उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत एक जागतिक पर्यटन स्थळ असून, प्रत्येक ऋतूमध्ये पर्यटनासाठी उत्तम काळ असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे गौरवोद्गार


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पर्यटनाचे सर्वात मोठे राजदूत आहेत : उपराष्ट्रपती

भारताच्या डिजिटायझेशन प्रारूपाप्रमाणे पर्यटनाला एक प्रारूप बनवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

जागतिक पर्यटन दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले संबोधित

Posted On: 27 SEP 2024 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

"भारत हे आता एक आवडते जागतिक पर्यटन स्थळ बनले असून अध्यात्म, भव्यता  आणि 5,000 वर्षांचा  नागरी सभ्यतेचा वारसा लाभलेल्या या भूमीत, पर्यटक सर्व ऋतूंचा अनुभव वर्षभर घेऊ शकतात." असे  उपराष्ट्रपती  जगदीप धनखड  यांनी आज सांगितले.  भारताने गेल्या दशकभरात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीला अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की आर्थिक वृद्धीच्या इंजिनाच्या स्वरूपात पर्यटन या क्षेत्रात भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याची अद्भुत क्षमता आहे.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी जागतिक शांतता, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक आदानप्रदान यातील पर्यटनाची महत्त्वपूर्ण  भूमिका विशद केली आणि पर्यटन मानवतेचे बंध जोडते जी आजच्या काळाची नितांत गरज आहे, असे सांगितले.

पर्यटन क्षेत्राने भारताच्या डिजिटायझेशन प्रक्रियेच्या यशोगाथेला अनुसरून पुढे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले. "जर आपण जागतिक मानकांनुसार कार्य केले, जर आपण आपल्या पर्यटनविषयक संसाधनांचा विनियोग योग्य आणि पूर्ण क्षमतेने केला तर आपण तीन समस्या सोडवू शकतो ज्या संपूर्ण जगासमोर आपल्या डिजिटायझेशन मॉडेलप्रमाणेच एका प्रारूपाचे उदाहरण देतील, असे ते म्हणाले. पर्यटनामुळे परिणाम घडू शकतील अशा तीन क्षेत्रांना त्यांनी अधोरेखित केले : अर्थव्यवस्थेला भरीव योगदान, मनुष्यबळाचा कौशल्यविकास आणि रोजगार निर्मिती.. प्रत्येक पर्यटक एक स्वप्न घेऊन येत असतो. त्याला एक सुखद अनुभव हवा असतो आणि म्हणूनच आपण आपल्या मनुष्यबळाला त्याची पूर्तता करण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताने गेल्या दशकभरात केलेल्या परिवर्तनकारी प्रवासाचा उल्लेख करून  उपराष्ट्रपतींनी भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा कशाप्रकारे उंचावली ते विशद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून उपराष्ट्रपतींनी त्यांचा पर्यटनाचे महान राजदूत म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या पंतप्रधानांनी लक्षद्वीप मध्ये केवळ काही तास व्यतीत केले आणि संपूर्ण जगाला त्याबद्दल माहिती कळली, असे सांगत पर्यटन, पायाभूत सुविधा आणि अंतराळ तंत्रज्ञानातील भारताच्या यशाचे प्रतिध्वनी जागतिक पटलावर उमटत आहेत, असे ते म्हणाले.

वर्ष 2047 मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी पूर्ण होण्याआधी भारताचे पर्यटन क्षेत्र, धोरणात्मक पुढाकार आणि कुशल संसाधने यांच्या जोरावर राष्ट्राला विकसित देश बनण्याच्या ध्येयाकडे नेईल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला.

 

 

* * *

S.Kakade/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2059648) Visitor Counter : 43