत्त्व अधोरेखित करताना, डॉ. मांडविया यांनी भर दिला की ‘ईएसआयसी’ ने सुधारणा आणि कामगिरी करून दाखवण्याचा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि सेवा वितरणात आणखी सुधारणा करण्यासाठी संस्थेच्या 75 व्या वर्षात सामूहिक "संकल्प" केले पाहिजेत. सर्व रुग्णालयांमध्ये औषधे, उपकरणे आणि डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची गरज यावर भर देऊन, त्यांनी अंतर्गत सुविधा मजबूत करून आणि कर्मचारी योग्य प्रकारे परिश्रम करून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत याची खात्री करून –‘रेफरल्स’ म्हणजे बाहेरच्या इतर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्याचे काम कमी करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारतात, "स्वास्थ्य ही सेवा है, और सेवा ही हमारा संस्कार है" ("आरोग्य हे आमचे सेवा-ध्येय आहे आणि सेवा ही आमची परंपरा आहे") यावर भर दिला आणि सर्व वैद्यकीय व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना शिस्त राखण्याचे आणि आपल्या देशातील लोकांच्या विश्वासाचा आदर करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की ईएसआयसी ची मानके ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) सारख्या प्रमुख संस्थांना अनुरूप असायला हवीत.

केंद्रीय मंत्र्यांनी 40 वर्षांवरील सर्व कामगारांसाठी अनिवार्य आरोग्य तपासणीसाठी कामगार संहितेतील तरतुदीवर प्रकाश टाकला आणि नमूद केले की, यामुळे कामगार कल्याण मजबूत होण्यास आणि संरक्षित कार्यबल निर्माण होण्यास हातभार लागेल. आपल्या भाषणाचा समारोप करताना, डॉ. मांडविया यांनी सर्व भागधारकांना ‘ईएसआयसी’ ला आरोग्य सुरक्षेचे जागतिक उदाहरण बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले, सामूहिक प्रयत्न, समर्पण आणि ‘टीमवर्क’द्वारे "नवीन भारत" उभारला जात आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
सचिव (कामगार आणि रोजगार), वंदना गुरनानी यांनी आपल्या भाषणात, अधोरेखित केले की विमाधारक व्यक्ती (आयपी) वर उपचार करताना, ईएसआयसी केवळ रोगांवर उपचार करत नाही तर गरीबी रोखत आहे, कुटुंबांतील कमावत्या व्यक्तीचे रक्षण करत आहे आणि त्याद्वारे राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान दिले जात आहे.

संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबली वर्षाच्या सन्मानार्थ, ईएसआयसी@75 चिन्हांकित एक स्मारक नाणे औपचारिकपणे जारी करण्यात आले, तसेच ईएसआयसी@75 कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. आरोग्य सेवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना जवळ आणण्यासाठी आरोग्य रथ उपक्रम देखील सुरू करण्यात आला.
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबरोबर ईएसआय योजनेचे एकत्रीकरण करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश समन्वित आरोग्यसेवा मजबूत करणे आहे.
कार्यक्रमादरम्यान एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात दोन पॅनेल चर्चांचा समावेश होता

दरवर्षी 24 फेब्रुवारी, ईएसआयसी स्थापना दिनी साजरा केला जातो. ईएसआयसीने व्यापक वैद्यकीय सेवा, रोख लाभ, पेन्शन आणि आजारपण, मातृत्व, अपंगत्व, रोजगाराच्यावेळी झालेली दुखापत आणि बेरोजगारी दरम्यान मदत देऊन भारताच्या सामाजिक संरक्षणाच्या परिदृश्यात लक्षणीय बदल घडवून आणला आहे. विकसित भारतासाठी निरोगी, सुरक्षित आणि सक्षम कार्यबलाच्या दृष्टिकोनातून संस्थेने योगदान दिले आहे.

* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232781)
अभ्यागत कक्ष : 15