संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदीय शिष्टमंडळाची उरुग्वेला सदिच्छा भेट
Posted On:
17 JUN 2023 9:09AM by PIB Mumbai
संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या 10 सदस्यीय संसदीय शिष्टमंडळाने 14-17 जून 2023 दरम्यान उरुग्वेला सदिच्छा भेट दिली. ओरिएंटल रिपब्लिक ऑफ उरुग्वेच्या संसद प्रतिनिधी सभागृहाच्या (कनिष्ठ सभागृह) अध्यक्षांनी भारतीय शिष्टमंडळाला भेटीचे निमंत्रण दिले होते. उभय लोकशाहींमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत आणि दृढ करणे हा या भेटीचा उद्देश होता.
अर्जेंटिना आणि उरुग्वे येथील भारताचे राजदूत दिनेश भाटिया यांनी 14 जून रोजी शिष्टमंडळाचे स्वागत केले. उरुग्वेबाबत आणि भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या वाढत्या महत्त्वाविषयी त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला माहिती दिली.
भारताचे संसदीय शिष्टमंडळ याआधी, 2012 मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली उरुग्वेला गेले होते.
दौऱ्याची अधिकृत सुरुवात 15 जून रोजी झाली. प्रारंभी मंत्री आणि शिष्टमंडळातील सदस्यांनी राजधानी मॉन्टेव्हिडिओ शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. विशेष म्हणजे राजधानीतील या स्मारकाजवळ असलेल्या प्रख्यात रामबला भागातील सागरी मार्गाला महात्मा गांधींजीचेच नाव दिले आहे.
उरुग्वे संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनीही शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करण्याबरोबरच भारताचे संसदीय मंत्री जोशी आणि उरुग्वेचे मंत्री अंदुजार यांनी उरुग्वेच्या संसदेत भारत – उरुग्वे संसदीय मैत्री गटाची सुरूवात केली. विशेषत: संसदीय मुत्सद्देगिरीद्वारे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली.
संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी अंदुजर यांना संसदीय शिष्टमंडळासोबत भारत भेटीचे निमंत्रण दिले. अंदुजर त्यांनी ते स्वीकारले. उरुग्वेच्या संसद सदस्यांची भारताला भेट 2023 संपण्यापूर्वी होईल. भेटीच्या तारखा राजनैतिक माध्यमांद्वारे निश्चित केल्या जातील यावर सहमती झाली.
संसदीय कामकाज मंत्री, शिष्टमंडळ आणि राजदूत भाटिया यांनी उरुग्वेच्या उपराष्ट्रपती आणि सिनेट (वरच्या सभागृह) अध्यक्ष, बीट्रिझ अर्गिमॉन यांची भेट घेतली, या पदावर निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. शिष्टमंडळाचे स्वागत करताना त्यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या भारत भेटीच्या फलदायी आणि संस्मरणीय आठवणी सांगितल्या. उभय चैतन्यशील लोकशाहीमधील संबंध अधिक व्यापक करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने घेतलेल्या विविध धोरणात्मक उपक्रमांमुळे झालेल्या भारताच्या वेगवान सामाजिक-आर्थिक विकासावर जोशी यांनी दोन्ही बैठकांमध्ये प्रकाश टाकला.
उरुग्वेमधे राहणाऱ्या भारतीयांच्या सांस्कृतिक संघटनेने, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही शिष्टमंडळ सहभागी झाले.
मंत्री महोदय आणि शिष्टमंडळाने मॉन्टेव्हिडिओमध्ये भारतीय समुदाय आणि मित्रांशी संवाद साधला. उरुग्वेमध्ये 800 हून अधिक भारतीय राहतात.
उरुग्वे XXI ही उरुग्वे सरकारच्या अंतर्गत निर्यात, गुंतवणूक आणि देशाच्या प्रतिमेला उंचावण्यासाठी कार्यरत संस्था आहे. या संस्थेने 16 जून रोजी द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संपूर्ण शिष्टमंडळासमोर सादरीकरण केले. शिष्टमंडळाने उरुग्वे मधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या कार्यालयालाही भेट दिली. TCS ने 2022 मध्ये इथे 20 वर्षे पूर्ण केली. आज TCS उरुग्वे हे त्या देशातील मनुष्यबळाचे खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठे नियोक्ते आहेत.
एकीकडे, भारत आणि उरुग्वेने 2020 मध्ये राजनैतिक संबंधांची 60 वर्षे पूर्ण केली तर दुसरीकडे, द्विपक्षीय व्यापारात गेल्या काही वर्षांत जोरदार वाढ झाली आहे. 2022-23 मध्ये ती 350 दशलक्ष अमेरीकी डॉलर्सपेक्षा जास्त नोंदवली गेली. उभय लोकशाही देश व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहेत.
****
Sonal T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933017)