पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त 11 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


पंतप्रधानांच्या हस्ते 5,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

विशाखापट्टणम येथील होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे लोकार्पण

नवी मुंबई येथील महिला आणि लहान मुलांच्या कर्करोग रुग्णालय इमारतीचे लोकार्पण,

नवी मुंबई येथील राष्ट्रीय हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा’ आणि रेडिओलॉजिकल रिसर्च युनिटचे राष्ट्रार्पण

मुंबई मधील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा आणि विशाखापट्टणम येथील रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेट प्लांट राष्ट्राला समर्पित

ओदिशा मधील जटनी येथील, होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, आणि टाटा मेमोरियल रुग्णालय , मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक यांची पायाभरणी

लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा – इंडिया (LIGO-India) ची पायाभरणी

पंचविसाव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त एक विशेष स्टॅम्प आणि नाणे जारी केले

“अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही"

"अटलजींच्या शब्दात सांगायचे झाले तर आपण आपल्या या अथक प्रवासात कधीच थांबलो नाही आणि मार्गात आलेल्या कोणत्याही आव्हानापुढे शरणागती पत्करली नाही."

"आपल्याला राष्ट्राला विकसित आणि आत्मनिर्भर करायचे आहे"

"लहान मुले आणि युवावर्गाची जिद्द, ऊर्जा आणि क्षमता ही भारताची मोठी बलस्थाने आहेत"

"भारतातील टिंकर-प्रेन्युअर्स लवकरच जगातील आघाडीचे उद्योजक बनतील"

"तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक त्या सर्व दिशांनी भारत आगेकूच करत आहे"

Posted On: 11 MAY 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. पंचविसाव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त 11 ते 14 मे या कालावधीत आयोजित उत्सवाची सुरुवात देखील या कार्यक्रमात करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी, पंतप्रधानांच्या हस्ते देशाच्या वैज्ञानिक  आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. देशातील वैज्ञानिक संस्थांना बळकट करून आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी हे अनुरूप आहे.

ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा -इंडिया (LIGO-India), हिंगोली; होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, जटनी, ओदिशा  आणि टाटा मेमोरियल रुग्णालय , मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक यांचा समावेश आहे.

राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई येथील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा, विशाखापट्टणम येथील रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेट प्लांट; नवी मुंबई येथील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा;  नवी मुंबई येथील रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट; विशाखापट्टणम येथील होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि नवी मुंबई येथील महिला आणि लहान मुलांच्या  कर्करोग रुग्णालयाची  इमारत,  यांचा समावेश आहे.या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी  भारतामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या विज्ञान  आणि तंत्रज्ञानविषयक  प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच  स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले.

11 मे हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत प्रतिष्ठित दिवस आहे, असे पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना म्हणाले. आजच्याच दिवशी  भारतीय  शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अतुलनीय कामगिरी केली ज्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटला, असे ते म्हणाले. अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही"असे पंतप्रधान म्हणाले. पोखरण अणुचाचणी मुळे भारताला आपल्या वैज्ञानिक क्षमता सिद्ध करता आल्याच मात्र यासोबतच जागतिक स्तरावरही राष्ट्राचे महत्व वाढले. "अटलजींच्या शब्दात सांगायचे झाले तर आपण आपल्या या अथक प्रवासात कधीच थांबलो नाही आणि मार्गात आलेल्या कोणत्याही आव्हानापुढे शरणागती पत्करली नाही." असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

आज उद्घाटन झालेल्या भविष्यवेधी प्रकल्पांचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी राष्ट्रीय हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा आणि मुंबईतील रेडिओलॉजिकल संशोधन केंद्र, फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा, विशाखापट्टणम मधील दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबक प्रकल्प किंवा विविध कर्करोग संशोधन रुग्णालयांचा उल्लेख केला. आण्विक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाच्या प्रगतीला चालना मिळेल, असे ते म्हणाले. लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा - इंडिया (LIGO-India ) बद्दल बोलताना, पंतप्रधानांनी लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळेला 21 व्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अग्रगण्य उपक्रमांपैकी एक असल्याचे सांगितले. या वेधशाळेमुळे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांना संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

आज अमृत काळाच्या सुरुवातीच्या काळात 2047 ची उद्दिष्टे आपल्यासमोर स्पष्ट आहेत, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. आपल्याला देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवायचे आहे, असे सांगत पंतप्रधांनी विकास, नवोन्मेष आणि शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. प्रत्येक पावलावर असलेलले तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि भारत या संदर्भात सर्वांगीण आणि 360-अंशाच्या दृष्टिकोनाने वाटचाल करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत तंत्रज्ञानाला आपले वर्चस्व गाजवण्याचे साधन नाही तर देशाच्या प्रगतीचे साधन मानतो, असे पंतप्रधान म्हणाले.

आजच्या कार्यक्रमाच्या स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ म्हणजेच तरुणांना नवोन्मेषासाठी आणि स्टार्टअप्स साठी प्रोत्साहन देणे या संकल्पनेची प्रशंसा करत, भारताचे भविष्य आजचे तरुण आणि मुले ठरवतील, असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या मुलांचा आणि तरुणांचा उत्साह, ऊर्जा आणि क्षमता ही भारताची मोठी ताकद आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, माहितीसोबतच ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि भारत एक ज्ञान संपन्न समाज म्हणून विकसित होत असल्याने तो त्याच गतीने कृतीही करत आहे, असे त्यांनी सांगितले. तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी गेल्या 9 वर्षात देशात निर्माण झालेला मजबूत पाया त्यांनी विशद केला.

700 जिल्ह्यांतील 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळा नवोन्मेषाच्या रोपवाटिका (नर्सरी) बनल्या आहेत. विशेष म्हणजे यातील 60 टक्के प्रयोगशाळा सरकारी आणि ग्रामीण शाळांमध्ये आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. अटल टिंकरिंग प्रयोगशाळांमध्ये 75 लाखांहून अधिक विद्यार्थी 12 लाखांहून अधिक नवोन्मेषी प्रकल्पांवर अथक परिश्रम घेऊन काम करत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हे तरुण शास्त्रज्ञ शाळांमधून बाहेर पडल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे हे चिन्ह आहे त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या प्रतिभेला जोपासणे आणि त्यांच्या कल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी अटल नवोन्मेष केंद्रांमध्ये (एआयसी) इन्क्युबेट केलेल्या शेकडो स्टार्टअप्स संदर्भात नमूद करत हे स्टार्टअप्स 'नव्या भारताच्या नवीन प्रयोगशाळा म्हणून उदयाला येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील हे टिंकर-प्रिन्युअर्स लवकरच जगातील आघाडीचे उद्योजक बनतील, असे पंतप्रधान म्हणाले.

कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या महर्षी पतंजली यांचा उल्लेख करत, 2014 नंतर केलेल्या उपाययोजनांमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. "स्टार्टअप इंडिया अभियान, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताला या क्षेत्रात नवीन उंची गाठण्यात मदत करणारे आहे", विज्ञान पुस्तकांच्या पलीकडे जाऊन  आता प्रयोगांच्या माध्यमातून पेटंटमध्ये रूपांतरित होत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.

10 वर्षांपूर्वी असणारी पेटंटची संख्या दरवर्षी 4000 वरून वाढून आज 30,000 पेक्षा अधिक झाली आहे. याच कालावधीत डिझाईन्सची नोंदणी 10,000 वरून 15,000 पर्यंत वाढली आहे. 70,000 हून कमी असलेली ट्रेडमार्कची संख्या 2,50,000 पेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

आजचा भारत सर्व दिशांनी पुढे जात असून, तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रेसर राष्ट्र होण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. देशातली एकूण तंत्रज्ञान इनक्युबेशन केंद्रे 2014 साली साधारण 150 होती जी आता 650 च्या वर पोहोचली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारीत आता भारत, 81 व्या स्थानापासून 40 व्या स्थानापर्यंत पोहोचली आहे. आज देशातील  अनेक युवक, स्वत:च्या कंपन्या आणि स्टार्टअप्स स्थापन करत आहेत, याबद्दल त्यांनी  गौरवोद्गार काढले.

2014 या वर्षासोबत तुलना करतांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं, की तेव्हा देशात साधारण 100 स्टार्ट अप्स होते आणि  आता 1 लाखांपेक्षा जास्त अधिकृत स्टार्ट अप्स आहेत. आणि यामुळे भारत, जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट अप व्यवस्था असलेला देश ठरला आहे. भारताच्या क्षमता आणि गुणवत्ता यावर भर देत, ज्यावेळी, संपूर्ण जग आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात असतांना,  भारताने ही वृद्धी नोंदवली आहे, हे ही त्यांनी अधोरेखित केले. सध्याचा काळ धोरणकर्ते, वैज्ञानिक समुदाय, संशोधन प्रयोगशाळा आणि खाजगी क्षेत्र अशा सर्वांसाठी अतिशय मोलाचा असल्याचे सांगत, जरी विद्यार्थ्यांना, शाळा ते स्टार्ट अप प्रवास उपलब्ध करुन दिला तरी, या सर्व भागधारकांनीही, विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यासाठी आपण सर्वतोपरी पाठबळ देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा सामाजिक अर्थ लक्षात घेऊन पुढे वाटचाल करतो, तेव्हा, तंत्रज्ञान सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन बनते, असेही पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञान, हे समाजातील असमतोल दूर करण्याचे आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याचे साधन ठरते, असेही त्यांनी सांगितले. जेव्हा तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होते, आणि डेबिट, क्रेडिट कार्डस वगैरे प्रतिष्ठेच्या गोष्टी होत्या, अशा काळाचे त्यांनी स्मरण केले. मात्र आज, युपीआय, वापरण्यास सोपे असल्याने, त्याचा सहज वापर ‘न्यू नॉर्मल’  ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. आज जगभरात सर्वाधिक डेटाचा वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असेही त्यांनी सांगितले. त्यातही ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण शहरी लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. जेएएम  त्रिवेणी,जीएएम पोर्टल, कोविन पोर्टल, ई-नाम अशा पोर्टलच्या माध्यमातून तंत्रज्ञान सर्वसामावेशकतेचे वाहक ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर समाजाला ताकद देतो, असे सांगत, आज सरकार तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि लोकांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सेवा दिल्या जात आहेत. ऑनलाईन जन्म प्रमाणपत्र, ई-पाठशाला, आणि दीक्षा सारखे ई-शिक्षण प्लॅटफॉर्म, शिष्यवृत्ती, नोकरीच्या काळात सार्वत्रिक उपलब्धता क्रमांक, वैद्यकीय उपचारांसाठी ई-संजीवनी आणि वयोवृद्ध नगरिकांसाठी जीवनप्रमाण पत्र, अशा सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्येक पावलावर मदत केली जात आहे, असे पंतप्रधान  म्हणाले. तसेच सहज पारपत्र, डिजी यात्रा आणि डिजी लॉकर हे उपक्रम सामाजिक न्याय सुनिश्चित करणारे आणि लोकांचे जीवनमान सुखकर करणारे आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या जगात आज सर्वत्र ज्या वेगाने बदल घडत आहेत, त्यांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की,  जगाच्या या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासोबत भारतातील युवावर्गाने  देखील आपला वेग कायम ठेवला आहे, इतकेच नाही काही बाबतीत तर  त्या वेगाच्याही पलीकडे आपले  युवक  गेले आहेत. 

कृत्रिम बुद्धिमत्ता हे परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञान ठरले आहे. आज आरोग्य क्षेत्रात अमर्याद संधी आहेत, ड्रोन तंत्रज्ञान, उपचारशास्त्र अशा क्षेत्रात नवनवे अभिनव प्रयोग सुरु झाले आहेत. आणि अशा क्रांतीकारक तंत्रज्ञानात भारताने पुढाकार घ्यायला हवा,असेही ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या उद्दिष्टाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी, ‘इनोव्हेशन फॉर डीफेन्स’  – म्हणजेच आयडेक्स चा उल्लेख केला. संरक्षण मंत्रालयाने, आयडेक्स कडून 350 कोटी रुपयांची 14 अभिनव उपकरणे खरेदी केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, पंतप्रधानांनी आय-क्रिएट सारखे उपक्रम  आणि डीआरडीओच्या युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा, यांचा उल्लेख करत अशा प्रयत्नांमधून तंत्रज्ञानाला नव्या दिशा मिळत आहेत, असे ते म्हणाले. अवकाश क्षेत्रातल्या सुधारणाबद्दल बोलतांना  पंतप्रधान म्हणाले की, भारत जागतिक ‘गेम चेंजर’ म्हणून उदयास येत आहे आणि एसएसएलव्ही आणि पीएसएलव्ही ऑर्बिटल प्लॅटफॉर्म सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला आहे. अंतराळ क्षेत्रातील तरुणांना आणि स्टार्टअप्सना नवीन संधी उपलब्ध देण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. कोडिंग, गेमिंग आणि प्रोग्रामिंग या क्षेत्रांमध्ये अभिनव उपक्रम राबवण्यावरही त्यांनी भर दिला. सेमीकंडक्टर्ससारख्या नवीन क्षेत्रांमध्ये भारत आपला ठसा उमटवत असताना सरकार राबवत असलेल्या पीएलआय योजनेसारख्या धोरण-स्तरीय उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.  

नवोन्मेष आणि सुरक्षा यामध्ये हॅकॅथॉनच्या भूमिकेवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सरकार सातत्याने हॅकॅथॉन संस्कृतीला प्रोत्साहन देत असल्याचे अधोरेखित केले ज्यामध्ये विद्यार्थी सातत्याने नव्या आव्हानांवरील तोडगे शोधत असतात. यासाठी एक नवीन चौकट तयार करण्याची आणि विद्यार्थ्यांना अतिशय काळजीपूर्वक पाठबळ देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. अटल टिंकरिंग लॅब्जमधून बाहेर पडणाऱ्या युवा वर्गासाठी एक संस्थात्मक प्रणाली तयार करण्याची त्यांनी सूचना केली. आपण देशात विविध भागात अशाच प्रकारच्या 100 प्रयोगशाळांची निवड करू शकतो का ज्या युवा वर्गाकडून चालवल्या गेल्या पाहिजेत, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. स्वच्छ ऊर्जा आणि नैसर्गिक शेती या क्षेत्रांवर भर दिला जात असल्याचे अधोरेखित करत संशोधन आणि तंत्रज्ञान यावर पंतप्रधानांनी भर दिला.  आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताहाच्या माध्‍यमातून या सर्व शक्यता प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, असा विश्वास व्यक्त केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.   

पार्श्वभूमी

महाराष्ट्रात हिंगोली येथे LIGO-India  विकसित केले जाणार असून  जगातील निवडक लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ते एक असेल. या परिसरातील  4 किमी लांबीची ‘भूजा’  असलेले अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर असून कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे यांसारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी समजून घेण्यास सक्षम  असणार आहे. अमेरिकेत हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथील एक आणि लिव्हिंग्स्टन, लुईझियाना येथील एक अशा दोन वेधशाळांबरोबर LIGO-India समन्वयाने  कार्य करेल.

दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबके  प्रामुख्याने विकसित देशांमध्ये उत्पादित केली  जातात. विशाखापट्टणम येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या परिसरात दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबकांच्या निर्मितीची सुविधा विकसित करण्यात आली आहे. ही सुविधा स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आणि स्वदेशी संसाधनांमधून उत्खनन केलेल्या  स्वदेशी दुर्मिळ पृथ्वी सामग्रीचा वापर करून स्थापित  करण्यात आली आहे. या सुविधेमुळे, भारत दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबकांची निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात समाविष्ट  होईल.

नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरची  नॅशनल हॅड्रॉन बीम उपचार सुविधा ही एक अत्याधुनिक सुविधा आहे.  शरीरात मात्रेची व्याप्ती गाठीच्या आजूबाजूच्या निरोगी अवयवांपर्यंत कमीतकमी ठेवत गाठीवर  अत्यंत अचूक रेडिएशनचे वितरण करण्याचे कार्य या सुविधेमुळे शक्य होते.लक्ष्यित ऊतींना मात्रेचे अचूक वितरण करत  रेडिएशन उपचाराचे प्रारंभिक आणि दीर्घकालीन  दुष्परिणाम कमी करते.

भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरात  फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा आहे.  मॉलिब्डेनम-99  हे टेक्नेटियम-99m चे मूळ आहे. त्याचा  उपयोग  कर्करोग, हृदयरोग इत्यादी व्याधींचे निदान लवकर कळण्यासाठी आवश्यक 85% पेक्षा जास्त इमेजिंग प्रक्रियेमध्ये होतो.या सुविधेमुळे प्रतिवर्षी सुमारे 9 ते 10 लाख रुग्णांचे परीक्षण शक्य होणे अपेक्षित आहे.

अनेक कर्करोग रुग्णालयांचे  आणि  सुविधांचे  राष्ट्रार्पण  आणि पायाभरणी यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये  कर्करोगावरील  जागतिक दर्जाच्या  सेवांचे  विकेंद्रीकरण होईल आणि त्याची व्याप्ती वाढेल.

अटल इनोव्हेशन मिशन आणि इतर घटक

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त आयोजित कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये अटल नवसंकल्पना अभियानावर  (AIM)  विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची संकल्पना अधोरेखित करत   AIM पॅव्हेलियन अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित करेल आणि अभ्यागतांना थेट प्रयोग  सत्रे पाहण्याची,  उत्कृष्ट नवकल्पना आणि स्टार्टअप्सच्या उत्पादनांचे साक्षीदार होण्याची संधी प्रदान करेल. एआर/व्हीआर, संरक्षण तंत्रज्ञान, डिजीयात्रा, वस्त्रोद्योग  आणि जीवविज्ञान  इत्यादींसारखी बहुविध क्षेत्रे असतील.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी भारतामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या विज्ञान  आणि तंत्रज्ञानविषयक  प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे  उद्घाटन केले. यावेळी  त्यांनी एका स्मरण टपाल तिकीट आणि नाणे यांचे प्रकाशन केले.  जारी करतील.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये भारताच्या विज्ञान  आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या  आणि मे 1998 मध्ये पोखरण चाचणी  यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ  राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस नवीन आणि वेगळ्या संकल्पनेसह साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना  ‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी आहे.

 

JPS/ST/SB/Bhakti/Sonal C/Radhika/Shailesh/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923393) Visitor Counter : 137