गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात नागपूर स्थित राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात येणाऱ्या 'स्वस्ति  निवास'चे  केले भूमिपूजन


केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते   राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) च्या नागपूर कॅम्पसच्या कायमस्वरूपी संकुलाचे  भूमिपूजन तसेच त्याच्या अस्थायी  कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

गेल्या 11  वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या आरोग्यसेवेच्या परिदृश्यात सकारात्मक परिवर्तन झाले आहे.

समाजातील कोणीही दुःखी राहू नये या दृष्टिकोनासह सेवाभावाच्या  पायावर ही कर्करोग संस्था उभारण्यात आली  आहे; येत्या काळात देशातील सर्वोत्तम कर्करोग संस्थांमध्ये तिची गणना होईल

ही संस्था महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा येथील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या उपचारांसाठी अतिशय  फायदेशीर ठरेल.

आबाजी थत्ते यांनी पूज्य गुरुजी आणि पूज्य बाळासाहेब देवरस यांच्यासह आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या पुनर्बांधणीसाठी समर्पित केले.

पंतप्रधान मोदी यांच्या उपक्रमांतर्गत  5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य उपचारांच्या तरतुदीमुळे लाखो गरीब लोकांमध्ये रोगांविरुद्ध  लढण्याचे धाडस आले  आहे.

पंतप्रधान

Posted On: 26 MAY 2025 5:59PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्रात नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात येणाऱ्या ‘स्वस्ति  निवास’चे भूमिपूजन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे भूमिपूजन  आणि अस्थायी  कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे  उद्घाटन केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आगामी काळात या कर्करोग संस्थेचे नाव देशातील सर्वोत्तम कर्करोग संस्थांमध्ये घेतले  जाईल. ते म्हणाले कीसेवेच्या भावनेवर त्याचा पाया उभारलेला आहे, त्यामागे समर्पित लोक आहेत आणि समाजातील कोणीही दुःखी राहू नये या दृष्टिकोनातून ते चालवले जात आहे. अशा संस्थाच फुलतात, विस्तारतात आणि समाजाची  दीर्घकाळ सेवा करतात असे ते म्हणाले .

अमित शहा म्हणाले की, जेव्हा एखाद्या उदात्त संकल्पाला देवाचा आणि समाजाचा आशीर्वाद लाभतो तेव्हा ते बीज वटवृक्ष बनून आपल्यासमोर उभे राहते. आज  ही कर्करोग संस्था पूर्णपणे विकसित होऊन हजारो लोकांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अविरत काम करत आहे. ते म्हणाले की, पाश्चात्य देशांमध्ये रुग्णालयांची संकल्पना वेगळी आहे आणि आपल्या समाजाची रचना, कुटुंब व्यवस्था आणि नातेवाईकांप्रति ओढ असलेली संस्कृती वेगळी आहे. परदेशात, जेव्हा कोणी आजारी पडतो तेव्हा रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते, परंतु आपल्याकडे जेव्हा कोणी आजारी पडतो तेव्हा संपूर्ण कुटुंब त्याच्याशी मनाने  जोडले जाते.

अमित शाह म्हणाले की, स्वस्तिनिवास' च्या दृष्टीकोनातून या कर्करोग संस्थेच्या पथकाने भारतातील रुग्णालय बांधणीच्या क्षेत्रात एक नवीन कल्पना सादर केली आहे, जी येणाऱ्या काळात आपल्या कुटुंबांच्या संवेदनशीलतेला जागृत ठेवेल. ते म्हणाले की, येथे जो कोणी रुग्ण म्हणून येतो, त्याचे नातेवाईक त्याला भेटू शकतील आणि कमीत कमी खर्चात येथे रात्री राहू शकतील. शाह पुढे म्हणाले की, आबाजी थत्ते यांनी पूज्य गुरुजी आणि पूज्य बाळासाहेब देवरस यांच्यासह आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या पुनर्बांधणीसाठी समर्पित केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, भारतात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. ते म्हणाले की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे भारतात दर 8 मिनिटांनी एक मृत्यू होतो. काही वर्षांपूर्वी कर्करोग हा असाध्य आजार मानला जात असे, परंतु गेल्या 15 वर्षांत देशभरात अनेक चांगल्या कर्करोग संस्था स्थापन झाल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कर्करोगावरील उपचार सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शाह म्हणाले की, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांच्या गरीब भागांमध्ये असलेली ही सेवा संस्था प्रामुख्याने मध्यम, निम्न-मध्यम आणि आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील रुग्णांना सेवा देते. गृहमंत्र्यांनी सांगितले की, या संस्थेची पायाभरणी 28 फेब्रुवारी 2015 रोजी झाली होती, 2023 मध्ये तिचे उद्घाटन झाले होते आणि आज स्वस्ति निवास'कडून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अमित शाह म्हणाले की, गेल्या 11 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या आरोग्यसेवेत सकारात्मक परिवर्तन झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील लाखो गरीब लोकांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य उपचार मोफत केले आहेत. राज्याने दिलेली रक्कम यात जोडली तर एका गरीब व्यक्तीला सुमारे 25 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी काहीही खर्च करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. यामुळे देशातील लाखो गरीब लोकांच्या जीवनात आजाराशी लढण्याचे धाडस निर्माण झाले आहे आणि त्यांना बरे होऊन पुन्हा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची आशा मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी केवळ 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचारच दिले नाहीत तर परवडणाऱ्या औषध दुकानांची साखळीही स्थापन केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, 2014 मध्ये देशात7 एम्स होती आणि आता 23 ला मान्यता देण्यात आली आहे. 387 वैद्यकीय महाविद्यालये होती, ती आता 780 पर्यंत वाढली आहेत. एमबीबीएसच्या जागा 51,000 होत्या आणि आज दरवर्षी 1.18 लाख एमबीबीएस डॉक्टर पदवीधर होतात, तर पदव्युत्तर (पीजी) जागा 31,000 वरून 74,000 पर्यंत वाढल्या आहेत. त्यांनी सांगितले की, मागील सरकारच्या काळात 2013-14 मध्ये आरोग्य अर्थसंकल्प 37,000 कोटी रुपये होता, जो पंतप्रधान मोदींनी 2025-26 साठी 1.35 लाख कोटी रुपये केला आहे. ते पुढे म्हणाले की, परवडणाऱ्या औषधांवर वार्षिक 10,000 कोटी रुपये खर्च करून पंतप्रधान मोदींनी देशाच्या आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणले आहे. समाज आणि सेवेच्या बळावर चालणाऱ्या अशा संस्था आपल्या देशाच्या आरोग्य क्षेत्राचा कणा आहेत, असे ते म्हणाले.

***

S.Tupe/S.Kane/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2131475)