गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आसाममधील गुवाहाटी येथे ज्योती-विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे केले उद्घाटन
Posted On:
29 DEC 2025 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे ज्योती-विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन केले. त्यांनी नव्याने बांधलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे, ‘कमांड अँड कंट्रोल’ केंद्राचे आणि तीन नवीन फौजदारी कायद्यांवरील राज्यस्तरीय प्रदर्शनाचेही उद्घाटन केले.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यावेळी म्हणाले की, आसाम एका खूप मोठ्या दुःस्वप्नासारख्या काळातून बाहेर आला आहे. एका दशकापूर्वी आसाममध्ये बॉम्बस्फोट, गोळीबार, हिंसक गटांची आंदोलने होत होती. गृहमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आसाम विकासाच्या मार्गावर पुढे गेला आहे आणि आता देशाच्या इतर भागाच्या बरोबरीने प्रगती करत आहे. ते पुढे म्हणाले की, घुसखोरांनी आसाममधे जमिनीवर अतिक्रमण केले होते, परंतु गेल्या 10 वर्षांत—विशेषतः डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या कार्यकाळातील गेल्या पाच वर्षांत—1 लाख 29 हजार बिघा जमीन अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आली आहे.
यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, जी मंडळी आसामची कला, इथले साहित्य आणि संस्कृतीबद्दल बोलतात, त्यांनीच 1983 मध्ये घुसखोरांना येथे स्थायिक करण्यासाठी कायदा आणला होता. घुसखोरांच्या आगमनानंतर आसामची कला, संस्कृती, संगीत आणि भाषा टिकू शकत नाही. त्यांनी पुढे सांगितले की, मतपेटीच्या राजकारणासाठी विरोधकांनी आसामच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, मोदी सरकारने राज्यातील सर्व हिंसक गटांशी करार करून आसाममध्ये शांतता प्रस्थापित केली आहे. ते म्हणाले की, या करारांमुळे 10,000 हून अधिक तरुणांनी शस्त्रे खाली ठेवली आणि ते मुख्य प्रवाहात परत आले आणि आता आसाम विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. ते म्हणाले की, आज आसाममध्ये लाखो-कोट्यवधी रुपयांचे उद्योग उभारण्यात येत आहेत, पायाभूत सुविधांचा विकास होत आहे, काझीरंगा हे देशातील सर्वात महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे . लचित बोरफुकन यांच्या भव्य पुतळ्याच्या माध्यमातून त्यांचा वारसा तरुणांच्या हृदयात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दीर्घ कालावधीनंतर आसाम आंदोलनातील हुतात्म्यांसाठी एक योग्य स्मारकही उभारण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांना एक प्रकारे न्याय दिला गेला आहे.
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2209620)
अभ्यागत कक्ष : 34