राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हिमाचल प्रदेशातील केंद्रीय विद्यापीठाच्या 7 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती

Posted On: 06 MAY 2024 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मे 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (6 मे, 2024) धर्मशाला येथे हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाच्या 7 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले.

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितले. पण, पूर्वी बदलाची गती इतकी वेगवान नव्हती. आज आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग सारखी नवीन क्षेत्रे वेगाने उदयास येत आहेत.  बदलाचा वेग आणि परिमाण दोन्ही खूप जास्त आहेत, त्यामुळे तंत्रज्ञान आणि आवश्यक कौशल्ये खूप लवकर बदलत आहेत, असे  त्या म्हणाल्या. त्यामुळे सतत नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण असे असले पाहिजे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच ते स्वावलंबी बनतील आणि त्यांचे चरित्र्य आणि व्यक्तिमत्वही घडेल, असे राष्ट्रपतीने शिक्षकांना उद्देशून बोलताना सांगितले.  विद्यार्थ्यांमध्ये त्यांची संस्कृती, परंपरा याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा देखील शिक्षणाचा उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या. या संदर्भात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.  त्यांचे कार्यक्षेत्र केवळ शिकवण्यापुरते मर्यादित नसून राष्ट्राचे भवितव्य घडविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.

आपले लक्ष 'काय शिकायचे' यासोबतच 'कसे शिकायचे' यावर देखील असले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. जेव्हा विद्यार्थी कोणत्याही तणावाशिवाय स्वतंत्रपणे शिकतात तेव्हा त्यांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती उंच भरारी घेते हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

करुणा, कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता या मानवी मूल्यांना आपले आदर्श बनवण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी  विद्यार्थ्यांना  केले. विद्यार्थी या मूल्यांच्या आधारावरच यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतात, असे त्या म्हणाल्या.

युवकांमध्ये विकासाची अफाट क्षमता आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. युवकच विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दुवा आहेत.  त्यामुळे त्यांनी राष्ट्रासाठी स्वत:ला समर्पित केले पाहिजे. हे त्यांचे मानवी, सामाजिक आणि नैतिक कर्तव्यच नाही तर नागरिक म्हणूनही त्यांचे कर्तव्य आहे, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019753)