पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील सेवा तीर्थ तसेच कर्तव्य भवन-1 आणि 2 यांच्या उद्घाटन सोहळ्याचे क्षणचित्रे सामायिक केली
Posted On:
14 FEB 2026 7:46AM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथे आज सेवा तीर्थ तसेच कर्तव्य भवन-1 आणि 2 यांच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी आज नवा इतिहास घडताना सर्वजण पाहत असल्याचे सांगितले.
सेवा तीर्थ आणि नव्या इमारतींनिमित्त पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामाशी संबंधित सर्व अभियंते आणि कामगारांचेही त्यांनी आभार मानले.
‘एक्स’ या सामाजिक माध्यमांवरील संदेशांचा एका मालिकेत पंतप्रधान म्हणाले की,
भारताच्या जनतेची सेवा करण्याच्या अढळ निर्धाराने आणि ‘नागरिकदेवो भव’ या पवित्र भावनेने प्रेरित होऊन, सेवा तीर्थ राष्ट्राला विनम्रपणे समर्पित करण्यात येत आहे. सेवा तीर्थ हे नेहमी कर्तव्य, करुणा आणि ‘इंडिया फर्स्ट’ या तत्त्वाशी असलेल्या बांधिलकीचे तेजस्वी प्रतीक राहो. ते पुढील पिढ्यांना निःस्वार्थ सेवाभाव आणि सर्वांच्या कल्याणासाठी अखंड समर्पणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहो.
आज सेवा तीर्थ येथे गरीब, वंचित, कष्टकरी शेतकरी, युवा शक्ती आणि नारी शक्ती यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे आहेत:
पीएम राहत योजनेच्या प्रारंभास मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंत रोखरहित उपचाराची सुविधा मिळेल. यामुळे बाधित व्यक्तींना तातडीची वैद्यकीय मदत मिळणे सुनिश्चित होईल.
लखपती दीदी योजनेचे लक्ष्य दुप्पट करून 6 कोटी करण्यात आले. यामुळे महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला चालना मिळेल.
कृषी पायाभूत सुविधा निधीचे लक्ष्य 1 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल आणि त्यांच्या उत्पन्नवाढीस मदत मिळेल.
10,000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ला मंजुरी देण्यात आली. यामुळे प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स आणि डीप-टेक संशोधनाला प्रोत्साहन मिळेल.
देशवासीयांच्या सेवेसाठी अढळ संकल्प आणि ‘नागरिक देवो भव’ या पवित्र भावनेने प्रेरित होऊन, आज ‘सेवा तीर्थ’ राष्ट्राला समर्पित करण्याचे सौभाग्य लाभले.
‘सेवा तीर्थ’ हे कर्तव्य, करुणा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचे सशक्त प्रतीक आहे.
ते पुढील पिढ्यांना निःस्वार्थ सेवा आणि सर्वांच्या कल्याणासाठी समर्पित होऊन पुढे जाण्याची प्रेरणा देत राहो, अशी माझी कामना आहे.
दिल्ली येथे आज ‘सेवा तीर्थ’ आणि कर्तव्य भवनच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सेवा तीर्थ स्मारक टपाल तिकीट आणि नाणे जारी करताना मला अभिमान वाटतो.
आज ज्या पवित्र भावनेने ‘सेवा तीर्थ’ आणि कर्तव्य भवन राष्ट्राला समर्पित केले आहेत, ते 140 कोटी देशवासीयांच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम आधार ठरतील.
गेल्या 11 वर्षांपासून आपण गुलामगिरीच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या अभियानात कार्यरत आहोत. आपला मंत्र आहे—स्वतंत्र भारताची स्वतंत्र ओळख, गुलामगिरीच्या चिन्हांपासून मुक्तता.
‘सेवा तीर्थ’ या नावातच एक मोठा संदेश आहे. देशवासीयांच्या सेवेसाठी असलेल्या संकल्पाला सिद्धीपर्यंत नेणारे हे एक पवित्र स्थळ आहे.
कर्तव्य हे या सजीव राष्ट्राचे प्राणवायू आहे. ते कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नांना साकार करण्याच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देत आहे.
‘नागरिक देवो भव’ हीच आपली कार्यसंस्कृती आहे. ‘सेवा तीर्थ’ येथे घेतला जाणारा प्रत्येक निर्णय 140 कोटी देशवासीयांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी असणार आहे.
***
हर्षल आकुडे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2227967)
अभ्यागत कक्ष : 8