गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील नीमच येथे आयोजित सीआरपीएफ दिन संचलन -2025 ला केले संबोधित


देशाच्या सुरक्षेसाठी हुतात्मा झालेल्या 2,264 सीआरपीएफ जवानांचे स्मरण करून त्यांना राष्ट्राच्यावतीने केंद्रीय गृहमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्यात सीआरपीएफ सर्वात मोठी भूमिका बजावेल- अमित शाह

Posted On: 17 APR 2025 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2025

 

मध्य प्रदेशमधल्या नीमच येथे आयोजित सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) दिन संचलन कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले.  

केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशाच्या सुरक्षेसाठी 2,264 सीआरपीएफ जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण केले आणि कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने त्यांना आदरांजली वाहिली. वर्ष 2047 भारत  प्रत्येक क्षेत्रात जगात अग्रेसर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात शहीद सीआरपीएफ जवानांच्या बलिदानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे शाह म्हणाले. 

वर्ष 2019 मध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर, सर्व सुरक्षा दलांचा स्थापना दिन देशाच्या वेगवेगळ्या भागात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, आज नीमचमध्ये सीआरपीएफचे  हे  वार्षिक संचलन आयोजित केले जात आहे, असे शाह यांनी सांगितले. देशाच्या सुरक्षेत सीआरपीएफचे योगदान मोठे आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणे असो, ईशान्येकडील शांतता राखणे असो किंवा क्रूर नक्षलवाद्यांच्या कारवाया नेस्तनाबूत करत करत त्यांची संख्या केवळ चार जिल्ह्यांवर आणणे असो, या सर्व बाबतीत आपल्या सीआरपीएफ जवानांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे कौतुक शाह यांनी केले. स्वातंत्र्याच्या 76- वर्षांच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा सीआरपीएफने देशाच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे रक्षण केले आहे, असे ते म्हणाले.

 

पशुपतीनाथपासून तिरुपतीपर्यंत लाल दहशत पसरवण्याचे स्वप्न पाहणारे नक्षलवादी आज 4 जिल्ह्यांपुरते सीमित  राहिले आहेत, यात सर्वात मोठे योगदान सीआरपीएफचे असल्याचे त्यांनी सांगितले. सीआरपीएफची सर्वात मोठी भूमिका आणि योगदान देशाला नक्षलवादमुक्त करण्यात असेल, असे ते म्हणाले. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनला येताना पाहून भयंकर नक्षलवादी थरथर कापतात.  कोब्रा बटालियनच्या नेतृत्वाखाली इतर सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद संपवण्यात मोठे योगदान दिले आहे, असे त्यांनी नमूद केले. देशातून 31 मार्च 2026 पर्यंत  नक्षलवाद कायमचा समाप्त होईल आणि हे लक्ष्य  सीआरपीएफच्या बळावर निश्चित करण्यात आले आहे, असे शाह यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने सर्व सीएपीएफच्या(केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या) कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे शाह यांनी सांगितले.  देशातील 7 दुर्गम भागात हवाई कुरिअर सेवा सुरू करण्यात आली आहे आणि अलीकडेच भारत सरकारने वेतन आणि भत्त्यांमध्ये निरंतर सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा देखील केली आहे, असे त्यांनी  सांगितले.  42 लाखांहून अधिक आयुष्मान सीएपीएफ कार्ड देण्यात आली असून त्या  अंतर्गत आता  सीएपीएफ कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हजारो रुग्णालये उपलब्ध असल्याचे शाह म्हणाले. 

 

* * *

G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122509)