कृषी मंत्रालय
प्रा.रमेश चंद यांनी नवी दिल्ली येथे 02 ते 07 ऑगस्ट 2024 दरम्यान होणाऱ्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना केले संबोधित
परिषदेत 75 देशांचे 740 सदस्य सहभागी होणार असून, यामध्ये 45% महिलांचा सहभाग राहणार असल्याची प्रा.रमेश चंद यांची माहिती
परिषदेत शाश्वत विकासाच्या कार्यक्रमांवर भर दिला जाणार: प्रा.रमेश चंद
Posted On:
30 JUL 2024 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2024
नीती (NITI) आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांनी आज पुसा इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथे 02 ते 07 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणाऱ्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेची उद्घाटन पूर्व पत्रकार परिषद आयोजित केली होती.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रा.रमेश चंद म्हणाले की, कृषी अर्थशास्त्रज्ञ संघटना खूप जुनी आहे. भारतात पहिली शिखर परिषद 1958 मध्ये झाली होती आणि आता 66 वर्षांनंतर पुन्हा होत आहे. 1958 मध्ये जेव्हा ही परिषद झाली, तेव्हा देश गरिबी, भूक अशा अनेक समस्यांशी सामना करत होता. यंदाच्या परिषदेला आलेल्या प्रतिनिधींना आता नव्या भारताचे दर्शन घडेल. देश आता विकसित भारताबद्दल बोलत आहे. या परिषदेत शाश्वत विकास वाढवण्याच्या कार्यक्रमावर भर दिला जाईल. ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन’, ही या परिषदेची संकल्पना आहे.

या परिषदेत अन्नधान्य प्रणालीवर भर दिला जाईल असे प्रा. रमेश चंद म्हणाले. ही आंतरराष्ट्रीय परिषद 02 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे उद्घाटन करतील. या परिषदेसाठी 925 जणांनी नोंदणी केली असून 60 ते 65 विद्यार्थ्यांनाही या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. एकूण 1,000 लोक परिषदेला उपस्थित राहतील. 75 देशांमधील जगातील आघाडीची विद्यापीठे, कृषी संस्था, एजीओ मधील 740 सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत.

प्राध्यापक रमेश चंद म्हणाले की, या परिषदेसाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.तरुण संशोधकांना जगातील विविध देशांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, तसेच ते या संपर्कांचा वापर व्यावसायिक लाभांसाठी करू शकतील. शेतीशी निगडीत समस्या खूप जटील झाल्या असून, त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. काही उपाय सापडतील. अन्नप्रणाली विकसित करून आरोग्याच्या दिशेने कसे जाता येईल यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ते म्हणाले की सहभागींमध्ये 45 टक्के महिलांचा समावेश असेल. या परिषदेत नामवंत कृषी अर्थतज्ज्ञांची व्याख्याने, चर्चा, प्रदर्शने यासारखी सत्रे आयोजित केली जातील.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2039347)