रेल्वे मंत्रालय
'मेक इन इंडिया'मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधील ओव्हरहेड विद्युतीकरण खांबांच्या उभारणीचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे : अश्विनी वैष्णव
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सातत्याने प्रगतीपथावर असून संपूर्ण मार्गावर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन मास्ट्स बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही प्रगती भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रणालीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत जमिनीवरील सातत्यपूर्ण अंमलबजावणीचे ते प्रतीक आहे. यामुळे जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाचा अवलंब करताना देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकटी मिळत आहे.
सुरक्षित, सुरळीत आणि कार्यक्षम अतिजलद ट्रेनच्या परिचालनाला आधार देण्यासाठी, व्हायाडक्टच्या भागांसह मार्गाच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये ओएचई खांब बसवण्याचे काम सुरू आहे. हे मास्ट्स या कॉरिडॉरवर धावणाऱ्या बुलेट ट्रेनना विश्वसनीय वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्शन पायाभूत सुविधेचा महत्त्वाचा भाग आहेत.
ओएचई खांब जमिनीच्या पातळीपासून लक्षणीय उंचीवर असलेल्या उन्नत व्हायाडक्ट्सवर बसवले जात आहेत. एकूणच या मार्गावर 9.5 ते 14.5 मीटर उंचीचे 20,000 पेक्षा जास्त खांब बसवले जातील. हे खांब बुलेट ट्रेनच्या परिचालनासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड तारा, अर्थिंग व्यवस्था, फिटिंग्ज आणि इतर उपकरणांसह संपूर्ण 2×25 केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन पॉवर सिस्टीमला आधार देतील.
अखंड कर्षण वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल मार्गावर ट्रॅक्शन सबस्टेशन्स (टीएसएस) आणि डिस्ट्रिब्युशन सबस्टेशन्स (डीएसएस) चे जाळे विकसित केले जात आहे.
ओएचई खांब म्हणजे रेल्वे रुळांच्या बाजूला उभारलेल्या उभ्या पोलादी संरचना असतात, जे ओव्हरहेड विद्युत तारांना आधार देतात. ते तारांची योग्य उंची, संरेखन आणि ताण कायम राखतात, ज्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांना सतत आणि सुरक्षित वीजपुरवठा करणे शक्य होते.
एकदा पूर्ण झाल्यावर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करेल, तसेच संपूर्ण मार्गावरील संचारसंपर्कात सुधारणा सुधारेल. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती आणि उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळाल्याने प्रवासी, स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगाला फायदा होण्याची अपेक्षा आहे. देशात प्रगत रेल्वे तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या आणि जागतिक दर्जाची रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216310)
आगंतुक पटल : 30