पंतप्रधान कार्यालय
आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पंतप्रधान हरियाणाला भेट देणार
पंतप्रधान हिसार ते अयोध्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवणार आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करणार
पंतप्रधान दीनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पाच्या 800 मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज एककाची आणि यमुनानगर येथील एका कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्राची करणार पायाभरणी
भारतमाला परियोजनेअंतर्गत रेवाडी बायपास प्रकल्पाचे पंतप्रधान करणार उद्घाटन
Posted On:
12 APR 2025 4:48PM by PIB Mumbai
आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला भेट देणार आहेत. ते हिसारला जातील आणि सकाळी 10:15 वाजता हिसार ते अयोध्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवतील तसेच हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.
त्यानंतर, दुपारी 12:30 वाजता, ते यमुनानगर येथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील तसेच याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील.
विमान प्रवास सर्वांसाठी सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान हिसारमधील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. त्यात एक अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, एक कार्गो टर्मिनल आणि एक एटीसी इमारत आहे. हिसार ते अयोध्या या पहिल्या विमान उड्डाणालाही ते हिरवा झेंडा दाखवतील. हिसार ते अयोध्या (आठवड्यातून दोनदा) नियोजित उड्डाणे, जम्मू, अहमदाबाद, जयपूर आणि चंदीगडसाठी आठवड्यातून तीन उड्डाणे, हा विकास हरियाणाच्या विमान वाहतूक कनेक्टिव्हिटीमध्ये एक महत्त्वपूर्ण झेप ठरणार आहे.
या प्रदेशातील वीज निर्मिती संबंधी पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पंतप्रधान यमुनानगर येथे दीनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पाच्या 800 मेगावॅट क्षमतेच्या आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची पायाभरणी करतील. 233 एकर परिसरातील सुमारे 8,470 कोटी रुपये खर्चाचे हे एकक हरियाणाच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेला लक्षणीयरीत्या चालना देईल आणि संपूर्ण राज्यात अखंड वीज पुरवठा करेल.
गोबरधन म्हणजेच गॅल्वनाइजिंग ऑरगॅनिक बायो-अॅग्रो रिसोर्सेस धनचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान यमुनानगरमधील मुकरबपूर येथे एका कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्राची पायाभरणी करतील. या संयंत्राची वार्षिक उत्पादन क्षमता 2,600 मेट्रिक टन असेल आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याबरोबरच सेंद्रिय कचऱ्याच्या प्रभावी व्यवस्थापनातही ते मदत करेल.
भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे 1,070 कोटी रुपये खर्चाच्या 14.4 किमी रेवाडी बायपास प्रकल्पाचे उद्घाटन देखील पंतप्रधान करतील. यामुळे रेवाडी शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, दिल्ली-नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे एक तासाने कमी होईल आणि या प्रदेशातील आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना चालना मिळेल.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121298)
Visitor Counter : 42
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam