उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी महिला केंद्रित विकास आणि तळागाळात लोकशाही रुजवण्याचे एक आदर्श प्रारूप म्हणून लखपती दीदी उपक्रमाची केली प्रशंसा
Posted On:
05 NOV 2025 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज छत्तीसगढ मध्ये लखपती दीदी संमेलनाला उपस्थित राहिले .
लखपती दीदी उपक्रमातून भारतातली महिला शक्ती आणि त्यांच्या दृढनिश्चयाचे प्रतिबिंब दिसते असे या कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले.
या उपक्रमातून आव्हानांचे रूपांतर संधीत करण्याचा महिला अर्थात दीदींचा निर्धार दिसून येतो, लखपती दीदी हा शब्द केवळ उत्पन्नाशी निगडित नाही तर स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
कठोर परिश्रम, शिस्त आणि दृढ ऐक्यानं कशाप्रकारे जीवनात परिवर्तन घडू शकते हे देशभरातील महिलांच्या नेतृत्त्वाखालील हजारो स्वयंसहायता बचत गट दाखवून देत आहेत, असे ते म्हणाले. या महिलांच्या कामगिरीतून ग्रामीण भारताचा कणा असलेल्या भारताच्या भगिनींमधील परिवर्तनाच्या शक्तीचे दर्शन घडते, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन कोटी लखपती दीदी तयार करण्याचे स्वप्न हे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने एक असाधारण पाऊल आहे - ही चळवळ छत्तीसगडमध्ये स्पष्टपणे दिसून येते, असे सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ते म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी देशातील आणि विशेषतः छत्तीसगढ मधील महिलांच्या वाढत्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. लखपती दीदी उपक्रम ही एक चैतन्यदायी चळवळ असून त्यामुळे देशभरातील दोन कोटी महिला आणि छत्तीसगढ मधील पाच लाख महिलांना स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून आणि उत्पन्न देणाऱ्या उपक्रमांमधून आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.
सी.पी. राधाकृष्णन यांनी महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून राजनांदगावच्या अद्वितीय स्थानावर प्रकाश टाकला, याठिकाणी 1000 हून अधिक महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंच, सरपंच, जनपद आणि जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम करतात, असे ते म्हणाले. लोकशाहीची व्याप्ती केवळ संसदेपुरती मर्यादित नसून ज्या ठिकाणी नागरिक संवाद साधतात, निर्णय घेतात आणि एकत्र विकसित होतात अशा ग्राम सभा, पंचायत आणि स्वयंसहायता गटांपर्यंत व्यापली आहे, असे ते म्हणाले . सहभाग, पारदर्शकता आणि स्थानिक सक्षमीकरण सुनिश्चित करुन लखपती दीदी चळवळ लोकशाहीची मुळे अधिक घट्ट करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महिलांनी स्वतःला घरातच मर्यादित ठेवावे ही धारणा अशा उपक्रमांमुळे बदलली आहे. आज त्या प्रशासक म्हणून उदयास येत आहेत, आर्थिक स्वातंत्र्य मिळवत आहेत आणि भविष्यातील नेत्यांना प्रेरणा देत आहेत, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या सहायाने सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करुन धाडस आणि दृढनिश्चय दर्शवणाऱ्या सर्व लखपती दीदींचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि त्या लवकरच करोडपती दीदी होतील असा विश्वास व्यक्त केला.
या प्रदेशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले आणि या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्य सरकार आणि सुरक्षा दल यांच्या संयुक्त दृष्टीकोनाला जाते, असे ते म्हणाले.
संपत्ती निर्माण करणे हे त्याचे वितरण करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ही दोन्ही उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ज्यामुळे नक्षलवादासारख्या आव्हानांमध्ये घट झाली आहे.
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186724)
Visitor Counter : 14