सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज आज नवी दिल्ली येथे प्राथमिक कृषी पत संस्थांतर्फे (पीएसीएस) चालविण्यात येणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांच्या (सीएससी) सेवा  सुरु करण्यासंबंधी एका राष्ट्रीय परिषदेचे केले उद्घाटन

Posted On: 21 JUL 2023 4:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे, प्राथमिक कृषी पत संस्थांतर्फे(पीएसी) चालविण्यात येणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांच्या (सीएससी) सेवेची  सुरुवात करण्यासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. केंद्रीय दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा तसेच केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधून केलेल्या भाषणात, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, पीएसी आणि सीएससी यांच्या एकत्रीकरणामुळे सहकारी संस्थांना बळकट करणे आणि डिजिटल इंडिया अभियानाला प्रोत्साहन देणे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन संकल्प आज पूर्ण होत आहेत. डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत सीएससीच्या माध्यमातून प्रशासनातून भ्रष्टाचार निपटून टाकणे आणि गरीब लोकांच्या दारापर्यंत सुविधा पोहोचविणे, तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाची उभारणी करून प्राथमिक कृषी पत  संस्थांपासून  ते सर्वोच्च स्तरापर्यंत संपूर्ण सहकार प्रणाली बळकट करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेले दोन निर्धार आज एकत्र झाले आहेत.

ते म्हणाले की जोपर्यंत प्राथमिक कृषी पत  संस्थां सशक्त होत नाहीत तोपर्यंत सहकार चळवळ मजबूत होऊ शकत नाही. म्हणूनच, सरकारने पीएसीचा कारभार अधिक पारदर्शक करणे, त्यांची विश्वासार्हता सुनिश्चित करणे आणि त्यांना आधुनिक स्वरूप देणे या दृष्टीने त्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरुन, केंद्र सरकारच्या डिजिटल स्वरुपात राबवल्या जाणाऱ्या योजना पीएसी मध्ये समाविष्ट करता येतील असे त्यांनी सांगितले.

गावांमधील  गरीब व्यक्तीला, भूमिहीन शेत मजुरांना आणि दलित तसेच आदिवासी समुदायांना सीएससीच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पीएसीपेक्षा अधिक योग्य मार्ग असू शकत नाहीत असे केंद्रीय गृहमंत्री यावेळी म्हणाले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की प्राथमिक कृषी पत  संस्थांपैकी आतापर्यंत 17,176 संस्थांनी नोंदणी केली आहे. त्यांनी सांगितले की या 17,176 पीएसीपैकी, सुमारे 6,670 संस्थांनी काम सुरु केले  असून उर्वरित पीएसी देखील येत्या 15 दिवसांत त्यांचे कार्य सुरु करतील. यामुळे ग्रामीण भागात्तील सुमारे 14,000 युवकांना रोजगार मिळणार असून हे युवक ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आणि ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करून देण्याचे देखील कार्य करतील असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941478) Visitor Counter : 98