पंतप्रधान कार्यालय

मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 30 AUG 2024 2:27PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर श्री शक्तिकांत दास जी, नियामक मंडळ सदस्य ख्रिस गोपालकृष्णनजी, वित्त उद्योगातील नेते, फिनटेक आणि स्टार्ट-अप जगतातील माझे सहकारी, इतर सर्व मान्यवर, भगिनी आणि सज्जनहो!

सध्याचा काळ हा भारतातील सणांचा ऋतू आहे, आपण सर्वांनी नुकतीच जन्माष्टमी साजरी केली आहे.  आणि आनंदाची बाब म्हणजे, आपल्या अर्थव्यवस्थेत आणि आपल्या बाजारपेठेतही उत्सवाचे वातावरण  आहे.या उत्सवी वातावरणात हा जागतिक फिनटेक महोत्सव साजरा होत आहे;आणि तोही स्वप्ननगरी मुंबई शहरात!मी देशभरातून तसेच जगभरातून येथे आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो.इथे येण्यापूर्वी मी विविध प्रदर्शनांना भेट दिली होती आणि माझ्या अनेक मित्रांशी विचारांचे आदानप्रदान-चर्चा केल्या आहेत.नवकल्पना आणि आपल्या तरुणांच्या डोळ्यांसमोरील योजनांचे आणि भविष्यातील शक्यतांचे संपूर्ण नवीन जग मला तेथे दिसून येते. चला,मला तुमच्या कार्यासाठी नवीन शब्द वापरु द्या,मला नव्या जगाचे अवलोकन झाले. या महोत्सवाच्या सर्व आयोजकांचे मी अभिनंदन करतो.

 

मित्रांनो

या ठिकाणी परदेशातूनही मोठ्या संख्येने आपले अतिथी आले आहेत.एक काळ असा होता, जेव्हा लोक भारतात यायचे, तेव्हा आपली सांस्कृतिक विविधता पाहून थक्क व्हायचे.आता जेव्हा लोक भारतात येतात तेव्हा आमची फिनटेक विविधता पाहून ते आश्चर्यचकित होतात. विमानतळावर उतरल्यापासून ते रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि खरेदीच्या अनुभवापर्यंत, भारतात झालेली फिनटेक क्रांती सर्वत्र नजरेत भरते. गेल्या 10 वर्षांत फिनटेक स्पेसमध्ये $31 बिलियन अमेरीकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे.गेल्या10 वर्षांत आमच्या फिनटेक स्टार्टअपमध्ये 500% वाढ झाली आहे.  स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि शून्य  शिल्लक असलेल्या जनधन बँक खात्यांनी भारतात चमत्कार केला आहे. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी काही लोक संसदेत उभे राहून हा प्रश्न विचारायचे आणि जे लोक स्वत:ला विद्वान समजायचे ते हा प्रश्न विचारायचे, जणू काही सरस्वती बुध्दी वाटत होती होती, तेव्हा ते आधीच वाटेवर उभे होते.(आपणच केवळ सर्वज्ञानी आहोत या अभिमानातच ते गर्क असत)आणखी काय म्हणत, तर भारतात बँकांच्या भरपूर शाखा नाहीत, प्रत्येक गावात बँक उपलब्ध नाही.  इंटरनेट नाही, इतकेच नव्हे तर; वीज नाही,तर  रिचार्जिंग - कसे होईल हे पण विचारत. फिनटेक क्रांती  होईलच कशी? असे विचारत आले आणि माझ्यासारख्या सामान्य चहा विक्रेत्याला हे विचारत असत. पण आज अवघ्या एका दशकात भारतातील ब्रॉडबँड वापरकर्ते 60 दशलक्ष म्हणजे 6 कोटींवरून 940 दशलक्ष म्हणजे सुमारे 94 कोटी झाले आहेत.आज, 18 वर्षांवरील क्वचितच कोणी भारतीय असा असेल ज्याची डिजिटल ओळख, आधार कार्ड नाही.  आज 530 दशलक्ष म्हणजेच 53 कोटींहून अधिक लोकांकडे जन धन बँक खाती आहेत. याचा अर्थ, 10 वर्षांत,आम्ही जवळपास संपूर्ण युरोपियन युनियन इतक्या लोकसंख्येला बँकिंग प्रणालीशी जोडली आहे.

 

मित्रांनो

जन धन-आधार-मोबाइल या त्रिसूत्रीने आणखी एका परिवर्तनाला चालना दिली आहे.पूर्वी लोक म्हणायचे की कॅश इज किंग.आज जगातील रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार भारतात होतात.  भारताचा UPI हे जगभरातील फिनटेकचे उत्तम उदाहरण बनले आहे.आज गाव असो वा शहर, हिवाळा असो वा उन्हाळा, पाऊस असो वा बर्फ, भारतात बँकिंग सेवा 24 तास, 7 दिवस, 12 महिने सुरू असते.कोरोनाच्या एवढ्या मोठ्या संकटाच्या काळातही भारत जगातील अशा देशांपैकी एक होता जिथे आपली बँकिंग सेवा कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहिली.

 

मित्रांनो

अवघ्या 2-3 दिवसांपूर्वीच जन धन योजनेला 10 वर्षे पूर्ण झाली.जन धन योजना हे महिला सक्षमीकरणाचे प्रमुख माध्यम बनले आहे.जन धन योजनेमुळे सुमारे 290 दशलक्ष म्हणजेच 29 कोटींहून अधिक महिलांची बँक खाती उघडण्यात आली आहेत.या खात्यांमुळे महिलांसाठी बचत आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.जन धन खात्याच्या याच तत्वावर आम्ही मुद्रा ही सर्वात मोठी मायक्रोफायनान्स योजना सुरू केली.या योजनेंतर्गत आतापर्यंत 27 ट्रिलियन रुपयांहून अधिक किमतीचे कर्ज देण्यात आले आहे, 27 ट्रिलियन!  या योजनेच्या सुमारे 70 टक्के लाभार्थी, महिला आहेत.जनधन खात्यांनी महिला बचत गटांना बँकिंगशी जोडले आज देशातील 10 कोटी ग्रामीण महिलांना त्याचा लाभ मिळत आहे.  म्हणजेच जनधन कार्यक्रमाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा भक्कम पाया रचला आहे.

 

मित्रांनो

समांतर अर्थव्यवस्था हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. फिनटेकने समांतर अर्थव्यवस्थेलाही धक्का दिला आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण अभिनंदनास पात्र आहात.डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही भारतात पारदर्शकता कशी आणली गेली,हेही तुम्ही पाहिले आहे.आज शेकडो सरकारी योजनांचे थेट लाभ हस्तांतरण केले जाते.  यामुळे यंत्रणेतील गळती थांबली आहे.आज लोकांना औपचारिक व्यवस्थेत सामील होण्यामुळे होणारे स्वतःचे लाभ दिसत आहेत.

 

मित्रांनो

फिनटेकमुळे भारतात आलेले परिवर्तन केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही. त्याचा सामाजिक व्यवस्थेवर होणारा प्रभाव खूप व्यापक आहे. त्यामुळे गाव आणि शहर यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होत आहे. पूर्वी आपल्या इथे  बँकेची फक्त सेवा मिळण्यासाठी अख्खा दिवस लागत असे.  शेतकरी, मच्छीमार आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही मोठी समस्या होती.  फिनटेकने ही समस्या सोडवली.  बँका फक्त एका इमारतीपुरत्या मर्यादित होत्या. आज बँका प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमधे उतरल्या आहेत.

 

मित्रांनो

फिनटेकने वित्तीय सेवा लोकव्याप्त करण्यातही मोठी भूमिका बजावली आहे.कर्ज, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक, विमा यासारखी उत्पादने प्रत्येकासाठी सहज उपलब्ध होत आहेत.फिनटेकने ऍक्सेस टू क्रेडिट  देखील सोपे आणि सर्वसमावेशक केले आहे. मी एक उदाहरण देतो.  तुम्हाला माहिती आहे की भारतात रस्त्यावरच्या विक्रेत्यांची जुनी परंपरा आहे. पण तो आजतागायत औपचारिक बँकिंगच्या परीघाबाहेर होता.फिनटेकने ही परिस्थिती बदलली आहे.आज ते पीएम स्वनिधी योजनेतून संपार्श्विक मुक्त कर्ज घेण्यास सक्षम आहेत, डिजिटल व्यवहाराच्या नोंदींच्या आधारे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक कर्ज मिळत आहे.

कधीकाळी शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स सारख्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक केवळ मोठ्या शहरांमध्येच शक्य होती. आज  खेड्यांमध्येही आणि लहान शहरांमध्येही गुंतवणुकीच्या या संधीला मोठ्या प्रमाणात शोधले जात आहे. आज काही मिनिटांतच घरबसल्या डीमॅट खाते उघडली जातात आणि गुंतवणुकीचे अहवाल सुद्धा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज, मोठ्या संख्येने भारतीय दूरस्थ आरोग्य सेवा घेत आहेत, डिजिटल पद्धतीने अभ्यास करत आहेत, ऑनलाइन, कौशल्ये शिकत आहेत, हे सर्व फिनटेकशिवाय शक्य झाले नसते. म्हणजेच भारताची फिनटेक क्रांती देखील जीवनमान, जीवनाचा दर्जा सुधारण्यात मोठी भूमिका बजावत आहे.

 

मित्रांनो,

भारताच्या फिनटेक क्रांतीची उपलब्धी केवळ नवकल्पनांसाठीच नाही तर ती अंगिकारण्यासाठीही आहे. भारतीय जनतेने ज्या गतीने आणि प्रमाणात फिनटेकला स्वीकारले आहे, त्याचे उदाहरण इतरत्र कुठेही सापडणार नाही. याचे श्रेय आपल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना आणि आपल्या फिनटेक्सलाही जाते. देशात या तंत्रज्ञानावर विश्वास निर्माण करण्यासाठी अद्वितीय नवकल्पना करण्यात आल्या आहेत. क्यूआर कोड्ससह साउंड बॉक्सचा वापर, अशीच एक नवकल्पना आहे. आपल्या फिनटेक क्षेत्राने सरकारच्या बँक सखी कार्यक्रमाचाही अभ्यास करावा. मी सर्व फिनटेकसंबंधित तरुणांना सांगू इच्छितो, ही बँक सखी काय आहे ? मी एका दिवशी जळगावला गेलो होतो, तेव्हा काही बहीण सखींसोबत भेटलो होतो. त्या अभिमानाने म्हणाल्या की, मी एका दिवसात दीड कोटी रुपयांचा व्यवहार करते.  कसला आत्मविश्वास. त्यात ती महिला गावातील होती. आमच्या मुलींनी गावागावात बँकिंग आणि डिजिटल जागरूकता पसरवून फिनटेकसाठी एक नवीन बाजारपेठ निर्माण केली आहे.

 

मित्रांनो,

21व्या शतकातील जग खूप जलदगतीने बदलत आहे.  चलन ते क्यूआर कोड या प्रवासाला अनेक शतके लागली, परंतु आता आपण दररोज नवनवीन नवकल्पना पाहत आहोत. डिजिटल ओन्ली बँकिंग आणि निओ-बँकिंग सारख्या संकल्पना आपल्यासमोर आहेत. डिजिटल ट्विन्स सारखी तंत्रज्ञान डेटा-आधारित बँकिंगला पुढच्या स्तरावर नेत आहे. यामुळे जोखीम व्यवस्थापन, फसवणूक शोधणे आणि ग्राहक अनुभव यामध्ये बदल होणार आहेत. मला आनंद आहे की भारत देखील सतत नवीन फिनटेक उत्पादने लाँच करत आहे. आम्ही अशा उत्पादनांचे विकास करत आहोत, जे स्थानिक आहेत, परंतु त्यांचा वापर जागतिक आहे. आज ओएनडीसी म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, ऑनलाइन शॉपिंगला समावेशक बनवत आहे. हे छोटे व्यवसाय, छोटे उद्योग मोठ्या संधींशी जोडत आहेत.आता व्यापाऱ्यांना एकत्र आणणाऱ्या कंपन्या  काम सोपे करण्यासाठी डेटा वापरत आहेत. ट्रेड्स प्लॅटफॉर्मच्या मदतीने छोट्या संस्थांच्या तरलता आणि रोख प्रवाह सुधारत आहेत. ई-रूपी हा एक असा डिजिटल व्हाउचर बनला आहे, जो विविध प्रकारे वापरला जात आहे. भारतातील हे उत्पादनं इतर देशांसाठीही तेवढेच उपयुक्त आहेत. आणि याच विचारसरणीने आम्ही जी-20 अध्यक्षपदाच्या दरम्यान जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे भांडार तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता, जो जी-20 सदस्यांनी खुले दिलाने स्वीकारला होता. मला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराशी संबंधित तुमच्या चिंताही समजतात. म्हणूनच, भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापरासाठी जागतिक फ्रेमवर्क तयार करण्याचे आवाहन केले आहे.

 

मित्रांनो,

फिनटेक क्षेत्राच्या मदतीसाठी सरकार धोरणात्मक स्तरावर प्रत्येक आवश्यक बदल करत आहे. अलीकडेच आम्ही  एंजल  टॅक्स काढून टाकला आहे. ठीक केलं ना? आपण ते योग्य केले ना ? आम्ही देशात संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे. आम्ही डेटा संरक्षण कायदा तयार केला आहे.  आमच्या नियामकांकडूनही मला काही अपेक्षा आहेत. सायबर फसवणूक थांबवण्यासाठी आणि डिजिटल साक्षरतेसाठी आपल्याला मोठी पावले उचलावी लागतील. सायबर फसवणूक स्टार्टअप्सच्या, फिनटेक्सच्या वाढीला अडथळा ठरू नये, याकडे लक्ष देणेही तितकेच आवश्यक आहे.

 

मित्रांनो,

पूर्वीच्या काळी बँक कोलमडणार आहे किंवा बँक अयशस्वी झाली आहे किंवा बुडणार आहे, अशी बातमी पसरायला  परिणाम होईपर्यंत 5-7 दिवस लागायचे. आज जर एखाद्या व्यवस्थेत समजलं की सायबर फसवणूक झाली आहे, तर एका मिनिटातच ती कंपनी संपून जाते. फिनटेकसाठी हे खूप आवश्यक आहे. आणि सायबर सोल्युशनची बालमृत्यू लवकरच होऊन जाते. यावर कोणतीही सायबर उपाययोजना शोधली तर दुष्ट लोक त्यातून फसवणुकीच्या संधी लगेच शोधतात, त्यामुळे त्या उपाययोजनेचा  बालमृत्यू होते, नंतर तुम्हाला नवीन उपाययोजना आणावी लागते.

 

मित्रांनो,

आज शाश्वत आर्थिक वाढ ही भारताची प्राथमिकता आहे. आम्ही मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रणाली तयार करत आहोत. आम्ही वित्तीय बाजारपेठांना प्रगत तंत्रज्ञानाच्या नियामक चौकटीद्वारे मजबूत करत आहोत. आम्ही ग्रीन फायनान्सद्वारे शाश्वत वाढीस पाठिंबा देत आहोत. आम्ही वित्तीय समावेशाच्या संतृप्तीवर भर देत आहोत. मला विश्वास आहे की भारताचे फिनटेक इकोसिस्टम, भारतातील लोकांना दर्जेदार जीवनशैली देण्याच्या मोहिमेमध्ये खूप मोठी भूमिका बजावेल. मला विश्वास आहे की भारताचे फिनटेक इकोसिस्टम, संपूर्ण जगातील जीवन सुलभतेत वाढ करेल. आणि माझ्या देशातील तरुणांच्या कौशल्यांवर मला इतका विश्वास आहे, इतका विश्वास आहे की त्यामुळे  मी म्हणतो, मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो - आपलं सर्वोत्तम अजून यायचं आहे.

हे तुमचं 5वं समारंभ आहे ना…तर 10व्या समारंभात मी येईन. त्यावेळी तुम्हालाही कल्पना नसेल, की तुम्ही कुठे पोहोचला आहात.

 

मित्रांनो,

आज मी तुमच्या काही स्टार्ट-अप्सच्या युनिट्सना भेटलो, सर्वांना भेटू शकलो नाही, पण काही लोकांना भेटलो. प्रत्येकाला 10-10 गृहपाठ देऊन आलो आहे, कारण मला समजलं आहे की हे क्षेत्र एक मोठा बदल आणणार आहे. मित्रांनो, एक मोठी क्रांती होत आहे आणि त्याची मजबूत पायाभरणी येथे आपण पाहत आहोत. याच विश्वासाने, आपणा सर्वांना माझ्या अनेक शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद!

कृष्णगोपालजींच्या सांगण्यावरून आम्ही छायाचित्र  काढले, पण तुम्हाला वाटेल याचा काय अर्थ आहे, मी फायदा सांगतो - मी एआयच्या जगाशी संबंधित माणूस आहे,त्यामुळे तुम्ही नमो ॲपवर गेलात, तर नमो ॲपच्या छायाचित्र विभागात जा. तिथे तुम्हाला तुमचा सेल्फी दिसेल आणि आज तुम्ही माझ्यासोबत कुठे दिसला असाल तर तुम्हाला तुमचे ते छायाचित्र मिळेल.

धन्यवाद!

***

M.Chopade/S.Patgoankar/G.Deoda/P.Kor

O

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050396) Visitor Counter : 10