पंतप्रधान कार्यालय

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रसार माध्यम निवेदन.

Posted On: 22 JUN 2024 2:15PM by PIB Mumbai

 

माननीय पंतप्रधान शेख हसीना,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसार माध्यमातील मित्रहो,

नमस्कार!

मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करत आहे. तसे पाहिले तर, गेल्या सुमारे एका वर्षाच्या काळात आम्ही दहा वेळा भेटलो आहोत. पण आजची भेट विशेष आहे. कारण आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान शेख हसीना जी आपल्या  पहिल्या अतिथी आहेत.

मित्रांनो,

बांगलादेश आमच्या शेजारी राष्ट्र प्रथमधोरण, ॲक्ट  ईस्ट धोरण दृष्टिकोन सागर आणि हिंद - प्रशांत दृष्टिकोनाच्या संगमावर आहे. गेल्या एकाच वर्षाच्या कालावधीत आम्ही एकमेकांच्या सोबतीने, लोक कल्याणाचे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम पूर्ण केले आहेत. अखौडा - अगरतळा दरम्यान भारत बांगलादेशाची सहावी सीमापार रेल्वे लिंक सुरू झाली आहे. खुलना - मोंगला बंदराद्वारे भारताच्या ईशान्येकडील राज्यांसाठी कार्गो सुविधा सुरू करण्यात आली आहे. मोंगला बंदर प्रथमच रेल्वेने जोडले गेले आहे. 1320 मेगा वॅट मैत्री थर्मल पावर प्लांट च्या दोन युनिटनी वीज निर्मिती सुरू केली आहे. दोन्ही देशांदरम्यान भारतीय चलन रुपयांमध्ये व्यापाराची सुरुवात झाली आहे. भारत-बांगलादेश दरम्यान गंगा नदीवर जगातील सर्वात लांब नदी क्रूज सेवा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. भारत-बांगलादेश दरम्यान पहिली सीमापार मैत्री पाईपलाईन पूर्ण करण्यात आली आहे. भारतीय ग्रीडच्या माध्यमातून, नेपाळमधून  बांगलादेशापर्यंत वीज निर्यात, हे ऊर्जा क्षेत्रात उप प्रादेशिक सहयोगाचे पहिले उदाहरण बनले आहे. केवळ एका वर्षाच्या कालावधीत, इतक्या विविध क्षेत्रांमध्ये, इतके मोठे उपक्रम प्रत्यक्षात साकार करणे, आपल्या संबंधांची गती आणि प्रमाण दर्शवतात.

मित्रांनो,

आज आम्ही नव्या क्षेत्रात सहयोग करण्यासाठी भविष्याचा दृष्टिकोन तयार केला आहे. हरित भागीदारी, डिजिटल भागीदारीनील अर्थव्यवस्था, अंतराळ अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहयोगाबाबत झालेल्या सहमतीचा लाभ दोन्ही देशांच्या युवकांना मिळेल. भारत - बांगलादेश मैत्री उपग्रहआपल्या संबंधांना नवी उंची देईल.आम्ही आपले लक्ष पुढील बाबींवर केंद्रित केले आहे - संपर्क सुविधा, वाणिज्य आणि सहयोग. गेल्या दहा वर्षात आम्ही 1965 च्या पूर्वीची कनेक्टीव्हिटी पुनर्संचयित केली आहे. आता आम्ही आणखी अधिक डिजिटल आणि ऊर्जा संपर्क सुविधेवर भर देऊ. यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आपल्या आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी दोन्ही पक्ष सीपा बाबत चर्चा करण्यासाठी सहमत झाले आहेत. बांगलादेशातील सिराजगंजमध्ये एका अंतर्देशीय कंटेनर डेपो च्या निर्मितीसाठी भारत मदत करणार आहे.

मित्रांनो,

54 सामायिक नद्या भारत आणि बांगलादेशाला एकमेकांशी जोडतात. पूर व्यवस्थापन,याबाबत  सावधानतेचा इशारा , पिण्याच्या पाण्यासंदर्भातले उपक्रम यात आम्ही सहयोग करत आलो आहोत. आम्ही 1996 च्या गंगानदी पाणी कराराच्या नूतनीकरणासाठी तांत्रिक स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशात तिस्ता नदीचे संरक्षण आणि व्यवस्थापन याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच  तंत्रज्ञांचा एक गट बांगलादेशाचा दौरा करणार आहे.

मित्रांनो,

संरक्षण सहयोग आणखीन मजबूत करण्यासाठी, संरक्षण क्षेत्रातील उत्पादनापासून ते सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर आमची तपशीलवार चर्चा झाली आहे. आम्ही दहशतवादाला आळा, कट्टरतावाद आणि सीमेचे शांततापूर्वक व्यवस्थापन याबाबत आपला सहभाग मजबूत करण्याचा निश्चय केला आहे. हिंद महासागर क्षेत्राबाबत आम्ही समान दृष्टिकोन बाळगून आहोत. हिंद प्रशांत महासागर उपक्रमात सहभागी होण्याबाबत बांगलादेशाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही बिमस्टिक सहित अन्य क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर देखील यापुढे आपला सहयोग अखंड ठेवू.

मित्रांनो,

आपली सामायिक संस्कृती आणि उभय देशातल्या नागरिकांचे परस्पर संबंध हाच आपल्या संबंधांचा पाया आहे. आम्ही शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीला आणखी चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी बांगलादेशातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी भारत ई-वैद्यकीय व्हिजा सुविधा सुरू करणार आहे. बांगलादेशाच्या वायव्य भागातील लोकांच्या सुविधेसाठी आम्ही रंगपुरमध्ये एक नवा सहाय्यक उच्च दूतावास उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी क्रिकेटच्या विश्वचषकातील होणाऱ्या सामन्यासाठी मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

बांगलादेश भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे आणि बांगलादेशाबरोबरच्या  आपल्या संबंधांना आम्ही अत्याधिक प्राधान्य देतो. मी वंगबंधूंच्या स्थिर, समृद्ध आणि प्रगतिशील बांगलादेशाच्या दृष्टिकोनाला साकार करण्यात भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे. 2026 मध्ये बांगलादेश विकसनशील राष्ट्र बनणार आहे. सोनार बांगलाला नेतृत्व प्रदान करण्यासाठी मी पंतप्रधान शेख हसीना जी यांचे अभिनंदन करतो. मला पूर्ण विश्वास आहे की, आपण एकमेकांच्या सोबतीने विकसित भारत 2047’ आणि स्मार्ट बांगलादेश 2041’ हे संकल्प साकार  करु.

खूप खूप धन्यवाद !

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027911) Visitor Counter : 45