राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पहलगाम भागात दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांच्या हत्येचा केला निषेध

Posted On: 25 APR 2025 12:56PM by PIB Mumbai

 

“22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पहलगाम भागात दहशतवाद्यांनी 28 जणांची त्यांच्या धर्माची ओळख पटवल्यानंतर हत्या केल्याच्या बातमीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) सुन्न झाला आहे.

काश्मीर खोऱ्यात सुट्टीसाठी आलेल्या निःशस्त्र आणि निष्कलंक निष्पाप नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आयोग निषेध करतो. या घटनेने प्रत्येक विचारवंत माणसाच्या विवेकाला हादरवून टाकले आहे, कारण बळी गेलेले निष्पाप लोक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन ही एक गंभीर समस्या आहे.

दहशतवाद हा जगातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक असल्याचा उल्लेख विविध व्यासपीठांवर वारंवार केला गेला आहे. दहशतवादाला मदत करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि या धोक्यासाठी त्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.

अन्यथा, यामुळे लोकशाहीचा प्रभाव कमी होणे, धमकावणे, सूड घेणे असे प्रकार घडणे, समुदायांमध्ये सुसंवादांची कमतरता  आणि जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि उपजीविकेचा अधिकार यासह विविध मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होऊ शकते.

केंद्र सरकार या हल्ल्यातील दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलेल  आणि पीडितांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करेल अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2124255) Visitor Counter : 28