पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला केलेले संबोधन

Posted On: 23 JUN 2023 7:17AM by PIB Mumbai

 

सभापती महोदय,

उपाध्यक्ष महोदया,

अमेरिकी काँग्रेसचे प्रतिष्ठित सदस्य,

मान्यवर बंधू आणि भगिनींनो,

नमस्कार!

अमेरीकी कॉंग्रेसला संबोधित करणे हा नेहमीच मोठा सन्मान असतो.  असे दोनदा करणे हा एक अपवादात्मक सन्मान आहे. या सन्मानासाठी मी भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या वतीने मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मला दिसतेय की तुमच्यापैकी जवळपास निम्मे 2016 मध्ये इथे होता. जुने मित्र म्हणून तुमची आपुलकी मला जाणवतेय. मी अर्ध्या भागात नव्यांमधील मैत्रीचा उत्साह देखील पाहू शकतो.  मला आठवते की सिनेटर हॅरी रीड, सिनेटर जॉन मॅककेन, सिनेटर ऑरिन हॅच, एलिजा कमिंग्ज, अॅल्सी हेस्टिंग्ज आणि इतर, ज्यांना मी येथे 2016 मध्ये भेटलो होतो आणि काही जे दुर्दैवाने आता आपल्यासोबत नाहीत.

 

सभापती महोदय,

येथे उभे राहून, सात वर्षांपूर्वी, याच जूनमध्ये हॅमिल्टनने सर्व पुरस्कार जिंकले, तेव्हा मी म्हणालो की संकोचाचा-संभ्रमाचा आपला इतिहास होता.  आता, आपण त्याला छेद देणाऱ्या वळणावर उभे आहोत. मी या शतकासाठीचे आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यावर चर्चा करण्यासाठी येथे आलो आहे.  आपण बराच लांब  आणि वळणाचा मार्ग पार केला असून, आता आपण मैत्रीच्या कसोटीवर उतरलो आहोत. मी  सात वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हापासून खूप काही बदलले आहे.  पण खूप काही   साम्यही आहे जसे की भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक समृद्ध करण्याची आपली वचनबद्धता.  एआय-कृत्रिम बुद्धिमत्तेत गेल्या काही वर्षांत बरीच प्रगती झाली आहे.  तसेच, इतर एआयमध्ये - अमेरिका आणि भारतात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत.

 

सभापती महोदय आणि मान्यवर सदस्यगण,

लोकांशी सतत जोडलेले राहणे, त्यांचे ऐकणे आणि त्यांची मनोभावना अनुभवणे हे लोकशाहीचे सौंदर्य आहे.  आणि, मला माहित आहे की यास खूप वेळ, ऊर्जा, मेहनत आणि लांबपल्ल्याचा प्रवास लागतो.  गुरुवारची दुपार आहे - तुमच्यापैकी काहींसाठी खूप व्यग्र दिवस.  म्हणून, मी तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आभारी आहे.  गेल्या महिन्यात तुम्ही किती व्यग्र होता हे देखील मला माहीत आहे.

एका चैतन्यशील लोकशाहीचा नागरिक या नात्याने मी एक गोष्ट मान्य करू शकतो महोदय, तुमचे काम कठीण आहे!  उत्साह, प्रतिपालन आणि धोरण यांच्या संघर्षाशी मी या कामाचा संबंध जोडून पाहू शकतो. मी विचार आणि विचारसरणीचा वाद समजू शकतो परंतु आज तुम्ही भारत आणि अमेरिका या जगातील दोन महान लोकशाही देशांतील संबंध साजरे करण्यासाठी एकत्र आल्याचे पाहून मला आनंद झाला. जेव्हा जेव्हा तुम्हाला मजबूत द्विपक्षीय सहमतीची आवश्यकता असेल तेव्हा मला मदत करण्यात आनंद होईल.  देशात विचारांचे मंथन होईल - आणि ते व्हायलाही हवे.  पण, जेव्हा आपण आपल्या राष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा आपणही एकत्र यायला हवे आणि आपण ते करू शकतो हे दाखवून दिले आहे. अभिनंदन!

 

सभापती महोदय,

लोकांचे समानता असलेले राष्ट्र या संकल्पनेतून अमेरिकेची स्थापना झाली.  तुमच्या संपूर्ण इतिहासात तुम्ही जगभरातील लोकांना सामावून घेतले आहे. आणि त्यांना अमेरिकन स्वप्नात समान भागीदार केले आहे. इथे लाखो लोक आहेत ज्यांची मुळे भारतात आहेत.  त्यापैकी काही या कक्षात सन्मानाने विराजमान आहेत. इथे माझ्या मागेही एक आहेत, ज्यांनी इतिहास घडवला आहे!  मला माहिती आहे की समोसा कॉकसचे आता सभागृहात खास स्थान आहे.  मला आशा आहे की ते आणखी वाढेल आणि भारतीय पाककृतींची संपूर्ण विविधता समोर आणेल. दोन शतकांहून अधिक काळ, महान अमेरिकन आणि भारतीयांच्या जीवनशैलीने आपण एकमेकांना प्रेरित केले आहे. आपण महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांना श्रद्धांजली अर्पण करतो.  स्वातंत्र्य, समानता आणि न्याय यासाठी काम करणाऱ्या इतर अनेकांचे स्मरणही आपण करतो.  आज, मला त्यांच्यापैकी एक - काँग्रेस सदस्य जॉन लुईस यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची आहे.

 

सभापती महोदय,

लोकशाही हे आपल्या पवित्र आणि सामायिक मूल्यांपैकी एक आहे. ती प्रदीर्घ कालावधीत विकसित झाली आहे, आणि तिने विविध रूपे आणि व्यवस्था स्वीकारल्या आहेत.  तथापि, संपूर्ण इतिहासात, एक गोष्ट स्पष्ट आहे.

लोकशाही ही समानता आणि सन्मानाच्या भावनेचा पुरस्कार करते .

लोकशाही हा एक असा विचार आहे जो चर्चा आणि संवादाचे स्वागत करतो.

लोकशाही ही एक संस्कृती आहे जी विचार आणि अभिव्यक्तीला बळ देते.

भारताला अनादी काळापासून अशा मूल्यांचे वरदान लाभले आहे.  लोकशाही भावनेच्या विकासात भारत ही लोकशाहीची जननी आहे.

हजारो वर्षांपूर्वी, आपल्या सर्वात जुन्या शास्त्रांमध्ये असे म्हटले होते,

एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति’.

याचा अर्थ- सत्य एकच आहे पण बुद्धिवंत ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात.

आता अमेरिका सर्वात जुनी आणि भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे.

लोकशाहीच्या भविष्यासाठी आपली भागीदारी शुभ संकेत आहे.

मिळून, आपण जगाला एक चांगले भविष्य देऊ आणि भविष्यासाठी एक चांगले जग देऊ.

 

सभापती महोदय,

गेल्या वर्षी भारताने स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा केला. प्रत्येक कामगिरी महत्त्वाची असते, पण ही खास आहे.  हजार वर्षांच्या कोणत्या ना कोणत्या स्वरुपातील  परकीय राजवटीनंतरच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा उल्लेखनीय प्रवास आम्ही साजरा केला.  हा केवळ लोकशाहीचाच नव्हे तर विविधतेचा, संविधानाचा, सामाजिक सशक्तीकरणाचा, तसेच आपल्या प्रतिस्पर्धी आणि सहकारी संघराज्याचाच नव्हे तर आपल्या आवश्यक एकता आणि अखंडतेचाही उत्सव होता.

आमच्याकडे दोन हजार पाचशेहून अधिक राजकीय पक्ष आहेत.  होय, तुम्ही बरोबर ऐकलेत - दोन हजार पाचशे.  भारतातील विविध राज्यांमधे सुमारे वीस वेगवेगळे पक्ष कारभार सांभाळत आहेत.  आमच्याकडे बावीस अधिकृत भाषा आणि हजारो बोली आहेत आणि तरीही आमचा सूर एकच आहे. आमचे खाद्यपदार्थ दर शंभर मैलांवर बदलतात.  डोस्यापासून आलू परांठ्यापर्यंत आणि श्रीखंडापासून संदेशपर्यंत, आम्ही सर्वांचा आनंद घेतो.  आम्ही जगातील सर्व धर्मांचे घर आहोत आणि आम्ही ते सर्व साजरेही करतो.  भारतात विविधता ही नैसर्गिक जीवनशैली आहे.

जगाला आज भारताबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे.  ते कुतुहल या सभागृहातही मला दिसते.  गेल्या दशकभरात अमेरिकी काँग्रेसच्या शंभरहून अधिक सदस्यांचे भारतात स्वागत केल्याचा आम्हाला सन्मान वाटतो.  प्रत्येकाला भारताचा विकास, लोकशाही आणि विविधता समजून घ्यायची आहे.  प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की भारत काय योग्य करत आहे आणि ते कसे करत आहे.  जवळच्या मित्रांमध्ये, मला ते सामायिक करताना आनंद होत आहे.

 

माननीय सदस्यगण,

वेद हे जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. हजारो वर्षांपूर्वी रचण्यात आलेले हे ग्रंथ मानवतेचा एक मोठा खजिना आहेत. त्या काळात महिला ऋषींनी वेदांमधील अनेक श्र्लोकांची रचना केली आणि आज आधुनिक भारतामध्ये महिला एका उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने आमचे नेतृत्व करत आहेत. भारताचा दृष्टीकोन केवळ महिलांना लाभ देणाऱ्या विकासाचा नाही. हा महिला प्रणीत विकास आहे ज्यामध्ये महिला प्रगतीच्या वाटचालीचे नेतृत्व करत आहेत. एक सामान्य आदिवासी पार्श्वभूमी असलेल्या महिलेने आज आमच्या देशाची प्रमुख बनण्यापर्यंत प्रगती केली आहे.

सुमारे 15 लाख निर्वाचित महिला विविध पातळ्यांवर आमचे नेतृत्व करत आहेत आणि स्थानिक शासनसंस्थांचे हे नेतृत्व आहे. आज आमच्या देशात महिला लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये सेवा करत आहेत. जगामध्ये महिला वैमानिकांची सर्वात जास्त टक्केवारी भारताची आहे. आमच्या मंगळ मोहिमेचे नेतृत्व करून त्यांनी आम्हाला मंगळावर देखील नेले आहे. बालिकेमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे संपूर्ण कुटुंबाचे उत्थान होते अशी माझी धारणा आहे. महिलांच्या सक्षमीकरणामुळे देशाचा कायापालट होतो.

 

सभापती महोदय,

युवा लोकसंख्या असलेला भारत हा एक प्राचीन देश आहे. आपल्या परंपरांसाठी भारत ओळखला जातो. मात्र, युवा पिढी या देशाला तंत्रज्ञानाचे केंद्र देखील बनवत आहे. इन्स्टावरील सर्जनशील रील्स असोत किंवा रियल टाईम पेमेंट असो, कोडींग किंवा क्वान्टम कंप्युटिंग, मशीन लर्निंग किंवा मोबाईल ऍप्स, फिनटेक किंवा डेटा सायन्स असो भारताचा युवा वर्ग हा कशा प्रकारे एखादा समाज आधुनिक तंत्रज्ञानाला आत्मसात करतो त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. भारतामध्ये तंत्रज्ञान हे केवळ नवोन्मेषापुरते मर्यादित नसून समावेशनाबाबतही आहे. आज डिजिटल मंच लोकांचे अधिकार आणि आत्मसन्मानाचे सक्षमीकरण करत आहेत आणि त्यांच्या गोपनीयतेचे देखील रक्षण करत आहेत.  

गेल्या नऊ वर्षात एक अब्जाहून जास्त लोकांना त्यांच्या बँक खात्यांशी आणि मोबाईल फोनसोबत संलग्न असलेली विशिष्ट डिजिटल बायोमेट्रिक ओळख मिळाली आहे. या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे केवळ काही सेकंदात नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आम्हाला मदत मिळत आहे. 85 कोटी लोकांना त्यांच्या थेट खात्यात जमा होणाऱ्या अर्थसहाय्याद्वारे थेट लाभ मिळत आहेत. वर्षातून तीन वेळा 100 कोटी शेतकऱ्यांना केवळ एक बटण क्लिक करून मदत मिळत आहे. अशा प्रकारच्या हस्तांतरणाचे मूल्य 320 अब्ज डॉलरच्या पुढे गेले आहे आणि आम्ही या प्रक्रियेमध्ये 25 अब्ज डॉलरची बचत केली आहे. जर तुम्ही भारताला भेट दिली तर तुम्हाला रस्त्यावरील फेरीवाल्यासहित प्रत्येक जण पेमेंटसाठी फोनचा वापर करत असल्याचे दिसेल.

गेल्या वर्षी प्रत्येक 100 रियल टाईम डिजिटल पेमेंटपैकी 46 भारतात होत होती. सुमारे चारशे हजार मैल ऑप्टिकल फायबर केबल्स आणि चीप डेटा यांनी संधीची एक क्रांती निर्माण केली आहे. आपल्या फोनवर केवळ एका टॅपद्वारे शेतकरी हवामानाची ताजी माहिती तपासून पाहतात, ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ मिळतात, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध होतात, डॉक्टर्स टेलिमेडिसीन देतात, मच्छिमार मासेमारीसाठी योग्य ठिकाणे शोधतात आणि लहान व्यवसायांना कर्जे मिळतात.

 

सभापती महोदय,

लोकशाहीची भावना, समावेशन आणि शाश्वतता ही आमची ओळख आहे. जगाकडे पाहण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला ती आकार देते. भारत आपल्या ग्रहाविषयीची जबाबदारी ओळखून विकास करत आहे.

 

आमची धारणा आहेः

माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या:

याचा अर्थ आहे ही पृथ्वी आमची माता आहे आणि आम्ही तिची बालके आहोत.

 

पर्यावरण आणि आपली पृथ्वी यांचा भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सन्मान केला जातो. सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनत असतानाआम्ही आमच्या सौर ऊर्जा क्षमतेत दोन हजार तीनशे टक्के वाढ केली आहे. तुम्ही जे ऐकत आहात ते अगदी बरोबर आहे- दोन हजार तीनशे टक्के!

आम्ही पॅरिस वचनबद्धतेची पूर्तता करणारा एकमेव जी20 देश बनलो आहोत. आम्ही आमच्या ऊर्जा स्रोतांपासून 40 टक्क्यांपेक्षा जास्त नवीकरणीय ऊर्जा तयार केली आहे, जे 2030 पर्यंतच्या लक्ष्याच्या नऊ वर्षे आधीच साध्य केले आहे. ग्लासगो शिखर परिषदेत मी मिशन लाईफ’- पर्यावरणासाठी जीवनशैली ही संकल्पना मांडली होती. शाश्वततेला खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनवणारा हा एक मार्ग आहे. हे काम एकट्या सरकारवर सोडू नका.

आपली निवड करताना विवेक राखल्यास प्रत्येकाला एक सकारात्मक प्रभाव निर्माण करता येईल. शाश्वतता ही लोकचळवळ बनल्यास जगाला निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट वेगाने गाठण्यास मदत होईल. आपल्या ग्रहाला अनुकूल प्रगती करणे हा आमचा दृष्टीकोन आहे. आपल्या ग्रहाला अनुकूल समृद्धी हा आमचा दृष्टीकोन आहे.

 

सभापती महोदय,

आम्ही वसुधैव कुटुंबकम किंवा हे जग म्हणजे एक कुटुंब आहे या घोषवाक्याला अनुसरून जीवन जगतो. जगासोबत आमचा संपर्क आणि संवाद हा सर्वांच्या फायद्यासाठी असतो. जगाला स्वच्छ ऊर्जेने जोडणे हा  एक सूर्य, एक विश्व, एक ग्रिड चा उद्देश आहे. एक पृथ्वी, एक आरोग्य प्राणी आणि झाडेझुडपे यांच्यासह प्रत्येकासाठी दर्जेदार आरोग्यसुविधा निर्माण करणाऱ्या जागतिक उपक्रमाचा एक दृष्टीकोन आहे.

जी20 चे अध्यक्षपद भूषवत असताना एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेत आम्ही हीच भावना पाहात आहोत. योगाच्या माध्यमातूनही आम्ही एकतेच्या भावनेला चालना देत आहोत. अगदी कालच संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते.  गेल्याच आठवड्यात सर्व देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये शांतीसैनिकांच्या सन्मानार्थ एक मेमोरियल वॉल बांधण्याच्या आमच्या प्रस्तावाबाबत सहमती दर्शवली. आणि यावर्षी शाश्वत शेती आणि पोषणमूल्य असलेल्या धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत आहे.कोविड काळात आम्ही एकशे पन्नासहून जास्त देशांना लसी आणि औषधांचा पुरवठा केला. आपत्तींच्या काळात आमच्या स्वतःच्या जनतेला मदत करण्याबरोबरच इतरांच्या मदतीसाठी देखील  सर्वात पहिल्यांदा प्रतिसाद देणारे म्हणून आम्ही धावून जातो. ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यासाठी आमची माफक प्रमाणात उपलब्ध असलेली संसाधने देखील आम्ही विभागून देतो. आम्ही क्षमतांची उभारणी करतो, अवलंबित्वाची नव्हे.

 

सभापती महोदय,

जेव्हा मी जगाकडे पाहण्याच्या भारताच्या दृष्टीकोनाबद्दल बोलतो तेव्हा त्यात अमेरिकेने विशेष स्थान व्यापलेले असते. आपल्यातील संबंध तुम्हां सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे मला माहित आहे. या संमेलनातील प्रत्येक सदस्याला त्यात विशेष स्वारस्य आहे. जेव्हा भारतातील संरक्षण आणि हवाई क्षेत्र विकसित होते तेव्हा वॉशिंग्टन, अॅरिझोना, जॉर्जिया, अलाबामा, साऊथ कॅरोलिना आणि पेन्सिल्वेनिया या राज्यांतील उद्योग भरभराटीला येतात. जेव्हा अमेरिकी कंपन्यांची वृद्धी होते तेव्हा त्यांची भारतातील संशोधन आणि विकास केंद्रे समृध्द होतात. जेव्हा अधिकाधिक प्रमाणात भारतीय नागरिक हवाई प्रवास करतात तेव्हा अमेरिकेला मिळालेली विमानांची एक ऑर्डर तेथील चव्वेचाळीस राज्यांमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण करते.

जेव्हा फोन निर्मिती करणारी अमेरिकी कंपनी भारतात गुंतवणूक करते तेव्हा त्यातून दोन्ही देशांमध्ये नोकऱ्या आणि संधींच्या एका संपूर्ण परिसंस्थेची निर्मिती होते. जेव्हा सेमी-कंडक्टर्स आणि महत्त्वाच्या खनिजांच्या बाबतीत भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्यातून पुरवठा साखळ्या अधिक वैविध्यपूर्ण, लवचिक आणि खात्रीलायक बनवण्यासाठी जगाला मदत होते.खरोखरीच सभापती महोदय, या शतकाच्या सुरुवातीला आम्ही संरक्षण क्षेत्रातील सहकार्याच्या बाबतीत अनोळखी होतो. आता मात्र, अमेरिका आमच्या सर्वात महत्त्वाच्या संरक्षण विषयक भागीदारांपैकी एक देश झाला आहे. अवकाश आणि सागरी क्षेत्र, विज्ञान आणि सेमी-कंडक्टर्स, स्टार्ट अप उद्योग आणि शाश्वतता, तंत्रज्ञान आणि व्यापार, कृषी आणि अर्थक्षेत्र, कला आणि कृत्रिम बुद्धीमत्ता, उर्जा आणि शिक्षण, आरोग्यसुविधा आणि मानवतावादी उपक्रम अशा अनेकानेक क्षेत्रांमध्ये आज भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करत आहेत.

मी अजूनही अशा अनेक गोष्टींची यादी करू शकतो. पण थोडक्यात सांगायचे झाले तर, मी म्हणेन,

आपल्यातील सहकार्याचा आवाका अनंत आहे,

आपल्यातील समन्वयाची क्षमता अमर्याद आहे,

आणि आमचे नातेसंबंध अगदी सहजतेने एकमेकांशी जुळले आहेत. 

या सगळ्यामध्ये भारतीय अमेरिकन नागरिकांनी फार मोठी भूमिका निभावलेली आहे. ते केवळ स्पेलिंग बीसारख्या एखाददुसऱ्या स्पर्धेच्या बाबतीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात प्रतिभावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची हृदये आणि मने, प्रतिभा आणि कौशल्ये आणि त्यांचे अमेरिका तसेच भारतावर असलेले प्रेम या सगळ्या घटकांसह ते आमच्याशी जोडले गेले आहेत; त्यांनी अनेक बंद दरवाजे खुले केले; त्यांनी आपल्या भागीदारीत लपलेली क्षमता दाखवून दिली.

सभापती महोदय आणि मान्यवर सदस्य,

भूतकाळात होऊन गेलेले प्रत्येक भारतीय पंतप्रधान आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या देशांचे एकमेकांशी असलेले संबंध अधिकाधिक दृढ केले. मात्र, त्यांना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा मान आपल्या पिढीला मिळाला आहे. ही या शतकातील एक अत्यंत सुनिश्चित भागीदारी आहे या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण ही भागीदारी अधिक व्यापक उद्देशासह काम करते आहे. लोकशाही, लोकसंख्येचा अभ्यास आणि नियती यांनी आपल्याला हा उद्देश दिला आहे. पुरवठा साखळ्यांचे अति-केंद्रीकरण हा जागतिकीकरणाचा एक परिणाम आहे.

पुरवठा साखळ्यांमध्ये वैविध्य आणणे, त्यांचे विकेंद्रीकरण तसेच लोकशाहीकरण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करु. एकविसाव्या शतकातील सुरक्षितता, समृद्धी आणि नेतृत्व या बाबी तंत्रज्ञानाद्वारे निश्चित होणार आहेत. म्हणूनच आपल्या दोन्ही देशांनी महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांसाठी पुढाकार या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आपली माहितीविषयक भागीदारी मानवतेची सेवा करेल आणि हवामान बदल, भूक तसेच आरोग्य यांसारख्या जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल.

 

सभापती महोदय आणि मान्यवर सदस्यगण,

गेल्या काही वर्षांमध्ये जगात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडी झाल्या आहेत. युक्रेन संघर्षासह युरोपात पुन्हा युध्द स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या भागात मोठी वेदनादायक स्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षामध्ये प्रमुख शक्तींचा सहभाग असल्यामुळे, त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. या मुळे जागतिक दक्षिणेकडील देश विशेष करून प्रभावित झाले आहेत. संयुक्त राष्ट्र सनदेतील तत्वांप्रती आदर, विवादांचे शांततापूर्ण निराकरण तसेच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांच्याप्रती आदर या तत्वांवर जागतिक व्यवस्था आधारलेली आहे.

मी अनेकदा थेटपणे आणि सार्वजनिकरित्या बोललो आहे त्याप्रमाणे, हे काही युद्धाचे युग नाही. तर हे परस्पर संवाद आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे युग आहे. आणि आपण सर्वांनी रक्तपात तसेच मानवी वेदना थांबविण्यासाठी जे प्रयत्न करणे शक्य आहे ते केले पाहिजेत. सभापती महोदय, बळजबरी आणि शत्रुत्वाच्या काळ्या ढगांची सावली हिंद-प्रशांत प्रदेशावर पडते आहे. या प्रदेशातील स्थैर्य कायम राखणे ही आपल्या भागीदारीतील प्रमुख चिंताजनक बाबींपैकी एक बाब झाली आहे.

सुरक्षित समुद्रांनी जोडलेल्या, आंतरराष्ट्रीय कायद्याने निश्चित केलेल्या, कोणाच्याही वर्चस्वाखाली नसलेल्या आणि आसियान केंद्रीयत्वाच्या मजबूत आधाराने बांधल्या गेलेल्या  मुक्त, खुल्या आणि समावेशक हिंद प्रशांत परिसराची संकल्पना आपण सामायिक करत आहोत. हा एक असा प्रदेश असेल जेथे सर्व लहान मोठी राष्ट्रे त्यांचे निर्णय खुल्या आणि भयमुक्त पद्धतीने घेतील, जेथे कर्जाच्या अशक्यप्राय ओझ्याखाली प्रगतीची घुसमट होणार नाही, जेथे धोरणात्मक उद्देशांसाठी जोडणीचा वापर करून घेतला जाणार नाही आणि जेथे सर्व देशांना सामायिक समृद्धीच्या भरतीवर स्वार होता येईल. 

कोणालाही समाविष्ट करून घेणे अथवा वगळणे ही आपली संकल्पना नाही तर शांतता आणि समृद्धी असलेला सहकारी प्रदेश उभारणे हे आपले उद्दिष्ट आहे. आम्ही प्रादेशिक संस्थांच्या माध्यमातून आमच्या भागीदारांसह या प्रदेशात आणि त्याहीपलीकडे आमचे कार्य करत आहोत. त्यापैकी, क्वाड हा मंच या प्रदेशासाठी उपकारक अशी प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे.

 

सभापती महोदय,

9/11च्या हल्ल्यानंतर दोन दशकांहून अधिक काळ आणि मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यानंतर दशकभराचा कालावधी लोटल्यानंतरही कट्टरवाद आणि दहशतवाद हे अजूनही संपूर्ण जगासाठी धोका बनून राहिले आहेत. अशा प्रकारच्या विचारधारा नवनवीन व्यक्तिमत्त्वे आणि स्वरूपे धारण करत राहतात मात्र त्यांचे अंतर्गत हेतू एकसमानच असतात. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे आणि त्याचा सामना करताना कोणत्याही जर...तर ची शक्यता असू शकत नाही. दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या आणि प्रसार करणाऱ्या अशा सर्व शक्तींवर आपण मात केली पाहिजे.

 

सभापती महोदय,

कोविड-19 महामारीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे मनुष्य हानी आणि या रोगाने दिलेले अतोनात दुःख. या क्षणी मी कोविडमुळे जीव गमावलेले काँग्रेस सदस्य रॉन राईट आणि कर्मचारी वर्गातील काही जण यांचे स्मरण करू इच्छितो. महामारीच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपण सर्वांनी नव्या जागतिक व्यवस्थेला आकार द्यायला हवा. विचारमंथन, खबरदारी आणि चिंता ही आजच्या काळाची गरज आहे. जागतिक दक्षिणेकडील देशांना मत मांडण्याचा अधिकार देणे हा आपला यापुढील मार्ग असायला हवा. आणि म्हणून माझा दृढ विश्वास आहे की, आफ्रिकी युनियनला जी-20 समूहाचे संपूर्ण सदस्यत्व द्यायला हवे.

आपण बहुपक्षीयतेचे पुनरुज्जीवन केले पाहिजे आणि बहुपक्षीय संस्थांमध्ये अधिक उत्तम स्त्रोत आणि प्रतिनिधित्वासह सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. आपल्या सर्व जागतिक प्रशासन संस्थांना, विशेषतः संयुक्त राष्ट्रांना हे तत्व लागू होते. जेव्हा सारे जग बदलले आहे तेव्हा आपल्या संस्थांनी सुद्धा बदल घडवले पाहिजेत. नाहीतर, धोक्यांची जागा नियमांशिवायच्या स्पर्धकांनी भरलेले जग घेईल. आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित नव्या जागतिक व्यवस्थेसाठी काम करताना आपले हे दोन देश भागीदार म्हणून याबाबतीत आघाडीवर असतील.

 

सभापती महोदय आणि माननीय सदस्यहो,

आपण आज आपल्या दोन्ही देशांचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नशीब घडवणाऱ्या आपल्या नात्यातील एका नव्या पहाटेच्या उंबरठ्यावर उभे आहोत. तरुण अमेरिकी कवयित्री अमांडा गॉर्मन यांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे:

जेव्हा दिवस उगवतो,आपण सावलीतून बाहेर पाऊल टाकतो,

ज्वलंत आणि निर्भय,

आपण मुक्त होतो तेव्हा नवी पहाट बहरते

कारण प्रकाश तर नेहमीच असतो,

पण आपण तो पाहण्याचे धाडस केलेले असेल तरच.

आपली विश्वसनीय भागीदारी सर्वत्र प्रकाश पसरविणाऱ्या या नव्या पहाटेच्या सूर्याप्रमाणे आहे.

 

मला यावेळी, मी पूर्वी कधीतरी लिहिलेली एक कविता स्मरते आहे:

आकाशात डोके उंच करून

घनदाट मेघांतून मार्ग काढत

प्रकाश पसरविण्याचा निर्धार कर

आत्ता कुठे सूर्योदय झाला आहे.

दृढ निश्चयासह वाटचाल करुन

प्रत्येक अडचणीवर मात कर

निबिड अंधःकार संपविण्यासाठी

आत्ता कुठे सूर्योदय झाला आहे.

 

जर मला ही कविता इंग्रजी भाषेत मांडायची झाली तर ती पुढीलप्रमाणे असेल.

Raising its head in the skies,

Piercing through the dense clouds,

With the promise of light,

The sun has just risen.

Armed with a deep resolve,

Overcoming all the odds,

To dispel the forces of darkness,

The sun has just risen.

 

सभापती महोदय आणि माननीय सदस्यगण,

आपल्या दोन्ही देशांची परिस्थिती आणि इतिहास वेगवेगळे असले तरी पण आपण एकाच सामायिक संकल्पनेने एकत्र आलो आहोत, आणि समान नियतीने देखील. जेव्हा आपल्या भागीदारीची प्रगती होते, तेव्हा आर्थिक लवचिकता वाढते, नवोन्मेष वाढतो, विज्ञानाची भरभराट होते, ज्ञानात भर पडते, मानवतेला लाभ मिळतो, आपले सागर आणि आकाश अधिक सुरक्षित होतात, आपल्या भागीदारीमुळे लोकशाही अधिक तेजाने झळकेल आणि हे जग राहण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारची जागा होईल. 

हेच आपल्या भागीदारीचे उद्दिष्ट्य आहे. हे या शतकासाठीचे आमचे आवाहन आहे. सभापती महोदय तसेच माननीय सदस्यगण, आपल्या भागीदारीच्या उच्च मानकांनुसार देखील ही भेट म्हणजे उत्तम सकारात्मक परिवर्तनापैकी एक होय.आपण सर्वांनी एकत्र येऊन हे दाखवून देऊया की लोकशाही महत्त्वाची आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातूनच अनेक गोष्टी घडू शकतात.भारत-अमेरिका भागीदारीला तुमचा असाच पाठींबा मिळत राहील असा मला विश्वास वाटतो. 

मी जेव्हा 2016 साली येथे आलो होतो तेव्हा मी म्हणालो होतो की, महत्त्वपूर्ण भविष्यासाठी आपले नाते सर्वात महत्त्वाचे आहे. ते भविष्य म्हणजे आजचा काळ आहे. हा सन्मान मला दिल्याबद्दल मी सभापती महोदय, उपराष्ट्रपती महोदया आणि माननीय सदस्यगण यांचे पुन्हा एकदा आभार मानतो.

अमेरिकेला देवाचे आशीर्वाद लाभो हीच सदिच्छा.

जय हिंद.

भारत-अमेरिका मैत्री चिरायू होवो.

***

M.Iyengar/V.Ghode/S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935010) Visitor Counter : 170