राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या


देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी एक मजबूत एमएसएमई परिसंस्था केवळ महत्वाचीच नाही तर आवश्यक देखील आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

Posted On: 27 JUN 2025 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2025

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (27 जून 2025) नवी दिल्ली येथे एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे  देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ आहेत. ते जीडीपीमध्ये महत्वाचे योगदान देतात आणि तळागाळातील नवोन्मेषाला प्रोत्साहन देतात. देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी एक मजबूत एमएसएमई परिसंस्था केवळ महत्वाचीच नाही तर आवश्यक देखील आहे. हे उद्योग तुलनेने कमी भांडवलात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे उद्योग ग्रामीण आणि मागास भागात रोजगार निर्माण करतात. अशा प्रकारे, एमएसएमई क्षेत्र दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि विकासाचे विकेंद्रीकरण करून सर्वसमावेशक विकासाला हातभार लावते.

राष्ट्रपती म्हणाल्या की, देशाच्या प्रगतीत एमएसएमई क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे यात शंका नाही. तथापि, या क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे वित्तसमस्या, मोठ्या कंपन्यांकडून स्पर्धा, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, कच्चा माल आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता, मर्यादित बाजारपेठ आणि विलंबित पेमेंट.

राष्ट्रपती म्हणाल्या की, एमएसएमईचे महत्त्व आणि त्यांच्या समस्या ओळखून भारत सरकारने अनेक धोरणात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये एमएसएमईसाठी वर्गीकरणाच्या निकषांमध्ये सुधारणा, कर्जाच्या उपलब्धतेत वाढ, केंद्रीय मंत्रालयांचे प्रोत्साहन, विभाग आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी त्यांच्या वार्षिक खरेदीच्या गरजेच्या किमान 35 टक्के सूक्ष्म आणि लघु उद्योगांकडून खरेदी करणे, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांचा कौशल्य विकास, यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. या प्रयत्नांमुळे नोंदणीकृत एमएसएमईच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विलंबित पेमेंटच्या प्रकरणांमध्ये एमएसएमईसाठी ऑनलाइन वाद निवारण पोर्टल महत्त्वाचे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, एमएसएमईच्या शाश्वततेसाठी नवोन्मेष खूप महत्त्वाचा आहे. एमएसएमई द्वारे तळागाळातील नवोन्मेषाला प्रोत्साहन दिले स्थानिक स्त्रोतांमधून स्थानिक समस्यांवर परवडणारे उपाय उपलब्ध होऊ शकतील.

अलीकडच्या वर्षांत एमएसएमई क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी या क्षेत्रात अधिकाधिक महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. युवतींनी उद्योग उभारून स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, एमएसएमई भारताच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान देत आहेत, परंतु उर्जेचा वापर आणि उत्सर्जनाच्या मोठ्या वाट्यासाठी देखील ते जबाबदार आहेत. एमएसएमई क्षेत्रात हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ एमएसएमईची शाश्वतता आणि स्पर्धात्मकता वाढणार नाही तर देशाची हवामान बदलावरील  उद्दिष्टे साध्य करायला देखील मदत होईल.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140261)